तीन वर्षात १९ हजार हेक्टर जंगलाला आग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2020 05:00 AM2020-03-06T05:00:00+5:302020-03-06T05:00:30+5:30

गडचिरोली जिल्ह्यात एकूण ११ लाख ८७ हजार ६०२ हेक्टर क्षेत्र जंगलव्याप्त आहे. दुर्गम भागात मोहाची व तेंदूची झाडे मोठ्या प्रमाणात आहेत. या दोन झाडांच्या भरवशावर दुर्गम भागातील नागरिकांना जवळपास चार महिन्यांचा रोजगार उपलब्ध होतो. एकूण उत्पन्नात या दोन घटकांचा वाटा जवळपास निम्मा आहे. मार्च महिन्यापासून मोहफूल पडण्यास सुरूवात होतात.

19 thousand hectares of forest fire in three years | तीन वर्षात १९ हजार हेक्टर जंगलाला आग

तीन वर्षात १९ हजार हेक्टर जंगलाला आग

Next
ठळक मुद्देवनविभाग सतर्क : २०१९ मध्ये सर्वाधिक घटना, यावर्षीही फायरलाईनवर भर

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : जंगलांना आगी लागू नये यासाठी वनविभागामार्फत अनेक उपाययोजना केल्या जात असल्या तरी उन्हाळ्यात आगी लागतातच. २०१७ ते २०१९ या तीन वर्षांच्या कालावधीत ४ हजार ७५० आगीच्या घटनांची नोंद करण्यात आली आहे. यामध्ये १८ हजार ६७२ हेक्टर जंगल आगीच्या भक्षस्थानी सापडले.
गडचिरोली जिल्ह्यात एकूण ११ लाख ८७ हजार ६०२ हेक्टर क्षेत्र जंगलव्याप्त आहे. दुर्गम भागात मोहाची व तेंदूची झाडे मोठ्या प्रमाणात आहेत. या दोन झाडांच्या भरवशावर दुर्गम भागातील नागरिकांना जवळपास चार महिन्यांचा रोजगार उपलब्ध होतो. एकूण उत्पन्नात या दोन घटकांचा वाटा जवळपास निम्मा आहे. मार्च महिन्यापासून मोहफूल पडण्यास सुरूवात होतात. मोहफूल पडण्यापूर्वी मोहाच्या झाडाची तसेच इतर झाडांची पाने गळतात. त्यामुळे झाडाखाली मोठ्या प्रमाणात सुकलेल्या पानांचा खच जमा होतो.
पालापाचोळ्यामुळे मोहफूल वेचने कठीण होत असल्याने पालापाचोळा जाळण्यासाठी आग लावली जाते. मात्र आगीवर कुणाचेही नियंत्रण राहात नाही. पुढे ही आग जंगलात पसरून उग्ररूप धारण करते. तेंदूपत्त्याच्या हंगामाला मे महिन्यात सुरूवात होते. तेंदूपत्त्याची पाने चांगली येण्याच्या उद्देशाने गावकरी किंवा कंत्राटदार जंगलांना आगी लावत असल्याचे दिसून येते. मे महिन्यात मोठ्या प्रमाणात ऊन असल्याने आग लवकरच उग्ररूप धारण करते.
२०१७ मध्ये आग लागल्याच्या ९३७ घटना घडल्या. त्यामध्ये १ हजार ८२९ हेक्टर क्षेत्र जळून खाक झाले. २०१८ मध्ये १ हजार ३४२ आगीच्या घटना घडल्या. त्यामध्ये २ हजार ६८३ हेक्टर क्षेत्र जळाले तर २०१९ मध्ये सर्वाधिक २ हजार ४७१ घटनांमध्ये १४ हजार १६० हेक्टर क्षेत्रावरील जंगल जळाले आहे.
आगीच्या घटनांमुळे जंगल व जैवविविधतेचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. त्यामुळे आगीच्या घटना घडू नये यासाठी वनविभाग सतर्क आहे. ग्रामीण भागात कार्यक्रम घेऊन जनजागृती केली जात आहे. तसेच आगी न लावण्याचे आवाहन केले जात आहेत. फायरलाईन आखली जात आहे.

मार्च व एप्रिल महिन्यात लागतात जास्त आगी
फेब्रुवारी ते जून या कालावधीत उन्हाळा राहते. तसेच मार्च महिन्यात मोहफूल पडण्यास सुरूवात होते. ग्रामीण व दुर्गम भागातील नागरिक मोह संकलन करीत असतात. मोहफूल वेचण्यासाठी मोहफुलाच्या झाडाखाली आग लावली जात असल्याने मार्च व एप्रिल महिन्यात सर्वाधिक आगी लागत असल्याचे दिसून येते. २०१७ मध्ये मार्च महिन्यात आग लागण्याच्या ४०९ तर एप्रिल महिन्यात ४९३ घटना घडल्या आहेत. २०१८ मध्ये मार्च महिन्यात ९१८ व एप्रिल महिन्यात ३८०, तर २०१९ मध्ये मार्च महिन्यात १ हजार २९२ आणि एप्रिल महिन्यात ९६० घटना घडल्या आहेत.

सॅटेलाईटमुळे कळते वेळीच माहिती
जंगलात लागणाऱ्या प्रत्येक आगीची घटना सॅटेलाईटमार्फत फॉरेस्ट सर्वे आॅफ इंडियाला कळते. सदर विभाग जिल्ह्यातील प्रमुख अधिकाऱ्यांना याची माहिती पोहोचविते. नेमकी कोणत्या बिटमध्ये आग लागली याबाबतचा संदेश पाठविला जाते. सदर संदेश संबंधित वनपरिक्षेत्राधिकारी, वनरक्षक, वनपाल यांना पाठवून सतर्क केले जाते. त्याचवेळी वनरक्षक त्या ठिकाणी पोहोचून आगीवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न करते. मात्र गडचिरोली जिल्ह्याचा बहुतांश भाग आदिवासीबहुल आहे. तसेच अतिशय घनदाट जंगल आहे. त्यामुळे रात्रीच्या वेळी आग लागल्याचे माहित झाले तरी त्या ठिकाणी पोहोचणे कठीण होत असल्याने काहीही उपाययोजना अशक्य होतात. परिणामी आग विस्तारत जाते असे अधिकाºयांनी सांगितले.

Web Title: 19 thousand hectares of forest fire in three years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :forestजंगल