Maharashtra Election 2019 ; नदीपल्याड गावांसाठी डोंगे सज्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 20, 2019 06:00 AM2019-10-20T06:00:00+5:302019-10-20T06:00:30+5:30
एटापल्ली तालुक्यातील सर्वच गावे जंगलांनी व्यापले आहेत. बांडे ही या तालुक्यातील प्रमुख नदी आहे. सदर नदी १०० पेक्षा अधिक गावांना वेढा टाकून पुढे जाते. या नदीवर व मोठ्या नाल्यांवर अजूनही पुलांचे बांधकाम करण्यात आले नाही. परिणामी नागरिकांना नदी, नाल्यातूनच प्रवास करावा लागतो. यावर्षी सप्टेंबर महिन्याच्या शेवटपर्यंत पाऊस पडत होता.
लोकमत न्यूज नेटवर्क
एटापल्ली : एटापल्ली तालुक्यातील बहुतांश गावे नदी, नाल्यांनी वेढली आहेत. या नदी, नाल्यांवर अजूनही पूल झाले नाही. त्यामुळे डोंग्याने प्रवास करावा लागतो. निवडणूक विभागाने एटापल्ली तालुक्यातील अशा गावांसाठी स्वतंत्र डोंगे पाठविले आहेत. डोंगे असलेला ट्रक एटापल्लीवरून पुढे रवाना करण्यात आला. गडचिरोली जिल्ह्यातील मतदान अधिकाऱ्यांना हेलिकॉप्टरसोबतच डोंग्याच्या प्रवासाचाही आनंद लुटता येत आहे.
एटापल्ली तालुक्यातील सर्वच गावे जंगलांनी व्यापले आहेत. बांडे ही या तालुक्यातील प्रमुख नदी आहे. सदर नदी १०० पेक्षा अधिक गावांना वेढा टाकून पुढे जाते. या नदीवर व मोठ्या नाल्यांवर अजूनही पुलांचे बांधकाम करण्यात आले नाही. परिणामी नागरिकांना नदी, नाल्यातूनच प्रवास करावा लागतो. यावर्षी सप्टेंबर महिन्याच्या शेवटपर्यंत पाऊस पडत होता. त्यामुळे नदी, नाले अजूनही पाण्याने भरले आहेत. पाण्यामधून पोलिंग पार्टीला पाठविणे धोक्याचे ठरू शकते. त्यामुळे निवडणूक विभागाने ट्रकवर डोंगे सोबतच निवडणूक कर्मचारी पाठविले. एटापल्लीपर्यंतच ट्रक पोहोचला. पुढे ट्रक नेणे अशक्य असल्याने सदर डोंगे ट्रॅक्टर व बैलबंडीच्या सहाय्याने नेली जाणार आहेत.
डोंग्यांसोबतच डोंगे चालविणाऱ्यांची टीम सुद्धा पाठविण्यात आली. सदर डोंगे कुदरी व रेंगादडी येथे नेण्यात येणार असल्याची माहिती नागरिकांनी दिली.
आॅक्टोबर महिन्यातही डोंग्याचा वापर करून निवडणूक कर्मचाऱ्यांना गाव गाठावे लागते. पावसाळ्यात काय परिस्थिती असेल, याची कल्पना न केलेली बरी. नदी, नाल्यांवर पूल नसल्याने वाट अडत असलेली शेकडो गावे आहेत. प्रत्येक राजकीय व्यक्ती रस्ता तयार करून पूल बांधण्याचे आश्वासन दिले जाते. मात्र हे आश्वासनाची पूर्तता होत नाही.