बुडालेल्या चारही जणांचे मृतदेह सापडले

By Admin | Updated: May 31, 2014 01:37 IST2014-05-31T01:24:49+5:302014-05-31T01:37:10+5:30

दोडामार्ग : परमे येथे तिळारी नदीपात्रात बुडालेल्या एकाच कुटुंंबातील चौघाही भावंडांचे मृतदेह शुक्रवारी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास ग्रामस्थांनी नदीपात्रातून बाहेर काढले.

The body of all the four found dead | बुडालेल्या चारही जणांचे मृतदेह सापडले

बुडालेल्या चारही जणांचे मृतदेह सापडले

 दोडामार्ग : परमे येथे तिळारी नदीपात्रात बुडालेल्या एकाच कुटुंंबातील चौघाही भावंडांचे मृतदेह शुक्रवारी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास ग्रामस्थांनी नदीपात्रातून बाहेर काढले. मृतदेह शोधण्याचे काम सकाळी ६ वाजल्यापासूनच हाती घेण्यात आले होते. चार तासांच्या अथक परिश्रमानंतर ग्रामस्थांच्या शोधकार्यास यश आले. गुरुवारी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास परमे येथे तिळारी नदीपात्रात हत्तीचा गुंडा या ठिकाणी अर्जुन वासुदेव आरोसकर हे आपला मुलगा अक्षय आरोसकर (१७), आकाश आरोसकर (१८), मुलगी अरुणा आरोसकर (२१), भाचा अंकित अंकुश गवस (१८) व भाची अक्षता अंकुश गवस (१५) यांना घेऊन आंघोळीसाठी गेले होते. आंघोळ केल्यानंतर नदीपात्रातून बाहेर पडत असतानाच अरुणा हिचा पाय घसरल्याने ती पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहून जाऊ लागली. तिला वाचविण्याच्या प्रयत्नात अक्षय, आकाश, अंकित व अक्षता यांनीही पाण्यात उडी घेतली. मात्र, पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने आणि यातील कोणालाच पोहता येत नसल्याने पाचही भावंडे वाहून गेली. या वेळी अर्जुन आरोसकर यांनी लाकडी बांबू नदीत टाकून भाचीला वाचविले; परंतु तोपर्यंत इतर चारही जण पाण्यात बुडाली होती. सायंकाळच्या वेळी ही घटना घडल्याने काळोखामुळे त्यांचा शोध घेणे शक्य नव्हते. त्यामुळे शुक्रवारी सकाळी ६ वाजल्यापासूनच नदीपात्रात शोधकार्यास सुरुवात करण्यात आली. शोधकार्यात मनसेचे उपतालुकाध्यक्ष मायकल लोबो, साटेली-भेडशीचे माजी उपसरपंच संजय धर्णे, नागेश मयेकर, परमे येथील कांता नाईक व इतरांनी सहभाग घेतला. चार तासांच्या अथक परिश्रमानंतर १० वाजण्याच्या सुमारास अक्षय व आकाश आरोसकर आणि अंकित गवस यांचे मृतदेह हाती लागले. त्यानंतर तासाभराने अरुणाचा मृतदेह सापडला. (प्रतिनिधी)

Web Title: The body of all the four found dead

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.