शापित कोहिनूर हवाच कशाला?
By Admin | Updated: April 24, 2016 03:46 IST2016-04-24T03:46:55+5:302016-04-24T03:46:55+5:30
जगामध्ये सर्वोच्च किंमत असलेला कोहिनूर हिऱ्याच्या मालकी हक्कावरून पुन्हा वादळ उठले आहे. यापूर्वी अनेकदा मालकी हक्कावरून वाद-प्रवाद झाले. पण इंग्लडने अद्यापपर्यंत कोहिनूर

शापित कोहिनूर हवाच कशाला?
- विनायक पात्रुडकर
जगामध्ये सर्वोच्च किंमत असलेला कोहिनूर हिऱ्याच्या मालकी हक्कावरून पुन्हा वादळ उठले आहे. यापूर्वी अनेकदा मालकी हक्कावरून वाद-प्रवाद झाले. पण इंग्लडने अद्यापपर्यंत कोहिनूर वरचा हक्क सोडलेला नाही.
साधारण १८५० च्या म्हणजे अडीचशे वर्षापूर्वी ही घटना असेल. त्या वेळी निम्म्या जगावर इंग्रजांचे राज्य होते. जेव्हा कोहिनूर त्यांच्या ताब्यात आला, तेव्हापासून इंग्रजांचा अंमल कमी झाला. त्यांच्या ताब्यातील एकेक देश स्वतंत्र होत गेला. खरे तर इतिहासातील या घटना कोहिनूर शापित असल्याचेच निदर्शक म्हणावे लागेल. कोहिनूरचा नूर काही और आहे, यात शंका नाही.
गंमत म्हणजे कोहिनूर हिऱ्याचा आतापर्यंत व्यवहार झालेला नाही. म्हणजे खरेदी विक्री वगैरे. एक तर कुणीतरी लुटला आहे किंवा कुणीतरी भेट दिला आहे. त्यामुळे त्याची खरी किंमत कुणालाच ठाऊक नाही. तरीही एका अंदाजानुसार, दोन अब्ज भारतीय रुपयापर्यंत ही किंमत असल्याचे सांगितले जाते. जेव्हा खाणीत सर्वात पहिल्यांदा हा हिरा सापडला, तेव्हा तो ७९३ कॅरेटचा होता. त्यांनतर त्याच्यावर तीन-चार वेळा सुबकतेचे प्रयोग करण्यात आले.
सध्या जगात तब्बल दोन हजारांवरून अधिक मौल्यवान हिरे आहेत, ज्यांची किंमत कोट्यवधींच्या घरात आहे, पण कोहिनूर हिऱ्याला कुणाचीच सर नाही. जगातील सर्वात मौल्यवान हिरा म्हणून ‘कोहिनूर’कडे पाहिले जाते. ‘कोह-इ-नूर’ म्हणजे ‘प्रकाशाचा पर्वत’ असा या अरबी शब्दाचा अर्थ आहे. कोहिनूर मिळविण्यासाठी भारताने यापूर्वी अनेकदा प्रयत्न केले आहेत, पण इंग्लडने ताबा सोडलेला नाही. आपल्याकडे सर्वोच्च न्यायालयात हे प्रकरण गेले, तेव्हा गेल्याच आठवड्यात सरकारने कोहिनूर हिरा इंग्लडला भेट म्हणून दिल्याचा उल्लेख केला, त्यावरून पुन्हा वादळ उठले. मोदी सरकारने मात्र, आम्ही हा मौल्यवान हिरा भारताकडे परत आणू, अशी ग्वाही दिली आहे.
कोहिनूर हिरा मूळचा कुठला, यावरही बरेच प्रवाद आहेत. आंध्र प्रदेशातील गुंटूर जिल्ह्यातील खाणीत तब्बल पाच हजार वर्षांपूर्वी हा हिरा सापडल्याचे सांगण्यात येते. तो तेथील मालवा प्रांतातील राजाकडे होता. त्यानंतर दिल्लीच्या बादशाहने हा हिरा लुटला. १५२६ साली बाबरच्या ताब्यात हा हिरा होता. त्यानंतर शाहजहान ते औरंगजेब असा हिऱ्याचा प्रवास सांगितला जातो. या कोहिनूर हिऱ्याची खासियत म्हणजे हा ज्यांच्या ताब्यात गेला, त्याचे साम्राज्य खालसा झाले. पुरुषांसाठी हा कोहिनूर शापित मानला गेला आहे. मात्र, महिलांनी परिधान केल्यास कोहिनूरचे विपरित परिणाम जाणवत नाहीत, अशी वदंता आहे. त्यामुळेच की काय, तो इंग्लडच्या राणीच्या मुकुटात शांतपणे विराजमान आहे. दहाव्या शतकापासून भारतीय भूमीवर भाकवंशीय राज्यकर्ते होते. १४ व्या शतकात त्यांच्याकडे कोहिनूर आला आणि लुगलक शाहने भाकवर स्वारी करून राज्य खालसा केले. मोहम्मद बिन तुगलककडे हा कोहिनूर होता आणि त्यानंतर ज्यांच्याकडे कोहिनूर गेला, त्यांचा दु:खांत झाला. शाहजहानने त्याच्या मुकुटावर कोहिनूर हिरा चिकटवला होता. त्यानंतर त्याचा पुत्र औरंगजेबने शाहजहानलाच नजरकैदेत ठेवले. त्या वेळी शाहजहान