गडचिरोली जिल्ह्यातील शेकडो तरुण-तरुणी नोकरीच्या मागे न लागता स्वतःच्या अंगभूत असलेल्या कलेवर जगत आहेत. मात्र याचा शासन, प्रशासनाला विसर पडला आहे. नृत्य करणारे अनेक कलावंत कलेच्या दुर्दम्य इच्छाशक्तीवर आणि कलेच्या क्षेत्रात स्वकर्तृत्वाने मापदंड प्रस्थापित करण्याच्या ध्येयाने प्रेरित होऊन जगत आहेत. गेल्या दशकभरात महाराष्ट्रातील अनेक नृत्य कलाकारांनी टीव्हीवरील कार्यक्रमात भाग घेऊन सर्वाधिक टीआरपी खेचून आणून अनेक चॅनेलला लाखो रुपयांचे उत्पन्न मिळवून देत आहेत. मात्र सरकारने नृत्य कलाकारांना वाऱ्यावर सोडले आहे.
नृत्य ही कला महाराष्ट्रातील लोककलेतील एक प्रमुख कला आहे. आपल्या भूप्रदेशाची लोककला व संस्कृती जपणे हे सरकारचे काम आहे. त्यामुळे दोनवेळच्या पोटाच्या भाकरीसाठी आणि आपल्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी धडपडणाऱ्या नृत्य कलावंतांना शासनाने आधार द्यावा, त्यांना मदत करावी, अशी मागणी राज्य नृत्य परिषदेच्या जिल्हाध्यक्ष प्रेरणा लोकेश गारोदे यांनी केली आहे.