गडचिरोली : गरीब नागरिकांना खासगी रुग्णालयात मोफत शस्त्रक्रिया करून मिळावी, यासाठी शासनाने राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना सुरू केली असून या योजनेचा आजपर्यंत गडचिरोली जिल्ह्यातील १ हजार ७३४ नागरिकांनी लाभ घेतला आहे. अनेक रोगांवर शासकीय रुग्णालयातही उपचार केले जातात. मात्र या रुग्णालयांची अवस्था अत्यंत वाईट झाली आहे. रुग्णालयामध्ये दाखल झालेल्या रुग्णावर उपचार न करता डॉक्टर स्वत:चे खासगी दवाखाने सांभाळण्यातच धन्यता मानतात. त्यामुळे सामान्य जनतेचे या रुग्णालयामध्ये हाल होतात. त्याचबरोबर काही रुग्ण शासकीय रुग्णालयात उपचार करण्याऐवजी मरणेही पसंत करतात. सामान्य नागरिकांना खासगी रुग्णालयामध्ये मोफत उपचार मिळावा, यासाठी राज्य शासनाने राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना सुरू केली आहे. ही योजना सर्वप्रथम गडचिरोलीसह काही निवडक जिल्ह्यांमध्येच सुरू करण्यात आली. त्यानंतर ती संपूर्ण राज्यात लागू करण्यात आली आहे. गडचिरोली जिल्ह्यात अनेक नागरिकांकडू आरोग्य कार्डसुद्धा काढण्यात आले आहेत. गडचिरोली जिल्ह्यात प्रत्येक ग्रामीण रुग्णालयात जीवनदायी आरोग्य योजनेचे केंद्र स्थापन करण्यात आले असून या ठिकाणी आरोग्यमित्र कार्यरत आहेत. ग्रामीण रुग्णालयात रुग्ण दाखल झाल्यानंतर आरोग्यमित्र सदर रुग्णाला योग्य मार्गदर्शन करून त्याला जीवनदायी योजनेचा लाभ मिळवून देतात. योजनेच्या सुरूवातीपासून गडचिरोली जिल्ह्यातील १ हजार ७३४ रुग्णांवर वेगवेगळ्या प्रकारची शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. ज्या शस्त्रक्रियेसाठी लाखो रूपयांचा खर्च येत होता. ती शस्त्रक्रिया आता खासगी रुग्णालयात मोफत झाली आहे.गडचिरोली जिल्ह्यातील नागरिकांची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची असल्याने हे नागरिक खासगी रुग्णालयामध्ये जाऊन उपचार घेऊ शकत नाही. त्यामुळे सरकारी दवाखान्याच्या आधाराशिवाय या नागरिकांना पर्याय राहत नव्हता. राजीव गांधी जीवनदायी योजनेने मात्र खासगी रुग्णालयांचे द्वार गरीबांसाठी मोकळे करून दिले आहे. त्याचबरोबर तालुकास्थळावरील आरोग्यमित्रही योग्य सहकार्य करीत आहेत. या योजनेचा लाभ घेणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. यापूर्वी आरोग्य कार्ड असलेल्या व्यक्तिलाच या योजनेचा लाभ दिला जात होता. मात्र यामध्ये शिथीलता देत केसरी व पिवळ्या रेशनकार्डावर नाव असले तरी या योजनेचा लाभ दिला जात आहे. गडचिरोली जिल्ह्यात केवळ जिल्हा सामान्य रुग्णालयातच या योजनेंतर्गत लाभ दिला जातो. इतर रुग्ण वर्धा येथील रुग्णालयामध्ये पाठविले जातात. जिल्ह्यात रुग्णालयांची संख्या वाढवावी, अशी मागणी आहे. (नगर प्रतिनिधी)
१७३४ रुग्णांवर शस्त्रक्रिया
By admin | Updated: February 4, 2015 23:14 IST