पोलीस पाटलाने केले जमावबंदीचे उल्लंघन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2021 04:38 AM2021-05-09T04:38:41+5:302021-05-09T04:38:41+5:30
आष्टी : चामोर्शी तालुक्यातील अड्याळ येथील पोलीस पाटलांनी प्रशासनाला कोणतीही सूचना न देता, दवंडी देऊन १०० ते १५० ग्रामस्थांना ...
आष्टी : चामोर्शी तालुक्यातील अड्याळ येथील पोलीस पाटलांनी प्रशासनाला कोणतीही सूचना न देता, दवंडी देऊन १०० ते १५० ग्रामस्थांना जमा केले. त्यामुळे जमावबंदीच्या आदेशाचे उल्लंघन झाले असून, त्यांच्यावर कारवाई करावी, अशी तक्रार काही ग्रामस्थांनी केली आहे. तेंदूपत्ता संदर्भात नागरिकांना माहिती सांगण्याकरिता पोलीसपाटील विजय यशुजी तलांडे यांनी गावात कुणालाही विश्वासात न घेता, परस्पर दवंडी देऊन लोकांचा जमाव एकत्र केला. यावेळी १०० ते १५० लोकांचा घोळका जमा झाला होता.
जिल्ह्यात १४४ कलमांतर्गत जमावबंदीचा आदेश असताना पोलीस पाटलांनी त्याचे उल्लंघन केल्याचे काही ग्रामस्थांना दिसून आले. विशेष म्हणजे बरेच ग्रामस्थ यावेळी विनामास्क होते. अड्याळ येथील ग्रामस्थांनी यावर आक्षेप घेतला असून, याप्रकरणी पोलीस पाटलांवर योग्य ती कारवाई करण्यात यावी, अशी तक्रार प्रशासनाकडे केली आहे.