हजारो ‘उज्ज्वला’ आल्या पुन्हा चुलीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2021 04:49 AM2021-02-25T04:49:41+5:302021-02-25T04:49:41+5:30

दीड वर्षांपासून कनेक्शन देणे बंद जिल्ह्यात सप्टेंबर २०१९ पासून उज्ज्वला गॅस योजनेतून नवीन कनेक्शन देणेच बंद झाले. त्यामुळे ही ...

Thousands of 'bright' came back to the stove | हजारो ‘उज्ज्वला’ आल्या पुन्हा चुलीवर

हजारो ‘उज्ज्वला’ आल्या पुन्हा चुलीवर

Next

दीड वर्षांपासून कनेक्शन देणे बंद

जिल्ह्यात सप्टेंबर २०१९ पासून उज्ज्वला गॅस योजनेतून नवीन कनेक्शन देणेच बंद झाले. त्यामुळे ही योजना शासनाने गुंडाळली की काय, असे चित्र होते. एवढेच नाहीतर जिल्हा पुरवठा विभागाकडे याेजनेची पुरेशी माहितीसुद्धा आजघडीला नाही. चंद्रपूर येथे बसणाऱ्या एका नोडल अधिकाऱ्याकडेच त्याबाबतची सर्व माहिती असल्याचे सांगण्यात आले. त्या अधिकाऱ्याकडे वारंवार संपर्क केल्यानंतरही संबंधित अधिकारी पुरेशी माहिती देऊ शकले नाहीत.

यापूर्वी ६७६४ जणांनी उज्ज्वला योजनेतून गॅस घेणे बंद केले होते. गेल्या काही महिन्यांत गॅसच्या किमती सातत्याने वाढत आहेत. त्यामुळे गॅसचा हंडा भरून न घेणाऱ्यांची संख्या आता १० हजारांच्या घरात असण्याची शक्यता नाकारता येत नाही. विशेष म्हणजे, जिल्ह्यात मोजक्याच ठिकाणी गॅसच्या हंड्यासाठी गोदाम आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना हंडा भरून आणण्यासाठी अजून अतिरिक्त पैसे माेजावे लागतात. त्यामुळे अनेकांनी रिफिल करणे सोडले.

प्रतिक्रिया

सिलिंडरचे भाव तर वाढलेच, पण सबसिडीही मिळत नाही. जेमतेम ४० रुपये बँकेत जमा होते. अगोदर सिलिंडरचे भाव कमी होते आणि सबसिडीही देत होते. आता भाव वाढविले आणि सबसिडी कमी केली. म्हणून आता नियमित गॅस वापरणे कठीण झाले आहे. नाईलाजाने चूल पेटवावी लागत आहे.

- प्रणाली पाथोडे, गडचिरोली

घरगुती गॅस सिलिंडरचे भाव सुरुवातीला ३०० ते ३५० रुपयापर्यंत होते. आता दुप्पट झाले आहेत. त्यामुळे गॅसवर स्वयंपाक करणे परवडत नाही. त्यामुळे आम्ही चुलीवरच स्वयंपाक करणे सुरू केले आहे. थोडा त्रास होत असला तरी चुलीवरचा स्वयंपाक परवडतो. गोरगरिबांचा विचार करून भाव कमी केले तर पुन्हा गॅस वापरू.

- राजकुमारी सुरेश मेश्राम, कोरची

गॅसचे भाव आता गोरगरिबांच्या आवाक्यात राहिले नाहीत. चुलीवरचा त्रास परवडला, पण गॅसचे भाव नाही परवडत. उज्ज्वला योजनेतून गॅस भेटला, पण सिलिंडर भरून आणण्यासाठी तर पैसे द्यावेच लागणार ते कुठून आणायचे, फक्त गॅसच नाही बाकीचा पण खर्च वाढला आहे. मग कुठेतरी बचत करावी लागेल ना?

- शकुंतला कोटेश, ताल्लापेल्ली, ता.सिरोंचा

सुरुवातीला चुलीवर स्वयंपाक करताना धुराचा खूप त्रास होत होता. मोदी सरकारने प्रदूषणमुक्त वातावरणासोबत महिलांना चूल पेटविण्याचा त्रास होऊ नये म्हणून उज्ज्वला योजनेतून गॅस दिले. ३५० रुपयांत गॅस मिळत होता. आज ८३५ रुपयांत घ्यावा लागतो. एवढ्या महागाचा गॅस वापरणे परवडणार आहे का?

- कमला तिलक मडावी, कोरची

गॅस सिलिंडरचे भाव ७८५ ते ८३५ झाले आहेत. त्यामुळे सिलिंडर घेणे आम्हाला आता कठीण झाले आहे. त्याचबरोबर जंगलातून लाकडे आणणेसुद्धा कठीण झाले आहे. वनविभाग लाकडे घेऊ देत नाही. मग गोरगरिबांनी चूल कशी पेटवायची, याचे उत्तर सरकारने द्यावे.

- सोनी प्रवीण पुद्दटवार, अंकिसा (ता.सिरोंचा)

Web Title: Thousands of 'bright' came back to the stove

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.