कलावंतांचे अर्ज चार वर्षांपासून धूळखात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2021 04:36 IST2021-02-13T04:36:16+5:302021-02-13T04:36:16+5:30

लाेकमत न्यूज नेटवर्क गडचिराेली : कलेच्या माध्यमातून हजाराे नागरिकांच्या चेहऱ्यावर हास्य फुलविणाऱ्या कलावंताला उतारवयात समाधानाचे जीवन जगता यावे, यासाठी ...

Artist applications have been in the dust for four years | कलावंतांचे अर्ज चार वर्षांपासून धूळखात

कलावंतांचे अर्ज चार वर्षांपासून धूळखात

लाेकमत न्यूज नेटवर्क

गडचिराेली : कलेच्या माध्यमातून हजाराे नागरिकांच्या चेहऱ्यावर हास्य फुलविणाऱ्या कलावंताला उतारवयात समाधानाचे जीवन जगता यावे, यासाठी राज्य शासनामार्फत साहित्य व कलावंतांना मानधन दिले जाते. या मानधनासाठी जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागाकडे सुमारे २५० कलावंतांनी अर्ज केले आहेत. मात्र चार वर्षांपासून पालकमंत्र्यांनी निवड समितीचे गठण केले नाही. त्यामुळे हे संपूर्ण अर्ज चार वर्षांपासून समाज कल्याण विभागाकडे पडून आहेत. त्यामुळे कलावंतांना मानधनापासून वंचित राहावे लागते. वृद्ध साहित्यिक व कलाकारांना यापूर्वी जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागामार्फत मानधन दिले जात हाेते. आता हे मानधन संचालक कार्यालयामार्फत दिले जाते. कलावंतांना पूर्वीप्रमाणेच जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागाकडे अर्ज सादर करावे लागतात. अर्जांची निवड करण्यासाठी जिल्हास्तरीय समिती गठीत करावी लागते. ही समिती गठीत करण्याचे अधिकार पालकमंत्र्यांना देण्यात आले आहेत. मात्र नवीन सरकारच्या कालावधीत समितीचे गठण झाले नाही. तसेच यापूर्वीच्या सरकारच्या कालावधीतही अर्जांवर विचार झाला नाही. त्यामुळे चार वर्षांपासून अर्ज समाज कल्याण विभागाकडे पडून आहेत. शेवटची निवड प्रक्रिया मार्च २०१७ मध्ये पार पडली.

बाॅक्स

कलावंत निवडीचे निकष

साहित्य व कला क्षेत्रात ज्यांनी माेलाची भर घातली आहे. किमान १५ ते २० वर्ष इतक्या कालावधीसाठी कामगिरी केली आहे. लाभार्थी कलाकार व साहित्यिकांचे वय ५० वर्षांपेक्षा जास्त असावे. साहित्यिक व कलावंत यांच्या निधनानंतर विधवा पत्नी, विधूर पती यांना मानधन मिळेल. ४० टक्केपेक्षा जास्त अपंगत्व आल्याने ते स्वत:चा व्यवसाय करू शकत नाही. पुरूषांना वयाची अट शिथिल राहील. साहित्यिक व कलावंताचे सर्व मार्गांनी मिळून वार्षिक उत्पन्न ४८ हजारांपेक्षा जास्त असू नये.

मिळणारे मानधन

राष्ट्रीय पातळीवरील कलावंत ३१५०

राज्यस्तरावरील कलावंत २७००

जिल्हास्तरावरील कलावंत २२५०

अशी आहे निवड प्रक्रिया

पंचायत समिती किंवा जिल्हा परिषदेत या संबंधिच्या अर्जाचा नमुना उपलब्ध आहे. या नमुन्यावर वृद्ध साहित्यिकाचा पासपाेर्टच्या आकाराचा फाेटाे, त्याच्या कुटुंबाची माहिती. तहसीलदारांकडून उत्पन्नाचा दाखला, कलेचा प्रकार, किती वर्षांपासून कलेत कार्यरत आहे याची माहिती, कला क्षेत्राचे पुरावे म्हणून लेखनाची कात्रणे, कलावंतांच्या कार्यक्रमांची छायाचित्रे, वृत्तपत्रीय बातम्या, जाहिराती, आकाशवाणी अथवा दूरदर्शनवरील कार्यक्रमाचे पुरावे, निमंत्रणपत्रिका आदी पुरावे म्हणून जाेडता येतील.

काेट

विद्यमान पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे समिती गठीत करण्याबाबतचे पत्र दिले आहे. लवकरच समितीचे गठण हाेऊन अर्ज निकाली लागतील. प्रत्येक वर्षी ६० अर्ज निवडून त्यांना मानधन देता येते. मागील चार वर्षांमध्ये निवड झाली नसल्याने यावर्षांचा विचार करता २४० अर्ज मानधनासाठी पात्र ठरतील. वृद्ध कलावंतांनी अर्ज सादर करावेत.

- सुरेश पेंदाम, जिल्हा समाज कल्याण अधिकारी गडचिराेली

Web Title: Artist applications have been in the dust for four years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.