लोकमत न्यूज नेटवर्कदेसाईगंज : जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांनी गुरूवारी देसाईगंजला भेट देऊन तहसील कार्यालयात आढावा घेतला. दरम्यान त्यांनी तालुक्यातील विविध समस्या उपस्थितांकडून जाणून घेत शेतकऱ्यांच्या अनेक प्रश्नांवर चर्चा केली. याप्रसंगी आ. कृष्णा गजबे, उपजिल्हाधिकारी धनाजी पाटील, उपविभागीय अधिकारी विशाल मेश्राम तसेच तहसीलदार उपस्थित हाेते. बैठकीत आ. गजबे यांनी विविध समस्या मांडल्या. यामध्ये कोरोनाकाळात शेतमालाला याेग्य भाव नाही. उशिरा पाऊस, महापुराने झालेले नुकसान आदींचा समावेश हाेता. प्रशासनाच्या वतीने नुकसानग्रस्त शेतीचे पंचनामे झाले असले तरी अघापही शेतकऱ्यांना भरपाई मिळाली नाही. तसेच आदिवासी विकास महामंडळ व मार्केटिंग फेडरेशनच्या जाचक अटीमुळे शेतकऱ्यांना धान्य विक्रीसाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. अनेक वनहक्कधारक शेतकऱ्यांसमाेर धानविक्रीची समस्या निर्माण झाली आहे. काही शेतकरी खासगी व्यापाऱ्यांनाही धानाची विक्री करीत आहेत. त्यामुळे ही समस्या साेडवावी, अशी मागणी आ. कृष्णा गजबे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे चर्चेदरम्यान केली.
धान खरेदीची मर्यादा वाढविण्याचे आश्वासनमागील वर्षी आधारभूत खरेदी याेजनेंतर्गत प्रती एकरी १२ क्विंटल धानाची खरेदी करण्यात आली. परंतु यावर्षी प्रती एकरी ९.६० क्विंटल धानाची खरेदी करण्याचे आदेश आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना धान विक्रीस अडचणी येत आहेत. ही समस्या आमदारांनी जिल्हाधिकाऱ्यांसमाेर मांडली असता धान खरेदीची मर्यादा वाढविण्याचे आश्वासन दिले. वनहक्क पट्टेधारकांची ऑनलाईन नाेंदणी होत नसल्याने त्यांनाही धान विक्रीसाठी अडचणी येत आहेत. काेरची, कुरखेडा व धानाेरा तालुक्यातील काही जुने केंद्र बंद झाल्याने शेतकऱ्यांना धान विक्रीसाठी अडचणी येत आहेत. त्यामुळे केंद्र पुन्हा सुरू करावे. परतीच्या पावसाने पीक भिजलेल्या शेतकऱ्यांचेही धान खरेदी करावे, अशी मागणी आमदारांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली.