"कायद्याच्या ताब्यात गेला, आता तो नराधम जगणार...", प्रवीण तरडेंनी व्यक्त केली खंत
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2026 13:37 IST2026-05-03T13:36:50+5:302026-05-03T13:37:40+5:30
प्रवीण तरडेंची तीव्र प्रतिक्रिया, म्हणाले...

"कायद्याच्या ताब्यात गेला, आता तो नराधम जगणार...", प्रवीण तरडेंनी व्यक्त केली खंत
पुण्यातील भोर येथील नसरापूर भागात एका साडेतीन वर्षांच्या चिमुकलीवर ६५ वर्षांच्या नराधमाने लैंगिक अत्याचार केला. या नंतर सध्या महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे. ग्रामस्थांनी पुण्यात रास्ता रोको आंदोलन केलं आहे. नराधमाला तात्काळ फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी सर्व करत आहेत. अनेकांनी सोशल मीडियावर संताप व्यक्त केला आहे. अभिनेता, दिग्दर्शक प्रवीण तरडेंचीही पोस्ट काल व्हायरल झाली होती. आता त्यांनी सविस्तर प्रतिक्रिया देत एक खंत व्यक्त केली आहे.
'लोकमत'ला दिलेल्या मुलाखतीत नसरापूर प्रकरणावर प्रवीण तरडे म्हणाले, "कालच्या घटनेने अस्वस्थ होऊन मी ती पोस्ट केली होती. हे भयाण आहे. ज्यांच्या घरात मुली आहेत त्या पालकांना विचारा आत्ता त्यांची अवस्था काय आहे? लोक घाबरायला लागले आहेत. उद्विग्न होऊन ती पोस्ट केली. या नराधमाला खरं तर लोकांनी पकडल्या पकडल्या मारुन टाकायला हवं होतं. जागेवरच संपवायला पाहिजे होता. पण आता तो कायद्याच्या ताब्यात गेला. ती कायदेशीर प्रक्रिया आली. आता काय होणार? दिवेघाट, मालेगाव, अमरावती, कोपर्डी प्रकरणात काय झालं? आता थोडीच त्याला शिक्षा होणार आहे...आता हे सगळं लांबणार. तो नराधम जगणार. मरेपर्यंत जेलमध्ये जगणार. त्याला जागेवरच संपवायला हवं होतं."
दुसऱ्या एका मुलाखतीत ते म्हणाले, "कसं आहे ना महाराजांच्या काळात जी चौरंग करण्याची पद्धत होती तीच योग्य आहे. मी तर म्हणतो लोकांना सापडला तेव्हाच त्याला चेचायला हवा होता. त्याचा जो कोण खून करेल त्याला आमदार खासदार करा अशी वेळ आली आहे. आता सरकार, कायदा सगळी प्रक्रिया आली. याआधी इतक्या केसेस झाल्या, कुठे आहेत ते नराधम? जिवंत आहेतच ना...वेळीच यांना ठेचलं पाहिजे. फडणवीस साहेब हे बुद्धिमान व्यक्ती आहेत. ते कायद्याच्या चौकटीतच राहून काम करणार. पण सरकारमध्ये एकनाथ शिंदे साहेब आहेत की. आनंद दिघे साहेबांचे ते शिष्य आहेत. दिघे साहेबांच्या दरबारात अशा लोकांना संपवण्याचा काय न्याय होता? तसा नियम लावा आणि ही घाण संपून टाका. लोकांनाही कळू दे...एखाद्या पोलीस अधिकाऱ्याने केलं तर त्याला डोक्यावर घेऊन लोक नाचतील. इतकी लोकांच्या मनात तीव्र भावना आहे."