लोकमत न्यूज नेटवर्कआरमाेरी : तालुक्यात २९ ग्रामपंचायतींच्या २६३ जागांसाठी मतदान हाेणार आहे. या ग्रामपंचायतीमध्ये एकूण ५२ हजार ६०४ मतदार आहेत. ९४ मतदान केंद्रांवरून मतदान हाेणार आहे. आरमाेरी तालुक्यात ३० ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला हाेता. मात्र, नरचुली ग्रामपंचायतीचे विभाजन हाेऊन जांभळी ही नवीन ग्रामपंचायत अस्तित्वात येणार असल्याने नरचुली ग्रामपंचायतीची निवडणूक आयाेगाने रद्द केली आहे. त्यामुळे आता १५ जानेवारीला २९ ग्रामपंचायतींच्या २६३ जागांसाठी मतदान हाेणार आहे. १४६ जागा महिलांकरिता राखीव ठेवण्यात आल्या आहेत. मतदानाला आता १५ दिवसांचा कालावधी शिल्लक असल्याने राजकीय वातावरण तापण्यास सुरुवात झाली आहे. ग्रामविकासाचा महत्त्वाचा कणा म्हणून ग्रामपंचायतकडे बघितले जाते. त्यामुळे ग्रामपंचायतीच्या निवडणुकीलाही महत्त्व प्राप्त झाले आहे. तालुक्यातील ग्रामपंचायतींमध्येसुद्धा पॅनल लढविले जात आहेत. अनेक पॅनल राजकीय पक्षांचे आहेत. ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत राजकीय पक्षापेक्षा उमेदवार बघून मतदान केले जात हाेते. मात्र, गावातील गटांनी पॅनल तयार केले असल्याने गावातही राजकीय पक्षांचा प्रवेश झाला आहे. प्रत्येक ग्रामपंचायतीत पुरुषांपेक्षा महिला सदस्यांची संख्या अधिक आहे. त्यामुळे ग्रामपंचायतीचे राजकारण महिलांच्या भाेवती फिरणार आहे. आजपर्यंतच्या अनेक महिलांनी ग्रामपंचायत सक्षमरीत्या सांभाळल्या आहेत. शेतीची कामे जवळपास संपली असल्याने ग्रामीण भागातील मतदार पूर्णवेळ ग्रामपंचायतीच्या राजकारणात लक्ष घालत आहेत.
प्रशासन सज्ज२९ ग्रामपंचायतींमध्ये काही ग्रामपंचायती माेठ्या आहेत. अशा ग्रामपंचायतींमध्ये दाेन ते तीन मतदान केंद्र ठेवण्यात आले आहेत. तालुकाभरात एकूण ९४ मतदान केंद्र आहेत. निवडणूक शांततेत पार पडावी, यासाठी प्रशासनामार्फत प्रयत्न केले जात आहेत. एकूण ५२ हजार ६०४ मतदार आहेत. त्यामध्ये २६ हजार १४२ महिला व २६ हजार ४६२ पुरुष मतदारांची संख्या आहे. यामध्ये जवळपास १० टक्के नवीन मतदार आहेत. हे नवीन मतदार तरुण उमेदवारालाच पसंती दर्शवित आहेत. त्यामुळे नवीन मतदारांचेही मत अतिशय महत्त्वाचे ठरणारे आहे.