"तुझ्या आईची शपथ घेऊन सांग की..."; नाना पाटेकर 'वेलकम'मध्ये काम करण्यापूर्वी दिग्दर्शकाला काय म्हणाले?
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2026 15:18 IST2026-05-10T15:15:21+5:302026-05-10T15:18:36+5:30
या चित्रपटाचे दिग्दर्शक अनीस बज्मी यांनी एक मोठा खुलासा केला होता की, नाना पाटेकर सुरुवातीला या चित्रपटाची कथा ऐकायलाही तयार नव्हते. काय घडलं होतं नेमकं?

"तुझ्या आईची शपथ घेऊन सांग की..."; नाना पाटेकर 'वेलकम'मध्ये काम करण्यापूर्वी दिग्दर्शकाला काय म्हणाले?
२००७ मध्ये प्रदर्शित झालेल्या 'वेलकम' चित्रपटातील नाना पाटेकर यांचा अफलातून अभिनय आणि विनोदाचे अचूक टायमिंग आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. नानांनी साकारलेला 'उदय शेट्टी' हा डॅशिंग पण तितकाच विनोदी डॉन आणि त्याचे संवाद आजही लोकप्रिय आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शक अनीस बज्मी यांनी एक मोठा खुलासा केला होता की, नाना पाटेकर सुरुवातीला या चित्रपटाची कथा ऐकायलाही तयार नव्हते.
"आईची शपथ घेऊन सांग..."
'द लल्लनटॉप'ला दिलेल्या मुलाखतीत अनीस बज्मी यांनी नाना पाटेकर यांच्यासोबतच्या कामाचा अनुभव सांगितला. बज्मी जेव्हा या चित्रपटाची कथा घेऊन नानांकडे गेले, तेव्हा नानांनी चक्क कथा ऐकायला नकार दिला. नाना त्यांना म्हणाले, "मला कथा ऐकायची नाही अनीस. तू फक्त तुझ्या आईची शपथ घेऊन सांग की, मी हा चित्रपट करायला हवा की नको?" नानांचा आपल्यावर असलेला हा विश्वास पाहून बज्मी थक्क झाले होते.
अनीस बज्मी यांनी सांगितले की, ते स्वतः नाना पाटेकर यांचे खूप मोठे चाहते आहेत. 'उदय शेट्टी'च्या भूमिकेसाठी त्यांच्या डोळ्यासमोर नानांशिवाय दुसरा कोणताही अभिनेता नव्हता. नानांनी यापूर्वी कधीही अशा प्रकारची विनोदी भूमिका केली नव्हती, पण बज्मी यांना पूर्ण विश्वास होता की नाना या भूमिकेला एक वेगळीच उंची मिळवून देतील.
कथा ऐकल्यावर नाना झाले भावूक
नानांनी चित्रपट साइन केल्यानंतर बज्मी यांनी त्यांना तीन तास सविस्तर कथा ऐकवली. ती ऐकल्यानंतर नाना प्रचंड खुश झाले. ते इतके भावुक झाले की त्यांनी दिग्दर्शकाला मिठी मारली आणि म्हणाले, "मी सेटवर मातीचा गोळा म्हणून येईल. या भूमिकेसाठी तुला जसं हवंय तसं मला घडव." नानांनी ही विनोदी भूमिका अत्यंत गांभीर्याने आणि मेहनतीने साकारली. त्यामुळेच आजही नानांची ही भूमिका लोकांना खळखळून हसवते.