कारवाफा नाल्यावरील पुलाची उंची वाढवा
धानोरा : कारवाफा नाल्यावरील पुलाची उंची वाढविण्यात यावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी प्रशासनाकडे केली आहे. पावसाळ्याच्या दिवसांत अनेकदा सदर मार्ग बंद असतो.
सायटोला मार्गावरील सती नदीवर पूल बांधा
कुरखेडा : तालुक्यातील अरततोंडी-सायटोला मार्गावरील सती नदीवर पूल बांधण्यात यावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. अरततोंडी ते सती नदीघाट हे अंतर जवळपास दोन किमी आहे.
चतुर्थ श्रेणी दर्जापासून कोतवाल वंचित
आष्टी : गावात दवंडी देणे, मृतदेहाची विल्हेवाट लावणे, शेतसारा जमा करणे, अशी विविध कामे करणाऱ्या जिल्हाभरातील साजा अंतर्गत कोतवालांना महिन्याकाठी अल्प मानधन दिले जात आहे. वारंवार मागणी करूनही कोतवालांना चतुर्थ श्रेणी दर्जा देऊन त्यांना नियमित वेतन देण्याकडे शासन दुर्लक्ष करीत आहे.
प्राचीन महादेवगडाला पर्यटनस्थळाचा दर्जा द्या
आरमोरी : पंचक्रोशीतील भाविकांचे श्रद्धास्थान असलेले आरमोरी येथील प्राचीन महादेवगड आजही उपेक्षितच आहे. राज्य शासन पर्यटनस्थळांच्या विकासासाठी लाखो रुपये खर्च करीत आहे; परंतु आरमोरी येथील प्राचीन महादेवगडाला पर्यटन स्थळाचा दर्जा देण्यात आला नाही.
अनेक ठिकाणचे दिशादर्शक फलक बेपत्ता
एटापल्ली : अहेरी उपविभागातील मार्गावर लावण्यात आलेले अनेक ठिकाणचे दिशादर्शक फलक बेपत्ता झाले आहे. यामुळे रात्री अनोळखी नागरिक तसेच वाहनचालक रस्ता विसरून भलतीकडेच वळतात. संबंधित यंत्रणेने अशा ठिकाणी दिशादर्शक फलक लावावे, अशी मागणी होत आहे; परंतु याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. परिणामी अपघाताची शक्यता बळावली आहे.
बाजारातील वजन काटे तपासणीकडे कानाडोळा
गडचिरोली : गडचिरोली येथे रविवारी भरणाऱ्या आठवडी बाजारात लाखो रुपयांची आर्थिक उलाढाल होते; मात्र या बाजारात अनेक विक्रेत्यांकडे असलेल्या वजनकाट्यांमध्ये प्रचंड तफावत असल्याचे दिसून येते. संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी आठवडी बाजारात वजन काटे तपासणीची मोहीम राबवावी, अशी मागणी होत आहे.
नळ पाणी पुरवठ्यासाठी टिल्लू पंपाचा वापर सुरूच
गडचिरोली : स्थानिक नगरपालिका प्रशासनाच्यावतीने दिवसातून दोनदा नळ पाणीपुरवठा नियमित केला जातो. मात्र रामनगर परिसरात काही नागरिक आपल्या घरच्या नळाला टिल्लू पंप लावत असल्याने इतर नागरिकांच्या नळातील पाणी प्रवाह कमी होतो. अनेकांना पुरेसे पाणीही मिळत नाही.
कोंडवाड्याची इमारत कोसळण्याच्या मार्गावर
अहेरी : पेरमिली ग्रामपंचायत अंतर्गत अनेक वर्षापूर्वी बांधण्यात आलेल्या कोंडवाड्याकडे स्थानिक प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्याने सध्य:स्थितीत पेरमिली येथील कोंडवाड्याची दूरवस्था झाली आहे. कोंडवाड्याची इमारत जीर्णावस्थेत आली असून, कधीही कोसळू शकते.
शहरातील नाल्यांची दुरूस्ती करा
गडचिरोली : शहरात अनेक नाल्यांच्या बाजूला असलेल्या रस्त्यांची वारंवार दुरुस्ती झाल्याने रस्ते उंच आणि नाल्या खाली गेल्या आहेत. शिवाय शहरातील रस्ते अरूंद असल्याने अनेक वाहनेही नालीत पडून अपघात होण्याची शक्यता असते. या नाल्यांवर कोणतेच आच्छादन नसल्यानेही किरकोळ अपघात घडतात.