चामोर्शीचा विकास ‘जैसे थे’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2020 05:00 AM2020-02-18T05:00:00+5:302020-02-18T05:00:59+5:30
नगर पंचायत निवडणुकीला उभ्या असलेल्या सर्व प्रभागातील उमेदवारांनी नागरिकांनी विविध आश्वासने देऊन नगरसेवकपद पदरात पाडून घेतले. मात्र त्यांनी दिलेली आश्वासने पूर्ण होऊ शकली नाही. कुरखेडा, भामरागड, सिरोंचा, मुलचेरा यासारख्या लहान ग्रामपंचायतींनी हायमास्ट दिवे लावले आहेत.
रत्नाकर बोमिडवार ।
लोकमत न्यूज नेटवर्क
चामोर्शी : चार वर्षांपूर्वी चामोर्शी ग्रामपंचायतीला नगर पंचायतीचा दर्जा देण्यात आला. नगर पंचायत स्थापन झाल्यानंतर विकास होईल, अशी अपेक्षा होती. मात्र पाच वर्षात विकासाला पाहिजे त्या प्रमाणात गतीच मिळू शकली नसल्यामुळे विद्यमान नगरसेवकांना नागरिकांच्या असंतोषाला तोंड द्यावे लागत आहे.
नगर पंचायत निवडणुकीला उभ्या असलेल्या सर्व प्रभागातील उमेदवारांनी नागरिकांनी विविध आश्वासने देऊन नगरसेवकपद पदरात पाडून घेतले. मात्र त्यांनी दिलेली आश्वासने पूर्ण होऊ शकली नाही. कुरखेडा, भामरागड, सिरोंचा, मुलचेरा यासारख्या लहान ग्रामपंचायतींनी हायमास्ट दिवे लावले आहेत. परंतु चामोर्शी शहरात वेळोवेळी मागणी होऊनही अजूनपर्यंत लख्ख प्रकाश देणारे हायमास्ट लावण्यात आले नाही. शहराची लोकसंख्या लक्षात घेता जनतेला पुरेसा पाणीपुरवठा होण्यासाठी पाणी टाक्यांची संख्या वाढविणे आवश्यक होते. मात्र पाणी टाक्यांचे बांधकामही झाले नाही. परिणामी अजूनही काही वॉर्डांना पुरेसा पाणीपुरवठा होत नाही. काही कुटुंबांना तर दिवसातून एक ते दोन गुंड पाणी मिळते. मूल शहराच्या धर्तीवर शहरात सिमेंटचे रस्ते बांधले जातील, भूमिगत गटार लाईनचे काम होईल, प्रत्येक वॉर्डात बालोद्यान, बगीचा, क्रीडा संकूल, बसस्थानक, एमआयडीसी स्थापन केली जाईल. नवीन वस्त्यांमध्ये नाली व रस्त्यांचे बांधकाम करण्याला प्राधान्य दिले जाईल, अशी आश्वासने नगरसेवकांनी आपापल्या प्रभागातील नागरिकांना दिली होत्ी. मात्र ही आश्वासने पूर्ण होऊ शकली नाहीत.
पुढील पाच महिन्यांत नगर पंचायतीची निवडणूक होणार आहे. उर्वरित पाच महिन्यांत ही सर्व आश्वासने पूर्ण करणे जवळपास कठीणच होणार आहे. आश्वासने पूर्ण झाली नसल्याचे नगरसेवकांच्या लक्षात आल्यानंतर निवडणुकीला समोरे जाताना पुन्हा नवीन फंडे नगरसेवकांनी शोधायला सुरूवात केली आहे. स्वच्छ व सुंदर चामोर्शी शहराची संकल्पना मागे पडत चालली आहे. ठिकठिकाणी कचऱ्याची ढिगारे निर्माण झाली असल्याचे दिसून येत आहे. नगर पंचायतीची स्थापना होऊन साडेचार वर्षांचा कालावधी उलटला तरी ज्या गतीने विकासकामे होणे अपेक्षित होते, ती गती तर दूर कामे अजूनपर्यंत मंजूरही झाली नाहीत.
निवडणुकीच्या तोंडावर झाली गोची
चामोर्शी नगर पंचायतीच्या निवडणुका काही महिन्यातच होतील. पण गेल्या निवडणुकीपूर्वी दिलेली आश्वासने पूर्ण झाली नसल्याने विद्यमान नगरसेवकांची गोची झाली आहे. पुढील निवडणूक नेमक्या कोणत्या मुद्यावर लढायची असा प्रश्न नगरसेवकांसमोर उपस्थित झाला आहे. निवडणूक लढण्यासाठी इच्छुक असलेले इतर नागरिक निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. मात्र विद्यमान नगरसेवकांना स्वत:चा प्रचार करताना अनेक अडचणी येत आहेत.