गडचिरोलीच्या विकासासाठी शिक्षणाची कास धरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2019 06:00 AM2019-12-20T06:00:00+5:302019-12-20T06:00:21+5:30

आज महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यांचा विचार करता त्यांनी भरपूर प्रमाणात औद्योगिक, आर्थिक, सामाजिक व शैक्षणिक प्रगती केली आहे. परंतु गडचिरोली जिल्ह्याचा हवा तसा विकास होऊ शकला नाही. त्याचे मुख्य कारण आहे म्हणजे नक्षलवाद आहे. महाराष्ट्र शासन गडचिरोली जिल्ह्याच्या विकासाकरीता भरपूर योजना राबवत आहे, पण नक्षलवादी स्वत:च्या स्वार्थासाठी त्या योजना लोकांपर्यंत पोहचू देत नाहीत.

Hold on to education for the development of Gadchiroli | गडचिरोलीच्या विकासासाठी शिक्षणाची कास धरा

गडचिरोलीच्या विकासासाठी शिक्षणाची कास धरा

Next
ठळक मुद्देपोलीस महानिरीक्षक रविंद्र कदम : महाराष्ट्र दर्शन सहलीतील विद्यार्थ्यांना केले मार्गदर्शन

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : शिक्षणाच्या माध्यमातून मिळणाऱ्या ज्ञानाद्वारे आयुष्याला दिशा मिळते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी नक्षलवाद्यांच्या भुलथापांना बळी न पडता शिक्षणाच्या माध्यमातून स्वत:ची प्रगती करुन गडचिरोलीच्या विकासाला हातभार लावा, असे आवाहनपर मार्गदर्शन नक्षलविरोधी अभियानाचे विशेष पोलीस महानिरीक्षक रविंद्र कदम यांनी विद्यार्थ्यांना केले.
शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या गडचिरोलीतील दुर्गम भागातील विद्यार्थ्यांची महाराष्ट्र दर्शन सहल नागपुरात आली होती. नक्षलविरोधी अभियानातर्फे सुराबर्डी येथील अपारंपरिक अभियान प्रशिक्षण केंद्राच्या सभागृहात आयोजित कार्यक्रमात त्यांना रविंद्र कदम यांनी मार्गदर्शन केले.
कदम म्हणाले, आज महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यांचा विचार करता त्यांनी भरपूर प्रमाणात औद्योगिक, आर्थिक, सामाजिक व शैक्षणिक प्रगती केली आहे. परंतु गडचिरोली जिल्ह्याचा हवा तसा विकास होऊ शकला नाही. त्याचे मुख्य कारण आहे म्हणजे नक्षलवाद आहे. महाराष्ट्र शासन गडचिरोली जिल्ह्याच्या विकासाकरीता भरपूर योजना राबवत आहे, पण नक्षलवादी स्वत:च्या स्वार्थासाठी त्या योजना लोकांपर्यंत पोहचू देत नाहीत. नक्षलवाद्यांनी विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित ठेवल्यामुळे त्यांना चांगले काय आणि वाईट काय यातील फरक समजला नाही, त्यामुळे त्यांचे आयुष्य उद्ध्वस्त होते. पुढे मात्र आपण भरकटलो असल्याची जाणीव होते. अशा भरकटलेल्या नक्षलवाद्यांसाठी शासनाने आत्मसमर्पण योजना सुरु केली आहे. आता याचा लाभ घेवून अनेक नक्षलवादी आत्मसमर्पण करीत असल्याची माहिती कदम यांनी विद्यार्थ्यांना दिली.
या सहलीत ८० विद्यार्थी व विद्यार्थिनींनी सहभाग घेतला होता. त्यांनी मुंबई, पुणे, औरंगाबाद, शेगाव, नागपूर आदी शहरांना भेटी देवून तेथील शहरांचा विकास पाहिला. औद्योगिक, शैक्षणिक, धार्मिक व ऐतिहासिक स्थळांची माहिती जाणून घेतली. सहलीसाठी लक्ष्मण केंद्रे, दिनकर चांभारे, विशेष शाखा नक्षलविरोधी अभियान नागपूर यांनी समन्वय अधिकारी म्हणून जबाबदारी पार पाडली. विजय वनकरे व पेंदोर यांनी समन्वय अधिकारी म्हणून सहकार्य केले. कार्यक्रमाचे संचालन नक्षलविरोधी अभियानचे प्रभारी पोलीस उपअधीक्षक युवराज पत्की यांनी केले. आभार निरीक्षक राहुल सोनवने यांनी मानले. कार्यक्रमास पोलीस निरीक्षक डी.डी.राजपूत, सपोनि संजय पिसे, सपोनि लक्ष्मण केंद्रे आणि पो.हवालदार दिनकर चांभारे यांच्यासह नक्षलविरोधी अभियानातील कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रगतीसाठी मिळाली नवी दिशा
यावेळी सहलीतील विद्यार्थी सौरभ मेश्राम, गोविंद तेलंग, रोहिनी कोडापे, वैष्णवी मडावी यांनी आपले मनोगत व्यक्त केले. सहलीच्या माध्यमातून गडचिरोलीच्या बाहेरील इतर प्रगत शहरातील जीवनशैलीची पाहणी करता आली. तसेच पुढील आयुष्यात यशस्वी होण्यासाठी या माध्यमातून आपल्याला नवी दिशा मिळाली असल्याचे त्यांनी सांगितले. प्रतिभा पुडो हिने मुंबईसारखाच गडचिरोलीचा विकास होण्याची आवश्यकता असल्याचे मत व्यक्त करुन भविष्यात शिक्षणाच्या माध्यमातून मोठी अधिकारी होण्याचा मानस व्यक्त केला. यावेळी अनेक विद्यार्थ्यांनी जिल्हाधिकारी, भारतीय पोलीस सेवा, डॉक्टर, अभियंता, शिक्षक होण्याची इच्छा व्य्क्त केली.

नक्षलवादापासून दूर राहा आणि इतरांनाही ठेवा
सन १९९०-९१ च्या तुलनेत गडचिरोली जिल्ह्यातील परिस्थितीत भरपूर बदल झाला आहे. त्याचे मुख्य कारण म्हणजे आता गडचिरोलीमधील स्थानिक युवक हे शिक्षणाकडे वळले आहेत. ते उच्च शिक्षण घेवून अनेक क्षेत्रात भरारी घेत आहेत. अशाच पध्दतीने या सहलीमधील मुलांनी पण उच्च शिक्षण घेवून चांगल्या पदावरील नोकरी करावी, व्यवसाय करावा व स्वत:चा विकास करुन गडचिरोली जिल्ह्यातील रोल मॉडेल बनावे. स्वत: नक्षलवाद्यांपासून दूर राहून इतर स्थानिकांना त्यापासून दूर ठेवावे व गडचिरोली जिल्ह्याला नक्षलमुक्त करावे, असे आवाहन महानिरीक्षक कदम यांनी विद्यार्थ्यांना उद्देशून केले.

Web Title: Hold on to education for the development of Gadchiroli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.