अहंकारी बाबूशने भाजप कार्यकर्त्यांची माफी मागावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2024 10:49 AM2024-01-14T10:49:20+5:302024-01-14T10:49:26+5:30

मोन्सेरात हे फक्त सत्ता भोगण्यासाठी येथे आले आहेत, त्यांना पक्षाची विचारधारा व कार्यपद्धती माहीत आहे काय?

arrogant babush monserrate should apologize to bjp workers | अहंकारी बाबूशने भाजप कार्यकर्त्यांची माफी मागावी

अहंकारी बाबूशने भाजप कार्यकर्त्यांची माफी मागावी

दत्ता खोलकर, म्हापसा

गोव्याचे माजी मुख्यमंत्री तसेच देशाचे संरक्षण मंत्री स्व. मनोहर पर्रीकर, काळाच्या पडद्याआड गेल्याच्या घटनेला पुढील दोन महिन्यानंतर पाच वर्षे पूर्ण होतील, गोव्यातील जनता तसेच देशभरातील लाखो नागरिकांमध्ये आजही त्यांच्याबद्दल सहानुभूती व आदराची भावना कायम आहे त्यांच्या आठवणी आणि स्मृती अजून जिवंत असून, आन सुध्दा राज्यातील कानाकोपऱ्यात प्रशासनिक समस्यांची चर्चा होत असताना, 'मनोहर भाई असते तर, असे भावनिक बोल ऐकायला मिळतात. राज्याच्या उभारणीत आणि विकास यात्रेत त्यांचे बहुमूल्य योगदान व अभूतपूर्व कामगिरीची यशोगाथा, ही पुढच्या पिढ्यांसाठी प्रेरणादायक ठरतील, हे निश्चित आहे. त्यांच्या धाडसी व बेधडक नेतृत्वाचे किस्से यापुढेही कायम सांगितले जातील.

पर्रीकर यांनी आपल्या संपूर्ण सामाजिक तथा राजकीय कारकिर्दीत 'राष्ट्र आणि राज्य प्रथम, हे धोरण अवलंबिले, ते ज्वलंत राष्ट्रप्रेमी होते. लहानपणी राष्ट्रीय स्वयंसेवक संघात, राष्ट्रभक्तीचे बाळकडू मिळाल्याने, त्यांचा राजकारणातील प्रवेश, हा राष्ट्रासाठी तथा गोव्याच्या हितासाठी समर्पित होता. त्यांनी निस्वार्थीपणे लोकांची सेवा केली. चार वेळा मुख्यमंत्रीपदी विराजमान होऊन राज्यात प्रशासकिय सुधारणा करतानाच, येथील पायाभूत सुविधांच्या बाबतीत नेत्रदीपक प्रगती साधली. विरोधी पक्षनेते म्हणून वावरताना विधानसभेतील कामाने आपला दबदबा निर्माण करून लोकांची मने जिंकली. सहा वेळा पणजीचे आमदार बनले आणि केवळ लोकसंपर्क व मतदारांच्या प्रेमापोटी प्रत्येक वेळी वाढत्या पाठिंब्याने विजयी झाले. संरक्षण मंत्री म्हणून त्यांनी देशहितासाठी केलेल्या उल्लेखनीय कामगिरीची सर्व थरातून प्रशंसा झाली, सैन्याचे कित्येक वर्षे प्रलंबित असलेले जाचक प्रश्न सोडवले. निवृत सैनिकांचा 'वन रैंक वन पेन्शन सारखा जटिल प्रश्न यशस्वीरित्या हाताळला, जेणेकरून एकवीस लाख माजी फौजींना न्याय प्रदान झाला.

सामान्य माणसाचा पोशाख, साधं राहणीमान, लोकांप्रति संवेदनशीलता, सोळा ते अठरा तास कार्यमग्न राहणे, प्रशासकिय समस्या सहजपणे हाताळणे, स्वच्छ व पारदर्शक व्यवहार, चाणाक्ष बुद्धिमत्ता.. या सगळ्यामुळे पर्रीकर हे अन्य राज्यकर्त्यांपेक्षा वेगळे असल्याचे सिद्ध झाले होते. म्हणूनच लोक त्यांचावर प्रेम करायचे, त्यांनी जनतेचा विश्वास संपादन केला होता. त्यांनी राज्याला तसेच आपल्या पक्षाला धाडसी नेतृत्व दिले. पक्षाचा राज्यभर विस्तार केला, पक्षाच्या कार्यात असंख्य कार्यकर्त्यांना जोडले, पार्टीचे संघटन बांधताना गोवा पिंजून काढला, तसेच मोठ्या प्रमाणावर लोकसंपर्क साधून जनतेच्या समस्या जाणून घेतल्या. गावागावात फिरून भारतीय जनता पक्ष गोव्यात रुजवला व पुढे सत्तेवर आणला. 

