कोरोनाकाळातही जिल्ह्यात २८ मुली झाल्या ‘सैराट’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2021 05:00 AM2021-02-24T05:00:00+5:302021-02-24T05:00:47+5:30
अल्पवयीन मुलींना प्रेमाच्या जाळ्यात ओढून लग्नाचे आमिष दाखवले जाते. त्याला बळी पडून काही मुली घराचा, समाजाचा विचार न करता एखाद्या युवकासोबत जाण्यास तयार होतात. १८ वर्षाच्या आतील मुली मानसिकदृष्ट्या परिपक्व नसल्यामुळे चांगले काय, वाईट काय याची जाण त्यांना पुरेशा प्रमाणात नसते. त्यामुळे अशा अल्पवयीन मुली स्वमर्जीने गेल्या तरी तिला घेऊन जाणाऱ्यावर पळवून नेल्याचा गुन्हा दाखल होतो.
लाेकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : युवकांच्या भूपथापांना बळी पडत अल्पवयीन मुली घरातून पळून जाण्याचे प्रमाण दोन वर्षांच्या तुलनेत २०२० मध्ये झाले आहे. कोरोनाकाळामुळे आलेल्या बंधनांचा हा परिणाम असण्याची शक्यता आहे. पण अशाही वातावरणात वर्षभरात २८ मुलींनी ‘सैराट’ होऊन बाहेरची वाट पकडली. त्यापैकी १९ जणींना परत घरी आणण्यात पोलिसांना यश आले. मात्र ९ जणींचा शोध अजूनही सुरूच आहे. या मुली घरातून जाण्याचे प्रमाण फेब्रुवारी आणि डिसेंबर महिन्यात सर्वाधिक होते.
अल्पवयीन मुलींना प्रेमाच्या जाळ्यात ओढून लग्नाचे आमिष दाखवले जाते. त्याला बळी पडून काही मुली घराचा, समाजाचा विचार न करता एखाद्या युवकासोबत जाण्यास तयार होतात. १८ वर्षाच्या आतील मुली मानसिकदृष्ट्या परिपक्व नसल्यामुळे चांगले काय, वाईट काय याची जाण त्यांना पुरेशा प्रमाणात नसते. त्यामुळे अशा अल्पवयीन मुली स्वमर्जीने गेल्या तरी तिला घेऊन जाणाऱ्यावर पळवून नेल्याचा गुन्हा दाखल होतो.
विशेष म्हणजे अल्पवयीन मुले पळून जाण्याचे प्रमाण अल्प आहे. वर्ष २०१८ मध्ये अल्पवयीन ४ मुले आणि ३१ मुली गायब झाले होते. त्या सर्वांना शोधून परत आणण्यात पोलिसांना यश आले. २०१९ मध्ये ६ मुले आणि ३८ मुली बेपत्ता झाले. त्यापैकी सर्व मुले आणि ३४ मुलींना पोलिसांनी हुडकून काढले. मात्र ४ जणींचा शोध अजूनही सुरू आहे.
२०२० मध्ये ३ मुले आणि २८ मुली गेल्या. त्यापैकी तीनही मुले आणि १९ मुलींना परत आणण्यात यश आले. चामोर्शी तालुक्यातील बंगाली गावांमध्ये हे प्रमाण जास्त असल्याचे दिसून येते. आजुबाजूच्या वातावरणाचा प्रभाव आणि मोबाईलचा अनियंत्रित वापर यासाठी कारणीभूत ठरत असून पालकांनी अधिक जागरूक राहण्याची गरज आहे.
१३ मुलींचा शोध सुरू
जिल्ह्यातील १३ मुलींचा अजूनही शोध लागलेला नाही. त्यात २०१९ मधील ४ आणि २०२० मधील ९ मुलींचा समावेश आहे. अनेक वेळा अल्पवयीन असलेल्या मुली लग्न करतात आणि १८ वर्ष पूर्ण झाल्यानंतरच समाजासमोर येतात. पण तरीही त्यांच्या जोडीदारावर अपहरणाचा गुन्हा कायम राहतो.
सर्व मुलांना हुडकून काढले
अल्पवयीन मुली प्रेमाच्या जाळ्यात ओढल्या गेल्याने जातात, तर मुले घरातील लोकांच्या रागावर किंवा बाहेरच्या दुनियेत काहीतरी करून दाखवायचे अशा जोशात दूरवर कुठेतरी जातात. अशा प्रकारे दुसऱ्या राज्यात गेलेल्याही मुलांना पोलिसांनी हुडकून काढत घरी आणले. तीन वर्षात १३ मुले गायब झाली होती. त्या सर्वांना शोधून काढण्यात आले.
अल्पवयीन मुला-मुलींना नैतिक शिक्षण आणि घरातील चांगले वातावरण देण्याची गरज आहे. कुटुंब, समाज याबद्दल सामाजिक भान राहिल असे संस्कार त्यांच्यावर झाले पाहिजे. मुलांच्या हाती स्मार्ट फोन देताना त्याचा वापर ते कसे करत आहेत यावरही पालकांचे नियंत्रण राहात नाही. त्यातून हे प्रकार वाढत आहेत.
- उल्हास भुसारी, प्रभारी, स्थानिक गुन्हे शाखा