धानाेरा : येथील बाजार रोडवर अनेक व्यावसायिकांनी अतिक्रमण केल्याने या मार्गाने ये-जा करणाऱ्या नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. याकडे नगरपंचायत प्रशासनाने लक्ष देऊन अडचण दूर करावी, अशी मागणी होत आहे. धानोरा येथील मुख्य रस्त्यापासून पुढे चव्हेला, मुंगनेर, पेंढरीकडे जाणारे वाहनधारक तसेच बाजार, नगरपंचायत, पोस्ट ऑफिस, को-ऑपरेटिव्ह बँक, अंगणवाडी, काॅन्व्हेंट, तालुका कृषी कार्यालय, बुद्ध विहार आदी ठिकाणी कामाकरिता ये-जा करणारे नागरिक तसेच बाजार वाॅर्डातील नागरिक दैनंदिन कामाकरिता याच मार्गाने ये-जा करतात, त्यामुळे या मार्गावर नेहमी वर्दळ असते. दोन्ही बाजूला व्यावसायिकांनी किराणा दुकान, कापड दुकान, जनरल स्टोअर्स, टेलरिंग, चप्पल दुकान, भाजीपाला विक्री, भांड्यांची दुकाने थाटली आहेत. अनेक जण दुकानातील साहित्य रस्त्यालगत आणून ठेवतात. बहुतांश व्यावसायिकांनी रस्त्यावर साहित्य ठेवले आहे. त्यामुळे दाेन्ही बाजूंनी वाहने आल्यास जाता येत नाही. त्यामुळे वाहतुकीचा खाेळंबा हाेताे. स्थानिक प्रशासनाने याची दखल घेऊन अतिक्रमण हटवावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
अतिक्रमणामुळे बाजार राेड अरुंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2021 04:30 IST