लोकमत न्यूज नेटवर्कआरमोरी : जिल्ह्यातील प्रस्तावित लोह खाणी, बळजबरी भूसंपादनाविरोधात व्यापक जनसंघर्ष उभारण्याचा निर्णय २६ जूनला येथे झालेल्या प्रागतिक पक्षांच्या बैठकीत घेण्यात आला. ३० जून गडचिरोलीच्या रोजी इंदिरा गांधी चौकात यासाठी धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.
बैठकीच्या अध्यक्षस्थानी भाकपचे राज्य सचिव मंडळ सदस्य डॉ. महेश कोपूलवार होते. शेकापचे नेते रामदास जराते यांनी जिल्ह्यातील सर्व मंजूर व प्रस्तावित लोह खाणी, प्रक्रिया प्रकल्प आणि भूसंपादन याविषयी सविस्तर मांडणी केली. यानंतर उपस्थितांनी आपापली मते मांडून बळजबरी भूसंपादन आणि बेकायदेशीर मंजुरीविरोधात तीव्र रोष व्यक्त करत विरोध दर्शवला. पत्रके छापून प्रचार-प्रसार करणे व बाधित क्षेत्रात स्थानिक स्तरावर परिषदा घेणे, त्यानंतर व्यापक मोर्चे आंदोलन करणे असा कार्यक्रम ठरविण्यात आला.
औद्योगिक प्रकल्पांना जमिनी गेल्यास येथील नागरिकांना भूमिहीन व्हावे लागणार आहे. आजपर्यंत स्वाभिमानाने जगणाऱ्या व्यक्तीला पुढे वर्षभर मजुरी करावी लागणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील नागरिकांनी आत्ताच सावध होण्याचे आवाहन जराते यांनी केले.
जमीन बचाओ समिती गठितया बैठकीला उपस्थित असलेल्या राजकीय पक्ष व संघटनांच्या सर्वपक्षीय प्रतिनिधींची जमीन बचाओ जनसंघर्ष समिती नियुक्त करण्यात आली. या समितीचे निमंत्रक म्हणून शेकापचे रामदास जराते, आझाद समाज पक्षाचे राज बन्सोड तर सदस्य म्हणून भाकपचे डॉ. महेश कोपूलवार, देवराव चवळे, माकपचे अमोल मारकवार, डॉ. धर्मराज सोरदे, समाजवादी पक्षाचे ईलियास खान, डोमाजी दिवटे, गोंडवाना गणतंत्र पक्षाचे प्रशांत मडावी, शेकापचे श्यामसुंदर उराडे, रमेश चौखंडे, ऋषी सहारे तर सल्लागार म्हणून अॅड. जगदीश मेश्राम, अॅड. सोनाली मेश्राम यांची निवड करण्यात आली.