२००५ मध्ये विरोधी पक्षांच्या हातात गेलेली सत्ता परत एकदा मिळविण्यासाठी त्यांनी जीवाचे रान केले. दिवसरात्र प्रवास व लोकसंपर्क, आंदोलने व संघर्ष आणि शेवटी राज्यव्यापी जनसंपर्क यात्रा करून राज्यात राजकीय परिवर्तन घडविले, २०१२ मध्ये स्पष्ट बहुमताचे भाजपचे सरकार सत्तास्थानी प्रस्थापित केले. कित्येक सामान्य कार्यकर्त्यांना पुढे आणून आमदार बनवले. राज्यात भाजप, ही प्रबळ राजकीय शक्ती निर्माण करण्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे, हे सत्य कोणीही नाकारू शकत नाही. 

२०१४ मध्ये मोदी सरकार केंद्रात सत्तास्थानी आल्यानंतर प्रधानमंत्र्यानी स्वतः त्यांना संरक्षण मंत्रिपद स्वीकारण्यासाठी हेरले. हा तर राज्यातील जनतेसाठी बहुमान होता. पर्रीकर यांनी पक्षाचा आदेश सर्वोच्च मानून राज्यातील मुख्यमंत्रीपद सोडले, तसेच, कौटुंबिक समस्या दुर्लक्षित करून देशसेवेसाठी स्वतःला समर्पित केले, पर्रीकर सारखा राजकीय नेता राज्यासाठी वरदान ठरला. २०१९ मध्ये हा चमकणारा सितारा राजकीय क्षितिजावरून कायमचा लुप्त झाला.

दुर्दैवाने, पणजीचे आमदार तथा राज्य सरकारचे मंत्री बाबूश मोन्सेरात यांनी पणजी स्मार्ट सिटी बाबतीत बोलताना, पणजीचे माजी आमदार स्व. मनोहर पर्रीकर यांच्या बद्दल अपमानास्पद वक्तव्ये केली. पर्रीकरांनी पंचवीस वर्षे शहराची वाट लावली व सध्याच्या राजधानीच्या परिस्थितीला तेच जबाबदार असल्याचा आरोप त्यांनी केला, त्यांनी केलेल्या कर्माची फळे आज भोगावी लागतात, असे ते म्हणाले, तसेच, पणजीतून भाजपचा आमदार म्हणून आपण जिंकलो, असे प्रथमच घडले, कारण पर्रीकरसाठी स्वतः प्रथम व नंतर पक्ष असायचा, असे घृणास्पद व बेजबाबदार वक्तव्य त्यांनी केले.

मोन्सेरात यांच्या या बेताल वक्तव्यात प्रचंड अहंकार दडलेला जाणवतो. स्व. पर्रीकर यांच्याबद्दल त्यांचा द्वेष व मनातील अभद्र आकस प्रकट होतो. राजकारणात अहंकार बरा नव्हे. तो जास्त काळ टिकत नाही. पर्रीकर हयात असताना या नेत्याने त्यांच्या विरोधात पणजीत निवडणूक लढण्याचे धाडस केले नाही, हे सर्वश्रुत आहे. २०१७ मधील विधानसभा निवडणुकीत हे गृहस्थ परीकरनी पाठिंबा दिलेल्या भाजपच्या सिद्धार्थ कुंकळकर यांच्याकडून पराभूत झाले होते. 

२०२२च्या निवडणु‌कीत पणजीत जेमतेम सातशे मतांनी जिंकले आहेत. सत्ताधारी पक्षाचे पूर्ण बळ त्यांच्या पाठीशी असून सुद्धा ते फक्त ३९% मते मिळवू शकले. अर्थात, पणजीत ६१% मतदार त्यांच्या बाजूने झुकले नाहीत. म्हणजे, हे सगळे मतदार योग्य पर्यायाचा शोधात आहेत. तसेच, ते प्रमुख आरोपी असलेला पणजी पोलीस स्टेशन तोडफोड फौजदारी खटला कोर्टात अंतिम टप्यात असून, यात दोषी ठरल्यास ते निवडणूक लढवण्यास अपात्र ठरू शकतात, हे त्यांनी लक्षात ठेवलेले बरे. तसे झाल्यास त्यांचा राजकीय अहंकार चक्काचूर व्हायला वेळ लागणार नाही.

