आष्टी : आष्टी-चंद्रपूर मार्गावरील वैनगंगा नदीच्या पुलावर अर्ध्या भागात कठडेच लावण्यात आले नाहीत. त्यामुळे पुलावरून ये-जा करणाऱ्या वाहनांना अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. बांधकाम विभागाने लक्ष देऊन पुलावर पूर्ण कठडे लावावेत, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
गडचिरोली व चंद्रपूर जिल्ह्याला जोडणारा वैनगंगा नदीवरील हा पूल आहे. या मार्गाने दिवसरात्र अवजड वाहनांची वर्दळ असते. तसेच दुचाकी, सायकलस्वार ये-जा करीत असतात. पुलावर अर्ध्यापर्यंत कठडे लावण्यात आले. पुलाच्या सुरुवातीला कठडे नसल्याने समोरून भरधाव येणाऱ्या वाहनांमुळे पायी जाणारे व सायकलस्वारांचा अपघात होण्याची शक्यता आहे. यापूर्वी पुलावर अनेक अपघात होऊन जीवितहानी झाली आहे. याकडे बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन पूर्ण पुलावर कठडे लावावेत, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.