काँग्रेसला टिपू सुलतानचा पुळका कशासाठी?
By Admin | Updated: November 20, 2015 03:17 IST2015-11-20T03:17:59+5:302015-11-20T03:17:59+5:30
कर्नाटकातील कॉंग्रेस सरकारने टिपू सुलतान या १८व्या शतकातील शासकाची १६५वी जयंती साजरी करण्यामागे कुठलेच ऐतिहासिक औचित्य नव्हते. पुढील वर्षी त्या राज्यात

काँग्रेसला टिपू सुलतानचा पुळका कशासाठी?
- बलबीर पुंज
(माजी राष्ट्रीय उपाध्यक्ष, भाजपा)
कर्नाटकातील कॉंग्रेस सरकारने टिपू सुलतान या १८व्या शतकातील शासकाची १६५वी जयंती साजरी करण्यामागे कुठलेच ऐतिहासिक औचित्य नव्हते. पुढील वर्षी त्या राज्यात निवडणुका होत आहेत. विद्यमान मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी कर्नाटकातल्या तंत्रज्ञानाबाबत जागरूक असलेल्या जनतेसमोर जाण्याजोगे आणि पुन्हा सत्तेवर येण्यासारखे फारसे काही केलेले नाही. ते एकाच वेळी विरोधकांचा व पक्षांतर्गत स्पर्धकांचा सामना करीत आहेत. या पार्श्वभूमीवर कॉंग्रेसने आपले जुनेचे तोडा-फोडाचे राजकारण सुरु केले आहे.
टिपूच्या आठवणींना उजाळा देण्याला असलेला विरोध खुद्द कर्नाटकातच व्यापक होता. तो केवळ हिंदू धर्मियांकडूनच नव्हे, तर इतर समजाकडूनही केला गेला. मंगलोर येथील एका वृत्तानुसार युनायटेड ख्रिश्चन असोशिएशन हे ख्रिश्चन धर्मियांचे महत्वाचे केंद्र आहे. तेथील अल्बान मेनेझेस यांनी असे म्हटले आहे की, ‘टिपूने १७८४ साली मंगलोरमध्ये १६८०मध्ये उभारलेले मिलागर्स चर्च पाडले होते. टिपूने ६०हजार कॅथलिक लोकाना ब्रिटिशांचे गुप्तहेर असल्याच्या संशयावरुन कारावासात टाकले होते’. इतिहासात असे नमूद करण्यात आले आहे की, या तथाकथित आदर्श धर्मनिरपेक्ष राजाने त्याच्या ताब्यातील ख्रिश्चनांना अन्न-पाण्याविना म्हैसूरला पायी नेले होते व त्यातले हजारो लोक मृत पावले होते. २०१३ साली याच ख्रिश्चन संस्थेने हिंदू संघटनांसोबत श्रीरंगपटणम विद्यापीठाला टिपूचे नाव देण्याविरुद्ध निदर्शने केली होती.
टिपूने अत्यंत कडवटपणे इंग्रजांचा सामना केला हे कोणीही अमान्य करीत नाही, पण त्याच वेळी त्याने मराठ्यांंसोबतही तेवढाच मोठा संघर्ष उभा केला होता. ईस्ट इंडिया कंपनीच्या वसाहतीकरणाच्या विरोधात संघर्ष करणारी मराठा ही मुख्य आणि मोठी शक्ती होती. १८०३ साली जनरल लेकच्या नेतृत्वाखाली मराठा सैन्याचा परपतगंज (सध्याचे नोयडा) येथे पराभव केल्यानंतरच दिल्ली इंग्रजांच्या ताब्यात गेली होती. त्यावेळचा मुगल सम्राट मराठ्यांच्या वेतनावर होता आणि त्याने स्वखुशीने नव्या मालकाची खैरात मान्य केली होती.
टिपूचा इंग्रजांना असलेला विरोध म्हणजे विदेशी वसाहतींना विरोध असे काही नव्हते. त्याने फ्रेंचांना इथे आक्रमण करण्याचे निमंत्रण दिले होते. गुलाम कादीरने १० आॅगस्ट १७८८रोजी मुगल शासक शाह आलम (दुसरा) याचे डोळे काढले, त्यावेळी टिपूला कुठलाच खेद झाला नव्हता. त्याने अफगाणिस्तानचा शासक झमन शहा दुर्रानी याला पत्र लिहून भारतावर हल्ला करण्याचे, मराठा आणि इंग्रजांना संपवण्यासाठी त्याला मदत करण्याचे आणि इथे इस्लामचे राज्य स्थापन करण्याचे आमंत्रणही दिले होते.
टिपूची महत्वाकांक्षा नि:संशय वैयक्तिकरीत्या स्वत:च प्रबळ होण्याची होती. त्याची वैचारिक बांधीलकी इस्लामशी होती. त्याचा राज्यकारभार महम्मद गझनी, महम्मद घोरी, औरंगजेब आणि तत्सम लोकांच्या पावलावर पाऊल टाकणारा होता. यातील प्रत्येकाने लोभापायी मंदिरे पाडली, कथित काफिरांना मारले आणि बिगर मुसलमानांचे जबरदस्तीने धर्मांतर केले होते. टिपूचा पिता हैदर अली याने म्हैसूरचे हिंदू शासक वडीयार यांच्याकडून सत्ता हडपली होती. हैदर मूलत: एक लष्करी अधिकारी होता. त्याने १७६१मध्ये म्हैसूरची सत्ता हस्तगत केली. तो स्वत:ला अरबांच्या कुरेश जमातीचा वंशज मानीत असे. प्रेषित मुहम्मद कुरेश जमातीतलेच होते.
