अहेरी : राज्य परिवहन महामंडळाची बस व दुचाकीमध्ये अपघात झाल्याने दोघेजण जखमी झाल्याची घटना बुधवारी दुपारी १.३० वाजताच्या सुमारास आलापल्ली-अहेरी बायपास मार्गावर घडली. एमएच-०६-८८३७ क्रमांकाची गोंडपिपरी-मुलचेरा-अहेरी ही बसफेरी आलापल्लीवरून अहेरीकडे येत होती. दरम्यान डावीकडून उजवीकडे मुख्य मार्गावर एमएच-३३-पी-६०३८ क्रमांकाची दुचाकी येत होती. सदर दुचाकी बसच्या समोरील चाकात सापडली. यात दुचाकीस्वार हरीदास सोमा आत्राम (३२) रा. किष्टापूर (वेलगूर) व सदाशिव दशरथ आत्राम (४५) रा. किष्टापूर हे दोघेजण जखमी झाले. हरिदास आत्राम याच्या डोक्याला जबर मार लागला तर सदाशिव आत्राम याच्या पायाला दुखापत झाली. या दोन्ही जखमींना बसचालक विलास शंकर गेडाम व राज्य परिवहन महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी उपचारासाठी अहेरीच्या उपजिल्हा रुग्णालयात आणले. येथे प्रथमोपचार झाल्यानंतर या दोघांनाही पुढील उपचारासाठी गडचिरोलीच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले आहे. (तालुका प्रतिनिधी)
बस अपघात दोन जण जखमी
By admin | Updated: February 23, 2017 01:18 IST