"काहीतरी हालचाल होतेय असं जाणवलं अन्...", प्रिया बेर्डेंना प्रवासादरम्यान आलेला भयावह अनुभव, असं काय घडलेलं?
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2026 12:02 IST2026-04-18T12:01:04+5:302026-04-18T12:02:32+5:30
"त्यानंतर मी रात्रीचा प्रवास करणं थांबवलं...", प्रिया बेर्डेंनी सांगितला तो भीतीदायक अनुभव, म्हणाल्या...

"काहीतरी हालचाल होतेय असं जाणवलं अन्...", प्रिया बेर्डेंना प्रवासादरम्यान आलेला भयावह अनुभव, असं काय घडलेलं?
Priya Berde: अनेक मराठी सुपरडुपरहिट चित्रपटांमध्ये झळकलेल्या अभिनेत्री प्रिया बेर्डे या नावाला कोणत्याही परिचयाची गरज नाही. मराठीसह आणि हिंदी सिनेसृष्टीत त्यांनी आपल्या अभिनयाची छाप उमटवली आहे. नाटक, चित्रपट, राजकारण या सगळ्यांमध्ये अधिक सक्रिय असणाऱ्या अभिनेत्री प्रिया बेर्डे आता भूल भुलैया नाटकातून प्रेक्षकांच्या भेटीला आल्या आहेत. यानिमित्ताने दिलेल्या एका मुलाखतीत प्रिया यांनी त्यांना आलेला एक भीतीदायक अनुभव शेअर केला आहे.
नुकताच प्रिया बेर्डे यांनी 'लाईमलाइट युट्यूब' वाहिनीसोबत संवाद साधला. त्यादरम्यान, त्यांनी एक भयावह अनुभव शेअर केला. त्या म्हणाल्या, "मला अनेक भयावह अनुभव आलेल आहेत.त्या अनुभवानंतर नाईट ड्राइव्ह करणं सोडून दिलं. त्यापैकी एक म्हणजे, मी पुण्याच्या पुढे एका गावामध्ये शूटिंग होतं आणि तिथून मला एका गावात जायचं होतं. त्या ठिकाणी जाताना रस्त्याच्या एका बाजूला झाडी होती दुसऱ्या बाजूला फक्त पाणी होतं.तो रस्ता देखील फार छोटा होता आणि खूप अंधार होता. तिथे आजुबाजूला सात-आठ घरांची छोटी-छोटी झाडी होती. तेव्हा रात्री साडे अकरा-बारा वाजले होते.त्यावेळी मी गाडी चालवत असताना मला गाडीत डाव्या बाजूला पाठीमागे कोणीतरी बसल्यासारखं वाटलं. गाडीत एसी असूनही घाम फुटला. आरशात बघायची देखील माझी हिंमत नव्हती.या गोष्टीला सतरा-अठरा वर्षे झाली असतील."
"मग गाडी चालवताना मला अचानक काहीतरी हालचाल झाल्याचं जाणवलं. मी लगेच स्वामी समर्थ आणि दत्त गुरुंचा धावा सुरु केला. मी सारखी श्री गुरदेव दत्त म्हणत होते. त्या क्षणी मला स्त्रोत्रही आठवत नव्हते. जवळपास २-३ मिनिटांचा तो अनुभव होता. सगळं वातावरण नॉर्मल झाल्यानंतर मी मागे वळून पाहिलं तर कोणी दिसेना. पण, ती दोन-तीन मिनिटं खूप भीतीदायक होती. त्यानंतर मी रात्रीची गाडी चालवणं बंद केलं. त्याच्यानंतर मी रात्री साडेदहा-अकरानंतर कुठेही ड्राइव्ह करत नाही. किती ही इमर्जन्सी असूद्या मी रात्रीचा प्रवास करत नाही.पण, ते खरं होतं, खोटं होतं की भास होता ते मला माहीत नाही. परंतु, तेव्हा मला भीती जाणवली. त्या भीतीदायक वातावरणातून मला स्वामी, दत्त महाराजांनी बाहेर काढलं."
"प्रवासामध्ये, बाहेर गावी किंवा नाटकाचे दौरे करताना असे अनेक अनुभव येत असतात. काही लोक म्हणतात असं काही नसतं. पण, सकारात्मक उर्जेनबरोबर नकारात्मक ऊर्जा देखील असते. खरंतर, आपण जोपर्यंत डोळ्यांनी बघत नाही, तोपर्यंत आपल्याला विश्वास बसत नाही.मी देखील प्रत्यक्ष डोळ्यांनी बघितलं नव्हतं. पण,मला काहीतरी जाणवलं होतं. आता कोणी त्याला भास म्हणू द्या किंवा आणखी काही, आपण ते सोडून देऊ." असा प्रसंग प्रिया बेर्डेंनी शेअर केला.