लक्षणे नसतानाही धानोरातील दोघांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2020 05:00 AM2020-05-29T05:00:00+5:302020-05-29T05:01:09+5:30
येथील मुळ रहिवासी असलेले मुलगा व आई हे दोघेजण भुसावळ तालुक्यातील एका गावी नातेवाईकाकडे गेले होते. दरम्यान लॉकडाऊन जाहीर झाल्याने ते भुसावळ तालुक्यातच अडकून पडले होते. शासनाने परवानगी दिल्यानंतर ते १४ दिवसांपूर्वी धानोरा येथे परत आले. परत आल्यानंतर त्यांना क्वॉरंटाईन सेंटरमध्ये ठेवण्यात आले होते. क्वॉरंटाईन कालावधीत दोघांनाही कोणतीही लक्षणे दिसून येत नव्हती.
लोकमत न्यूज नेटवर्क
धानोरा : येथील दोन रूग्णांचा कोरोनाचा अहवाल पॉझिटीव्ह आल्याने नगरात एकच खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे, क्वॉरंटाईन कालावधीत जळपास १४ दिवस त्यांना कोणतीही लक्षणे दिसून आली नाही. तरीही ते कोरोनाबाधित आढळल्यामुळे धानोरा शहरात काहीसे भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.
येथील मुळ रहिवासी असलेले मुलगा व आई हे दोघेजण भुसावळ तालुक्यातील एका गावी नातेवाईकाकडे गेले होते. दरम्यान लॉकडाऊन जाहीर झाल्याने ते भुसावळ तालुक्यातच अडकून पडले होते. शासनाने परवानगी दिल्यानंतर ते १४ दिवसांपूर्वी धानोरा येथे परत आले. परत आल्यानंतर त्यांना क्वॉरंटाईन सेंटरमध्ये ठेवण्यात आले होते. क्वॉरंटाईन कालावधीत दोघांनाही कोणतीही लक्षणे दिसून येत नव्हती. त्यामुळे त्यांची १३ दिवसांच्या क्वॉरंटाईन कालावधीनंतर सुटी करण्यात आली. मात्र खबरदारीचा उपाय म्हणून आरोग्य विभागाने दोघांचेही स्वॅब घेऊन ते तपासणीसाठी पाठविले होते. २८ मे रोजी या दोघांचाही कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आला आहे.
कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे समजताच त्या रुग्णांचे घर व परिसर सील करण्यात आला आहे. तसेच रूग्णांना गडचिरोली येथे उपचारासाठी पाठविण्यात आले.
तहसीलदार महेंद्र गणवीर, संवर्ग विकास अधिकारी बंडू निमसरकार, पोलीस निरिक्षक विवेक अहिरे, सहायक पोलीस निरिक्षक सुरेश साळुंखे यांनी या भागाला भेट देऊन पाहणी केली. आरोग्य विभागाच्या स्वतंत्र टिम तयार करण्यात आल्या आहेत. त्या वार्डातील प्रत्येक नागरिकाची दरदिवशी घरोघरी जाऊन तपासणी केली जाणार आहे. धानोरातील मार्केट पूर्णपणे बंद ठेवले आहे. मात्र रूग्ण सापडलेल्या परिसरातील काही भागातच जंतूनाशकांची फवारणी केली. वेळ झाल्याचे कारण सांगून आरोग्य विभागाचे पथक परत गेले, असा आरोप परिसरातील नागरिकांनी केला आहे.
काही दिवस थांबले घरी
भुसावळ वरून आल्यानंतर आरोग्य विभागाने मुलगा व आई दोघांनाही संस्थात्मक क्वॉरंटाईन केले. मात्र त्यांच्यामध्ये कोरोनाची कोणतीही लक्षणे दिसून येत नसल्याने १३ दिवसांच्या क्वॉरंटाईन कालावधीनंतर त्यांना सुटी देण्यात आली होती. २५ मे ला सुटी दिली, असे सांगितले जात आहे. तेव्हापासून २५ ते २८ मे पर्यंत दोघेही स्वत:च्या घरी थांबले होते. त्यामुळे ते राहत असलेल्या वॉर्डवासीयांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यांचा वार्डात कोणाकोणाशी संपर्क आला, याचा शोध घेतला जात आहे. नागरिकांनी घाबरून न जाता स्वत:ची काळजी घ्यावी, असे आवाहन ग्रामीण रूग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. देवेंद्र सावसागडे यांनी केले आहे.
धानोरा तालुक्यात शासकीय आदिवासी मुले व मुलींचे वसतिगृह, सोडे व पेंढरी येथील आश्रमशाळा क्वॉरंटाईन सेंटर म्हणून घोषित केले आहे. या ठिकाणी २८ मे पर्यंत ९६ लोक थांबले आहेत. १०० लोकांचे नमुने तपासणीसाठी पाठविले आहेत. त्यापैकी ६५ नमुन्यांचा रिपोर्ट प्राप्त झाला. तर ३५ नमुन्यांचा रिपोर्ट अजून येणे शिल्लक आहे.