यदु जोशी राजकीय संपादक, लोकमत
विधानपरिषदेच्या नऊ जागांसाठीची निवडणूक लवकरच जाहीर होईल. विधानसभेच्या आमदारांमधून या नऊ जणांची निवड होणार आहे. त्यात सर्वात मोठी उत्सुकता ही आहे की, उद्धव ठाकरे पुन्हा आमदारकी घेतील की नाही? राजकारणात 'हजर असणे' आवश्यक असते. बाहेर राहण्याऐवजी आत राहिलात, तर डाव टाकण्याची संधी जिवंत राहते. ही एक बाजू झाली, पण कोणतेही पद न घेता दिवंगत बाळासाहेब ठाकरे हे राजा होते, त्यांच्या वाटेवर जात उद्धवजींनी प्रति बाळासाहेब व्हायचे ठरविले, तर ते आमदारकी नाकारतील. राजकारणात नेहमीच मध्यवर्ती राहायचे; पण सत्ताकारणाच्या भानगडीत पडायचे नाही, हे बाळासाहेबांनी तहहयात पाळले. पण, उद्धव-आदित्य यांना सत्ताकारणाचा मोह झाला म्हणा किंवा सत्ताकारणाने अधिक प्रभावी राजकारण करता येते, असे वाटले म्हणा; ते त्या वाटेवर गेले. सत्ताकारणात गेल्याने ठाकरेंना मुख्यमंत्रिपद मिळाले; पण त्यांनी खूप काही गमावले. ते मुख्यमंत्री झाले नसते, तर शिवसेना फुटली नसती. आता आमदारकीबाबत निर्णय घेताना ते हा सगळा विचार करतीलच. 'मला तुमच्या शाळेत पुन्हा यायचे नाही', असे ते विधानमंडळाच्या एका पिठासीन अधिकाऱ्यास सांगत होते; बघूयात काय निर्णय घेतात ते। भाजपला मात्र ते विधानपरिषदेत आलेले नक्कीच आवडेल. कारण, त्यानिमित्ताने आपल्या मित्रपक्षावर (शिंदेसेना) एक अंकुश ठेवता येतो आणि पाहुण्याच्या काठीने बरेच काही करता येऊ शकते.
शिंदेसेनेचे केंद्रातील राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी दिल्लीत बुधवारी रात्री दिलेल्या एका स्नेहभोजनाला उद्धवसेनेचे दोन खासदार उपस्थित होते. आदित्य ठाकरे हे मोहित कंबोज यांच्याकडे जाऊ शकतात, तर आम्ही प्रतापरावांकडे का जाऊ शकत नाही, असा सवाल ते दोन खासदार करूच शकतील. शिंदेसेनेच्या नव्या खासदार डॉ. ज्योती वाघमारे यांनी, 'महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप होणार', असे विधान अलीकडेच केले आहे. त्याआधी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्लीत जाऊन फोडाफोडीची पेरणी केलीच आहे. त्यामुळे उद्धवसेनेवर फुटीचे ढग दाटले आहेत. उद्धवसेनेचे खासदार गळाला लावण्याचे प्रयास शिंदे करत आहेत, पण भाजपच्या श्रेष्ठींनी त्यांना अजून त्याबाबत गो-अहेड दिलेला नाही, असेही समजते.
सपकाळांचे कासव
सध्या राज्यात काँग्रेसअंतर्गत 'संघटन सृजन' असे एक अभियान सुरू आहे. त्यासाठी एआयसीसीकडून प्रत्येक जिल्ह्यात निरीक्षक पाठविले आहेत. ते सात-सात दिवस जिल्ह्यात थांबून जिल्हाध्यक्षपदासाठी योग्य चेहरा कोणता याचा शोध घेत आहेत. सरसकट सगळेच जिल्हाध्यक्ष बदलले जातील असे नाही, पण बरेचसे बदलले जाऊ शकतात. त्याला जोडून प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी तालुका पातळीवर प्रदेश काँग्रेसचे तीन-तीन निरीक्षक पाठविले आहेत, ते तालुका/ब्लॉक पातळीवरील अध्यक्ष व इतर प्रमुख पदाधिकाऱ्यांची संभाव्य नावे प्रदेश काँग्रेसला पाठवतील आणि नवे पदाधिकारी नेमले जातील. संघटनात्मक पातळीवर प्रदेश काँग्रेस कात टाकत आहे. सशाऐवजी कासव बनून सपकाळ निघाले आहेत. नवनवीन प्रयोग करू पाहत आहेत. गोष्टीमध्ये कासव शर्यत जिंकले होते, सपकाळ प्रत्यक्षात जिंकतील का?
