भामरागड-कोठी मार्गावरून आतमध्ये तीन किलोमीटर अंतरावर पदहूर गाव आहे. येथे २५ घरांची लोकवस्ती आहे. या गावाचा समावेश मिरगुडवंचा ग्रामपंचायतीमध्ये हाेताे. १०० टक्के आदिवासी लाेकसंख्या असलेले हे गाव अद्यापही अविकसित आहे. पदहूर गावातील आदिवासींना भामरागडकडे येताना पायवाटेत मोठा नाला लागतो. या नाल्यावर पूल नाही. त्यामुळे पाण्यातूनच नागरिकांना वाट काढावी लागते. काही वर्षांपूर्वी गरज नसतानाही या मार्गावर कलवटाचे बांधकाम करण्यात आले. मात्र, वाहतूक सुरू हाेण्यापूर्वीच कलवटावर मोठे भगदाड पडले. यावरून बांधण्यात आलेल्या पुलाच्या दर्जाची प्रचिती येते.
बाॅक्स .....
साैरऊर्जा नळयाेजना बंद
पदहूर गावात पहिली ते चौथीपर्यंत जिल्हा परिषद शाळा आहे. दोन वर्षांपूर्वी अंदाजे पाच लाख रुपये खर्च करून सौरऊर्जेवर चालणारी दुहेरी नळ योजना गावात सुरू करण्यात आली. नळयोजना सुरू झाल्याने पाण्याचा प्रश्न मिटेल, अशी आशा होती. मात्र, एका वर्षातच नळयोजना बंद पडली. आता दोन वर्षे उलटूनही नळयोजना बंद आहे. मात्र, याकडे ग्रामपंचायत प्रशासनाचे दुर्लक्ष हाेत आहे. त्यामुळे या गावातील नागरिकांमध्ये राेष व्यक्त हाेत आहे.