पर्रीकरांसोबत आमच्या सारख्या शेकडो कार्यकर्त्यांनी कित्येक वर्षे परिश्रम करून आजचा सत्ताधारी पक्ष उभा केला, १९९० च्या काळात आम्ही राजकीय अवहेलना सहन करून पक्षाचे कार्य वाढवण्यासाठी झटलो. पर्रीकर हे आमचे राजकीय प्रेरणा स्रोत होते. त्यांच्या रूपाने पक्षाच्या तमाम कार्यकत्यांना तारणहार व ऊर्जा केंद्र लाभले होते. त्यांच्या एका राजकीय दौन्याने गावागावांतील कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य निर्माण व्हायचे, त्यांच्या पक्षनिष्ठेबद्दल, एक पक्षबदलू आणि सत्तापिपासू आमदाराने प्रमाणपत्र देणे, म्हणजे पक्षाच्या एकनिष्ठ कार्यकर्त्यांचा घोर अपमान मानला पाहिजे. त्यामुळे, मोन्सेरात यांच्या विधानांचा तीव्र निषेध झालाच पाहिजे.

मोन्सेरात हे फक्त सत्ता भोगण्यासाठी येथे आले आहेत, त्यांना पक्षाची विचारधारा व कार्यपद्धती माहीत आहे काय? राज्यातील पक्ष कार्यकर्त्यांकडे त्यांचा संबंध आहे काय? भाजपच्या संस्थापकांची नावं तरी त्यांना माहीत आहे का? जनसंघाचा राजकीय संघर्ष ते जाणतात काय? पक्षाला सतास्थानी नेण्यात त्यांचे काय योगदान आहे? पर्रीकरांच्या पक्ष कार्याबद्दल त्यांनी केलेली विधाने पक्षाचे सच्चे कार्यकर्ते कदापि सहन करणार नाहीत, हे त्यांनी लक्षात ठेवावे.

खरे तर, पणजी शहरात स्मार्ट सिटी म्हणून विकसित करण्यासाठी २०१४ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री पर्रीकर यांनी केंद्राकडून अमृत मिशन अंतर्गत मान्यता मिळवली व निधी मंजूर करून घेतला. मात्र, नोव्हेंबर २०१४ दरम्यान परीकर केंद्रात गेल्यामुळे, पणजी शहराबाबत त्यांचे पूर्वीसारखे बारीक लक्ष राहिले नाही. तरी सुद्धा पणजीत बारीक मोठी कामे सुरूच होती, परंतु, त्यांच्या पश्चात २०१९ नंतर या सगळ्या स्मार्ट सिटी कामांबाबत त्यांना दोषी धरणे म्हणजे वेड पांघरून पेडगावला जाण्याचा प्रकार झाला. 

गेली पाच वर्षे पणजीत आमदार कोण? पणजीची महापालिका कोणाच्या ताब्यात आहे? पणजी पीडीए अध्यक्ष कोण आहे? महापौर बनलेल्या व्यक्तीची योग्यता काय? स्मार्ट सिटी मिशन समितीचे पदसिद्ध सदस्य असलेले आमदार व महापौर ही पिता पुत्र जोडी काय कामाची? या प्रश्नांची उत्तरे शोधली पाहिजेत. पणजीत तर फॅमिली राज सुरू आहे. तेथील जनता रडकुंडीला आली आहे दुकानदारांची फरफट सुरू आहे. त्यांचा धंदा व्यवसाय ठप्प आहे. सगळीकडे धुळीचे साम्राज्य पसरले आहे. जीवघेण्या अपघार्ताची मालिका सुरुच आहे. शहर पुरे विद्रुप झाले आहे. स्मार्ट सिटी मिशनऐवजी शहरात अर्धवट कामांचे धुमशान सुरू आहे. पणजीने बकाल स्वरूप धारण केले आहे. याला जवाबदार कोण? या सगळ्या गोंधळी परिस्थितीची जबाबदारी आणि ठपका विद्यमान आमदाराने स्वतःवर घेतलाच पाहिजे.

लोकशाहीत वादविवाद, आरोप प्रत्यारोप चालूच असतात. त्यामुळे, मोन्सेरात, उत्पल हे राजकीय प्रतिस्पर्धी असल्यामुळे त्यांच्या द्वंद्वात आम्हाला सहभागी व्हायचे नाही. परंतु, या वादात मनोहर पर्रीकर यांचे नाव घेऊन, दिवंगत नेत्यावर खापर फोडण्याची रणनीती पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते खपवून घेणार
नाहीत.

पणजीच्या आमदारांनी याबद्दल खेद व्यक्त करून आपल्या निंदनीय विधनांबद्दल पक्ष कार्यकर्त्यांची माफी मागणे उचित ठरेल. नपेक्षा, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी हस्तक्षेप करून त्यांच्या विधानांचे जाहीरपणे खंडन करून आपली या बाबतची भूमिका स्पष्ट करावी, ही अपेक्षा....
 

Web Title: arrogant babush monserrate should apologize to bjp workers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.