भिडेंच्या जागी लोकेश चंद्र
मुख्यमंत्री कार्यालयाच्या अतिरिक्त मुख्य सचिव अश्विनी भिडे मुंबई महापालिकेच्या पहिल्या महिला आयुक्त झाल्या. त्यांच्या जागी मुख्यमंत्री कार्यालयात लोकेश चंद्र आले. लोकेश चंद्र हे महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक होते. मुख्यमंत्री कार्यालयात कोण येणार, याची उत्सुकता आमदार खासदार, मंत्र्यांपासून नोकरशाहीलाही असते. कारण, सगळी सूत्रे या कार्यालयाकडे असतात. राज्याच्या गतिमान कारभारासाठी परिणामकारकपणे काम करणाऱ्या सीएमओची भूमिका महत्त्वाची असते. अश्विनी भिडे यांची कार्यशैली उत्तम होती. लोकेश चंद्र हेही जलद निर्णय घेणारे अन् मृदुभाषी आहेत. त्यामुळे अश्विनी भिडेंच्या जागी मुख्यमंत्री कार्यालयात योग्य व्यक्ती आली असा सूर आहे. त्यांच्या जोडीला विनम्र स्वभाव अन् स्वच्छ प्रतिमेचे श्रीकर परदेशी आहेतच, देवेंद्र फडणवीसांसारखे अष्टावधानी मुख्यमंत्री असताना, त्यांच्या गतीने चालू शकेल असे अधिकारी असणे गरजेचेच आहे. भिडेंच्या जागी लोकेश चंद्र यांना आणून मुख्यमंत्र्यांनी तेच अधोरेखित केले आहे. भूषण गगराणी यांच्यासारखे कर्तृत्ववान अधिकारी राज्याचे मुख्य सचिव होऊ शकले नाहीत, ही सल मात्र नेहमीच राहील.
जाता-जाता
नागपूर विभागात रेतीच्या व्यवसायात 'अग्र'णी असलेल्या दोन वजनदार व्यावसायिकांमध्ये एकमेकांविरुद्ध वर मुख्यमंत्री कार्यालयात तक्रारी करण्यापर्यंत आणि एकमेकांना व्यावसायिकदृष्ट्या पुरते अडचणीत आणण्यापर्यंत मजल गेली होती. दोघांच्या पारड्यात मंत्री, सत्तापक्षाच्या काही तर विरोधी पर्भाच्या एका ज्येष्ठ आमदाराने आपापल्या परीने वजन टाकून या भांडणात उडी घेतली. शेवटी नागपुरात एक बैठक झाली अन् तीत तह झाला. सगळ्यांचे समाधान झाले, आता भांडण वगैरे काही राहिले नाही. प्रयत्ने वाळूचे कण रगडिता तेलही गळे म्हणतात. इथे तर थेट वाळूचाच संबंध होता, त्यामुळे तहाचे तेल गळले शेवटी.
yadu.joshi@lokmat.com
Web Summary : Uddhav Thackeray faces a choice: become an MLA or emulate Balasaheb. Political shifts occur as the Congress revamps its organization. Bureaucratic changes see Lokesh Chandra succeeding Ashwini Bhide. Nagpur's sand business dispute resolves through compromise.
Web Summary : उद्धव ठाकरे के सामने दुविधा: विधायक बनें या बालासाहेब का अनुकरण करें। कांग्रेस संगठन में बदलाव कर रही है। नौकरशाही में लोकेश चंद्र ने अश्विनी भिडे का स्थान लिया। नागपुर के रेत कारोबार का विवाद समझौते से सुलझा।