लोकमत न्यूज नेटवर्कचामोर्शी : सकाळी कॉलेजला जाते म्हणून घरातून गेलेल्या मुलीने दुपारी शेतात काम करणाऱ्या पित्याला अनोळखी क्रमांकावरून कॉल करून बाबा, मला शोधू नका, मी बाहेरगावी जात आहे, असे म्हणून मोबाइल बंद केला. त्यानंतर ती बेपत्ता झाली. ही घटना दि. २५ जून रोजी घडली. सर्वत्र शोध घेऊनही न सापडल्याने अखेर वडिलांनी चामोशी ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात अपहरणाचा गुन्हा नोंदविला.
पोलिसांच्या माहितीनुसार, बेपत्ता मुलीचे १७ वर्षे आठ महिने एवढे वय आहे. ती चामोर्शी तालुक्याच्या एका गावखेड्यातून चामोर्शी शहरात शिक्षणासाठी रोज एसटी बसने ये-जा करायची. बारावी उत्तीर्ण झाल्यानंतर तिने बीए प्रथम वर्षाला चामोर्शीतीलच एका महाविद्यालयात प्रवेश घेतला होता. दि. २५ जून रोजी सकाळी ९ वाजता कॉलेजला कॉलेजला जाण्यासाठी म्हणून ती घराबाहेर पडली. तिचा भाऊ व बहीण हेदेखील शाळेत गेले. आई-वडील कापूस लागवडीसाठी शेतात गेले होते.
दुपारी ४ वाजता वडिलांना अनोळखी क्रमांकावरून कॉल आला. समोरून मुलीचा आवाज कानी पडला, 'बाबा, मला शोधू नका, मी बाहेरगावी जात आहे.' एवढेच शब्द तिने उच्चारले. वडिलांना काही बोलण्याची संधीही न देता तिने कॉल ठेवला व मोबाइल बंद करून टाकला.
'ती' कशी असेल, कुठे असेल, आई-वडिलांच्या काळजाचा चुकला ठोका
- घरात दोन मुली, एक मुलगा अशा तीन अपत्यांना चांगले शिक्षण देऊन स्वतःच्या पायावर उभे करण्यासाठी आई-वडिलांची धडपड सुरू होती. मुलीच्या कॉलनंतर वडिलांच्या काळजाचा ठोका चुकला. त्यांनी त्या क्रमांकावर वारंवार कॉल करण्याचा प्रयत्न केला, पण मोबाइल बंद होता, त्यामुळे संवाद होऊ शकला नाही.
- सर्वत्र शोधूनही मुलगी न सापडल्याने अखेर हतबल वडिलांनी चामोर्शी ठाण्यात फिर्याद दिली. अज्ञात व्यक्त्तीने तिला फूस लावून पळविल्याचे वडिलांनी दिलेल्या फिर्यादीत नमूद आहे. ती कुठे आहे, कशी आहे, या काळजीने आई-वडील चिंतेत आहेत. तपास हवालदार अर्चना रणदिवे करत आहेत.