दिलीप दहेलकरगडचिरोली : पावसाळ्यात हवेतील ओलावा वाढल्याने पावसादरम्यान डोळ्यांमध्ये संसर्ग पसरतो. डोळ्यांचा लालसरपणा, सूज, डोळ्यांतून पिवळा चिकट स्त्राव, डोळ्यांना खाज सुटणे, वेदनांशी संबंधित हे नेत्ररोगाचे सामान्य लक्षणे आहेत. सहज उपचार करण्यायोग्य ही एक डोळ्याची समस्या आहे. मात्र, यावर नेत्रतज्ज्ञांच्या सल्ल्याने लागलीच औषधोपचार करणे गरजेचे ठरते. पावसाळ्यामध्ये एकूणच आजारांचे प्रमाण वाढलेले असते. पाणी आणि पाण्यापासून होणारे आजार उद्भवतात. यात डोळ्यांमध्ये जंतूचा संसर्ग होऊन डोळे येणे, डोळे लाल होणे, खाजणे इत्यादी लक्षणे उद्भवतात.
घ्यावयाची खबरदारी..
- डोळ्यांमध्ये पावसाचे पाणी गेल्यास पुन्हा डोळे साध्या पिण्याच्या पाण्याने धुवावेत. डोळ्यांत चिकटपणा, घाण येत असल्यास मात्र नेत्रतज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. वेळेतच योग्य तो औषधोपचार करावा.
- रांजणवाडीचे प्रमाण जास्त पावसाळ्यामध्ये पापण्यांवर असल्याचे लक्षात येते. रांजणवाडी झाल्यास कोमट पाण्यात कापूस किंवा स्वच्छ कापड बुडवून त्या गरम कापसाने रांजणवाडीची गाठ शेकावी.
डोळ्यांना कोणताही जंतू संसर्ग झाल्यास किंवा काही त्रास असल्यास घरगुती उपचार न करता डॉक्टरांच्या सल्ल्याप्रमाणे औषधे वापरावीत.डोळ्यांचा मेकअप टाळावा कारण पावसाळ्यात डोळ्यांना संसर्ग होण्याची शक्यता जास्त असते. ओलावा आणि आर्द्रता यामुळे मेकअप वाहू शकतो आणि डोळ्यात जळजळ किंवा संसर्ग होऊ शकतो.- डॉ. अंकिता अद्वय अप्पलवार, नेत्रचिकित्सक, गडचिरोली.