टिपूला लिहिलेला एका पत्रात हैदरने असे म्हटले होते की, ‘मुसलमान हे दुर्बल हिंदूंपेक्षा जास्त संघटीत आणि साहसी आहेत. त्यांच्यामुळेच हिंदुस्तानची शान कायम आहे. माझ्या प्रिय मुला, कुराणाचा सदा विजयच व्हावा यासाठी तू प्रयत्नांची पराकाष्ठा कर. तुझ्या या पवित्र कार्यास ईश्वराची साथ लाभली तर तू तैमूरच्या सिंहासनावर जाऊन बसशील’. टिपूने त्याच्या वडिलांनी त्याच्याकडून केलेल्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी सर्व प्रयत्न केले आणि वडिलांचा आदर्श कायम समोर ठेवला. पण त्याच्याही पुढे जाऊन त्याने इस्लामिक कार्यक्रम राबवला होता. कर्नल व्हिक्स यांच्या हिस्टॉरीकल स्केचेस, आणि के.पी.पद्मनाभन यांच्या हिस्टरी आॅफ कोचीन स्टेट या पुस्तकांमध्ये तर सरदार के.एम.पणिक्कर यांच्या लेखात तसेच टिपूच्या दरबारातील इतिहासकारांनी टिपूच्या कारभारातील क्रौर्याचे यथासांग वर्णन कररुन ठेवले आहे. त्याने मोठ्या प्रमाणावर बिगर-मुसलमानाच्या हत्त्या, त्यांच्या धार्मिक स्थळांचा विध्वंस आणि जबरदस्ती धर्मांतर केलेले यातून दिसून येते. बद्रू जुमान खानला लिहिलेल्या पत्रात टिपू स्वत:विषयी सांगताना म्हणतो की ‘तुला माहित नाही का मी नुकताच मलबार मध्ये मोठा विजय मिळवला आहे आणि चार लाख हिंदूंना मुसलमान केले आहे. मी लवकरच त्रावणकोरचा राजा रामा वर्मावर हल्ला करणार आहे आणि त्यालाही मुसलमान करणार आहे. पणिक्कर यांनी आणखी एका पत्राचा संदर्भ दिला आहे. १८ जानेवारी १७९०रोजी टिपूने सय्यद अब्दुल दुलाल याला लिहिलेल्या या पत्रात तो म्हणतो की, अल्लाह आणि प्रेषित मुहम्मदाच्या कृपेने कालिकत मधील सर्वच हिंदू आता मुसलमान झाले आहेत. फक्त कोचीच्या सीमेवरचे काही हिंदू बाकी आहेत. मी लवकरच त्यांनाही मुसलमान करीन. मी याला जिहादच समजतो.
टिपूने कारभाराची भाषा म्हणून कन्नडऐवजी पर्शियन रुजू करण्याचाही प्रयत्न केला होता. त्याने अनेक ठिकाणांची नावे इस्लाम धर्माशी निगडीत असलेल्या नावांनी बदलली होती.
टिपूने हिंदू मंदिरांना दिलेल्या देणग्यांविषयी व्हि.आर. परमेश्वरन यांच्या त्रावणकोरच्या दिवाणाचे चरित्र या पुस्तकात असे म्हटले आहे की टिपूचा ज्योतिषशास्त्रावर प्रचंड विश्वास होता. स्थानिक ब्राह्मण ज्योतिषांच्या सल्ल्यानुसार बादशाह होण्यसाठी त्याने शृंगेरी मठासह म्हैसूरमधील मंदिरांना जमिनी आणि इतर देणग्या दिल्या होत्या. यातल्या बऱ्याच देणग्या १७९१साली झालेल्या पराभवानंतर आणि १७९२च्या अपमानास्पद श्रीरंगपट्टणम करारानंतर देण्यात आल्या होत्या. त्याच्या या देणग्या म्हणजे हिंदू धर्माविषयीचे प्रेम नव्हते, तर बादशाह होण्यासाठी ज्योतिषांच्या सल्ल्याला धरून वागणे होते.
कॉंग्रेसला आज झालेली टिपूची आठवण तशी फार उशिराने झाली आहे. पाकिस्तानला ती कॉंग्रेसच्या फार आधी आणि मोठ्या प्रमाणावर आली आहे. पाकिस्तानने त्याच्या तीन युद्ध नौकांना टिपूचे नाव दिले आहे. टिपूच्या नावाची पहिली युद्ध नौका १९४९साली त्यांनी समुद्रात उतरवली होती व ती १९७९ पर्यंत सेवेत होती. दुसरी आली १९८० साली. ती १९९४मध्ये भंगारात गेली. त्याच वर्षी तिसऱ्या युद्ध नौकेला टिपूचे नाव दिले गेले. पाकिस्तानने आपल्या काही क्षेपणास्त्रांना आणि शैक्षणिक संस्थांनासुद्धा टिपूचे नाव दिले आहे. टिपू सुलतान या एकाच नावात कॉंग्रेस आणि पाकिस्तानला धर्मनिरपेक्ष आदर्श सापडणे यात बरेच काही दडले आहे.