'जत्रा'मुळे केदार शिंदेंच्या डोक्यावर झालेलं ९० लाखांचं कर्ज, म्हणाले, "घर, बायकोचे दागिने गहाण ठेवून..."

By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2023 05:40 PM2023-07-25T17:40:25+5:302023-07-25T17:53:08+5:30

केदार शिंदेंनी सांगितला कटू अनुभव, म्हणाले, "आईचं घर, बायकोचे दागिने अन् ९० लाखांचं कर्ज..."

मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध दिग्दर्शक केदार शिंदे त्यांच्या 'बाईपण भारी देवा' चित्रपटामुळे चर्चेत आहेत. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. अवघ्या २४ दिवसांत या चित्रपटाने ६५ कोटींची रेकॉर्डब्रेक कमाई केली आहे. 'बाईपण भारी देवा'चे यश पाहून केदार शिंदेही भारावून गेले आहेत.

बाईपण भारी देवा प्रमाणेच केदार शिंदेचे 'अगं बाई अरेच्चा', 'जत्रा' हे चित्रपट प्रचंड गाजले. या चित्रपटांना प्रेक्षकांनी अक्षरश: डोक्यावर घेतलं होतं. त्यांच्या 'जत्रा' चित्रपटातील डायलॉग आजही प्रेक्षकांच्या तोंडपाठ आहेत. पण २००६ साली प्रदर्शित झालेल्या 'जत्रा' या चित्रपटामुळे केदार शिंदेंच्या डोक्यावर तब्बल ९० लाखांच्या कर्जाचा डोंगर झाला होता.

केदार शिंदेंनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत जत्रा आणि 'अगं बाई अरेच्चा' या सिनेमांवर भाष्य केलं. ते म्हणाले, "अगं बाई अरेच्चा केला तेव्हा मी २८ वर्षांचा होतो. या सिनेमाचं श्रेय मी राज ठाकरेंना देईन. ते माझे मित्र, फिलोसोफर आणि मार्गदर्शक आहेत. हे मी राजकीयदृष्ट्या बोलत नाहीये. कलाकार राज ठाकरेंबद्दल मी हे बोलत आहे."

तेव्हाच्या कल्पना, अनुभव वेगळा होता. मी लिहायचो आणि त्यांना वाचून दाखवयचो. त्यात मग ते मला सूचना द्यायचे. २००४साली मी एवढा मोठा सिनेमा केला, हे आज अगं बाई अरेच्चा बघताना मला जाणवतं. राज ठाकरेंमुळे हा सिनेमा मोठा झाला.," असंही ते म्हणाले.

'अगं बाई अरेच्चा' चित्रपटातील 'छम छम करता है' हे आयटम साँग खूप हिट झालं होतं. या गाण्याला फराह खानने कोरिओग्राफ केलं होतं. तर बॉलिवूड अभिनेत्री सोनाली बेंद्रे या गाण्यावर थिरकताना दिसली होती. राज ठाकरेंमुळे सोनाली बेंद्रे आणि फराह खानने या चित्रपटासाठी होकार दिल्याचा खुलासा केदार शिंदेंनी या मुलाखतीत केला.

ते म्हणाले, "छम छम करता है गाण्यासाठी फराह खान आणि सोनाली बेंद्रेने राज ठाकरेंमुळे होकार दिला. त्यांच्या एका शब्दामुळे त्यांनी हा सिनेमा स्वीकारला."

"जत्रा चित्रपटावेळी मी खूप मोठी झेप घेतली होती. त्यावेळी मी ३० वर्षांचा होतो. माझ्याकडे फारसा अनुभवही नव्हता. त्यावेळी मी माझं घर, आईचं घर, बायकोचे दागिने गहाण ठेवले होते. पण तेव्हा मला क्रेडिट आणि डेबिटचं गणित जमलं नाही."

"स्वप्न पूर्ण करायला गेलो पण पैसे किती मिळणार आणि किती खर्च करायचे, हे मला तेव्हा कळत नव्हतं. आटोक्यात खर्च केला तर आपल्यावर निदान कर्ज होणार नाही. आपण यातून बाहेर पडू शकतो, याचं गणित आज मला कळलं आहे", असं ते म्हणाले.

जत्रा हा लोकसांठी सुपरहिट आहे. पण, त्यावेळेस माझ्यावर ९० लाखांचं कर्ज झालं होतं," असं म्हणत केदार शिंदेंनी त्यांच्या आयुष्यातील कटु अनुभव सांगितला. (सर्व फोटो : केदार शिंदे/ इन्स्टाग्राम)