मुमताजच्या आठवणीत बुडून गेलेला होता. कोहिनूर हिऱ्यातून तो ताजमहालची प्रतिकृती पाहत असे. त्यानंतर पर्शियन राजा नादीर शाहने मोगलांवर स्वारी केली. त्यात मोगलांचे राज्य खालसा झाले. नादीर शाहने हा हिरा पर्शियात नेऊन ठेवला. त्याच नादीर शाहची पुढे हत्या झाली. मग हा कोहिनूर अफगाणिस्तानचा बादशहा मोहम्मद दुर्रानीकडे पोहोचला. त्यानंतर वशंज शुजा दुर्रानीकडे कोहिनूर आला आणि त्याची सत्ता मिळविण्यासाठी दुसऱ्या भावंडाने शुजा दुर्रानीला पळून जाण्यास भाग पाडले. शुजाने लाहोरला पलायन केले. त्या वेळी तेथील पंजाब प्रांतावर राजा रणजित सिंहची सत्ता होती. शुजाने तो कोहिनूर रणजित सिंहच्या ताब्यात दिला. त्या वेळी रणजित सिंहने कोहिनूरच्या बदल्यात शुजाला त्याचे राज्य परत मिळवून दिले. कोहिनूर रणजित सिंहच्या ताब्यात मिळताच काही वर्षांनंतर त्याचाही मृत्यू झाला. त्या वेळी अखंड भारतावर इंग्रजांचा अंंमल सुरू झाला होता. इंग्रजांनी कोहिनूर ताब्यात घेऊन राणी व्हिक्टोरियाकडे दिला, तोपर्यंत कोहिनूरची शापित प्रवासाची कहाणी व्हिक्टोरिया राणीपर्यंत पोहोचली होती. राणीने मग त्या हिऱ्याला स्वत:च्या मुुकुटात स्थान दिले आणि केवळ महिलाच हा मुकुट परिधान करतील, असा फतवा काढला. पुढे जरी ब्रिटनच्या गादीवर पुरुष बसला, तरी हा मुकुट त्याच्या पत्नीच्या डोक्यावर असेल, असेही या फतव्यात नमूद करण्यात आले आहे. तेव्हापासून इंग्लडच्या ताब्यात हा कोहिनूर आहे. सध्या लंडनच्या टॉवरमध्ये हा कोहिनूर अतिशय कडेकोट बंदोबस्तात ठेवण्यात आलेला आहे. पर्यटकांसाठी कधी तो खुलाही केला जातो. राणीच्या वाढदिवसाला तिच्या मुकुटात मोठ्या दिमाखात हा कोहिनूर झळकत असतो.
तब्बल १०५ कॅरेटचा हा कोहिनूर आपल्या देशाच्या प्रतिमेचा विषय असता, तरी कायदेशीरदृष्ट्या इंग्लडकडे आहे. यापूर्वी अफगाणिस्तान, पाकिस्तान यांनीही कोहिनूरच्या ताब्याविषयी पत्रे लिहिली, पण इंग्लडने त्यांनाही स्पष्ट नकार दिला. परवा सर्वोच्च न्यायालयानेही भारतीय अधिकाऱ्यांनी इंग्लडच्या ईस्ट इंडिया कंपनीला पंजाबच्या राजाने हा हिरा भेट दिल्याचे सांगितले. त्यामुळे हिरा परत मागण्याचा अधिकार भारताने गमावला आहे. एखाद्याला वस्तू भेट दिल्यानंतर ती परत मागणे असभ्यतेचे लक्षण मानले जाते. भारताने स्वातंत्र्यानंतर अनेकदा हा हिरा भारताच्या ताब्यात देण्याची विनंती केली, पण इंग्लडने ती विनंती साफ फेटाळून लावली. भारताने कोहिनूर हिरा हा प्रतिष्ठेचा विषय न करता, ३३ कोटी जनता पाण्याविना तडफडत आहे, त्याचा प्राधान्याने विचार करायला हवा. कोहिनूर ही आपली गरज नाही. त्यापेक्षा आपल्याकडे अजून मूलभूत गरजा पुरेशा भागलेल्या नाहीत, त्याची प्राथमिकता असायला हवी. शापित कोहिनूरच्या मागे लागण्यापेक्षा नव्या पिढीचे नवे कोहिनूर तयार करण्यात भारताने प्राधान्य दिले, तर त्यांच्या आयुष्यात प्रकाशाचे पर्वत नक्कीच तयार होतील, पण जनतेच्या मूळ प्रश्नाला बगल देऊन कोहिनूर स्वप्नाकडे पाहायला लावण्यातच सरकारला रस आहे. आपल्याही नागरिकांची स्मृती फारशी टिकत नाही. कोहिनूर लंडनच्या टॉवरमध्ये ठेवला काय आणि दिल्लीच्या लाल किल्ल्यात ठेवला काय, सामान्यांच्या आयुष्यात काय फरक पडणार आहे? पण कोहिनूरभोवती स्वप्न रंजन केल्याने दैनंदिन आयुष्याच्या ताणावर तेवढाच उतारा मिळतो. क्षणभर का होईना, डोक्यावर कोहिनूरचा मुकुट नसला, तरी तणावाचा काटेरी मुकुट हलकासा दूर होतो, हेही नसे थोडके.
(लेखक ‘लोकमत’च्या मुंबई आवृत्तीचे कार्यकारी संपादक आहेत. )