चामोर्शी : अनेकदा जिल्हा परिषद व पंचायत समिती प्रशासनाकडे लेखी निवेदनाद्वारे मागणी करूनही राममोहनपूर जि. प. शाळेला शिक्षक देण्यात आले नाही. परीक्षेचा कालावधी येताच संतप्त पालकांनी शाळा व्यवस्थापन समितीच्या सहकार्याने आज बुधवारला शाळेतील शिक्षक व विद्यार्थ्यांना बाहेर काढून चक्क शाळेला कुलूप ठोकले. यामुळे शैक्षणिक वर्तुळात खळबळ निर्माण झाली आहे.चामोर्शी पंचायत समितीअंतर्गत राममोहनपूर या गावात जिल्हा परिषदेची १ ते ८ वर्गापर्यंतची उच्च प्राथमिक शाळा आहे. या शाळेत एकूण १०६ विद्यार्थी आठही वर्गात शिक्षण घेत आहेत. मात्र अर्धेअधिक सत्र संपूणही राममोहनपूर शाळेला नवे शिक्षक देण्यात आले नाही. यासंदर्भात शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मनोज मुरारी सरकार व अन्य पदाधिकाऱ्यांनी अनेकदा जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या शिक्षण विभागाकडे राममोहनपूर शाळेत तत्काळ नव्या शिक्षकांची नियुक्ती करावी, अशी मागणी लेखी निवेदनाद्वारे केली. याशिवाय पालकांनीही अधिकाऱ्यांकडे शिक्षक नियुक्त करण्याची मागणी लावून धरली होती. मात्र एकाही अधिकाऱ्यांनी दखल घेऊन राममोहनपूर शाळेत नव्या शिक्षकाची नियुक्ती केली नाही. राममोहनपूर शाळेत वर्षभरापासून दोनच शिक्षक कार्यरत असून त्यांना १ ते ८ वर्ग सांभाळण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे. नक्षलबहूल दुर्गम भागातील राममोहनपूर या जिल्हा परिषद शाळेकडे अधिकारी व लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप पालकांनी केला आहे. जोपर्यंत राममोहनपूर जि. प. शाळेला नवे शिक्षक नियुक्त करण्यात येणार नाही, तोपर्यंत शाळेचे कुलूप उघडणार नाही, असा इशारा शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मनोज मुरारी सरकार यांनी दिला आहे. याप्रसंगी शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य उदय निरंजय मिस्त्री, राजकुमार सरकार, तरूण मल्लीक, सपना सरकार, तंटामुक्त समितीचे सदस्य सुकुमार सरकार, वरूण मल्लीक, अधिर मिस्त्री, प्रकाश सरकार, विमल हलदार, आशुतोष सरकार, सुमंत सयाम, सपना सरकार, चंचला देवयान, संध्या तरफदार, चंपा सरकार, रेखा मल्लीक, विशाखा दास, अंजना चौकीदार, दीपाली सरकार आदींसह बहुसंख्य पालक उपस्थित होते. शाळेला कुलूप ठोकल्यामुळे शाळेतील विद्यार्थ्यांनी घरी पळ काढला. (तालुका प्रतिनिधी)
संतप्त पालकांनी जि. प. शाळेला ठोकले कुलूप
By admin | Updated: December 18, 2014 01:06 IST