आरमोरी : शहराच्या मध्यभागी असलेल्या रामसागर तलावात मोठ्या प्रमाणात घाण साचली आहे. याचा त्रास सभोवतालच्या नागरिकांना सहन करावा लागत आहे. शहराचे वैभव म्हणून ओळख असलेल्या रामसागर तलावाच्या साफसफाईकडे नगरपंचायतीने लक्ष देण्याची गरज आहे. न.प. प्रशासनाने लक्ष द्यावे.
घरपट्टे मिळण्यास विलंब
गडचिरोली : शहरात गोकुलनगर, रामनगर, इंदिरानगर, विवेकानंदनगर, विसापूर हेटी या परिसरात अतिक्रमण करून हजारो कुटुंब वास्तव्यास आहेत. मात्र अद्यापही जागेचे पट्टे देण्यात आले नाही. पंतप्रधान आवास योजनेंतर्गत घर बांधकामासाठी स्वत:च्या मालकीची जागा पाहिजे.
कृषिपंप अजूनही विजेच्या प्रतीक्षेत
कोरची : शासनाच्या कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांना विजेवर चालणारे मोटार पंप देण्यात आले. शेतकऱ्यांनी वीज जोडणीसाठी डिमांडची रक्कम भरली. मात्र दोन वर्षांचा कालावधी उलटूनही वीज जोडणी मिळाली नाही. शेतकरी कार्यालयात चकरा मारत आहेत.
वनखीतील पांदण रस्त्यावर खड्डे
ठाणेगाव : वनखी येथील खोब्रागडी नदीच्या रेती घाटाकडे ये-जा करणाऱ्या ट्रॅक्टरमुळे पांदण रस्त्यावर प्रचंड प्रमाणात खड्डे पडले आहेत. यामुळे शेतकऱ्यांना त्रास सहन करावा लागत आहे. रस्त्याची दुरूस्ती करण्याची गरज आहे. ही कामे पूर्ण करण्यासाठी आतापासून सुरूवात आवश्यक आहे.
मध संकलनाचे प्रशिक्षण देण्याची मागणी
धानोरा : जिल्ह्यात मध संकलनाला चांगला वाव आहे. ग्रामीण भागातील नागरिकांना मध संकलनाचे प्रशिक्षण दिल्यास चांगल्या दर्जाचे मध संकलन होण्यास मदत होईल. त्यामुळे मध संकलनाचे प्रशिक्षण देण्याची मागणी केली जात आहे. परंतु याकडे दुर्लक्ष असल्याचे दिसून येत आहे.
वीज चोरी वाढली
गडचिरोली : जिल्ह्यातील ग्रामीण भागात वीज चोरीच्या प्रमाणात वाढ झाली आहे. मात्र याकडे वीज वितरण कंपनीचे दुर्लक्ष होत असल्याने वीज महामंडळाचे लाखो रुपयाचे नुकसान होत आहे. मात्र वीज चोरीचा भुर्दंड इतर नागरिकांना सहन करावा लागत आहे. आकडा टाकून वीज चोरी केली जात आहे. याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.
परवाना शिबिराची गरज
एटापल्ली : तालुक्यातील ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर ट्रॅक्टरची संख्या वाढली आहे. वाहतूक विषयाचे कुठलेही ज्ञान व नियम अवगत नसलेले तरूण ट्रॅक्टर चालवितात. ट्रॅक्टर उलटून आजवर जिल्ह्यात अनेकांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे ट्रॅक्टर चालकांसाठी परवाना शिबिर भरविण्याची गरज आहे, अशी प्रतिक्रिया व्यक्त हाेत आहे.
कचऱ्याचे व्यवस्थापन करा
आरमोरी : शहरासह तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या क्षेत्रात कचरा व्यवस्थापनाचे काम रखडलेले आहे. त्यामुळे अनेक गावांच्या बाहेर कचऱ्याचे ढीग नेऊन टाकले जातात. येथे अस्वच्छता पसरली आहे. त्यामुळे राेगराई पसरण्याची शक्यता नाकारता येत नाही. प्रशासनाने लक्ष घालून कचऱ्याचे व्यवस्थापन करावे.
अनावश्यक फलक हटवा
गडचिरोली : येथील इंदिरा गांधी चौकात अनेक अनावश्यक बॅनर्स, फलक लावण्यात आले आहेत. त्यामुळे चौकातील सौंदर्यीकरणाला बाधा येत आहे. त्यामुळे सदर फलक हटविण्याची मागणी आहे. बॅनर्समुळे चौकाच्या सौंदर्यीकरणात बाधा येत आहे. त्यामुळे स्थानिक प्रशासनाने कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
उद्याेग उभारण्याची मागणी
भामरागड : छत्तीसगड सीमेला लागून असलेल्या भामरागड तालुक्यात उद्याेगधंदे नसल्याने युवकांना बाहेरगावी भटकंती करावी लागत आहे. वारंवार मागणी करुनही याबाबत अंमलबजावणी करण्यात आली नाही. त्यामुळे बेराेजगार युवक बाहेर स्थलांतर करीत आहेत. त्यामुळे उद्याेग उभारावे, अशी मागणी आहे.
रेपनपल्लीचा पूल जीर्ण
कमलापूर : कमलापूर ते रेपनपल्ली या तीन किमीच्या रस्त्यावरील डांबर जागोजागी उखडले आहे. आतील दगड व गिट्टी बाहेर आली आहे. तसेच या रस्त्यावर असलेले पूल सुध्दा जीर्ण अवस्थेत आहे. सदर पुलाची उंची कमी आहे. त्यामुळे या पुलावरून पावसाळ्यात पाणी राहते. येथे नवीन पुलाची गरज आहे.