लोकमत न्यूज नेटवर्कआष्टी (जि. गडचिरोली) : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढलेला असताना आणि गावात तापाची साथ सुरू असताना गावकऱ्यांनी देवीला साकडे घालत आरोग्य विभागाच्या तपासणीला नकार दिला. गावकऱ्यांच्या या अंधश्रद्धेपुढे आरोग्य विभागाचे पथकही हतबल झाले आहे. हा प्रकार जैरामपूर या गावात घडला.गावात आठवडाभरापासून बहुतांश लोकांना ताप आला असल्याने हा दैवी प्रकोपच असावा, या समजापोटी गावकऱ्यांनी देवीला
साकडे घालण्याचे ठरवले. या परिसरातील गावखेड्यात संकटकाळात माऊलीला (देवी) पाणी घालण्याची प्रथा आहे. त्यानुसार गावातील महिलांनी नदीवरून कळशीत पाणी भरून वाजतगाजत आणून माऊलीला अर्पण केले. दोन किंवा पाच दिवस माऊलीला पाणी अर्पण केले म्हणजे ताप जातो, अशी या लोकांची समजूत आहे. सध्या कोरोनाचे रुग्ण अनेक गावांत पसरले आहेत. तरीही हा ताप कोरोनाचा नाही अशी गावकऱ्यांची समजूत आहे. हा प्रकार अंधश्रद्धेला खतपाणी घालणारा असल्याचे अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे विलास निंबोरकर यांनी सांगितले.
२० जण पॉझिटिव्हजैरामपूर गावात तापाची साथ पसरल्यानंतर २७ एप्रिलला आरोग्य कर्मचाऱ्यांनी गावात सर्व्हेक्षण केले. २९ एप्रिलला ५० लोकांची कोरोना चाचणी केली असता २० जण पॉझिटिव्ह आले. मात्र, गावकरी शाळेत थांबायला तयार नव्हते. त्यामुळे नाईलाजाने त्यांना त्यांच्याच घरात ठेवण्यात आले.