जिसको भी देखना हो, कई बार देखना!

By Admin | Updated: February 21, 2016 01:39 IST2016-02-21T01:39:41+5:302016-02-21T01:39:41+5:30

सर्वसाधारणपणे गाणे माहीत असते, ते गाणाऱ्याचे नावही माहीत असते, पण ते संगीतबद्ध करणाऱ्या संगीतकाराचे नाव माहीत असेलच असे नाही. अशा वेळी लिहिणाऱ्याचे नाव ठाऊक असणे, हे तर कठीणच.

Whose to see, many times to see! | जिसको भी देखना हो, कई बार देखना!

जिसको भी देखना हो, कई बार देखना!

(कलाक्षरे)
- रविप्रकाश कुलकर्णी

सर्वसाधारणपणे गाणे माहीत असते, ते गाणाऱ्याचे नावही माहीत असते, पण ते संगीतबद्ध करणाऱ्या संगीतकाराचे नाव माहीत असेलच असे नाही. अशा वेळी लिहिणाऱ्याचे नाव ठाऊक असणे, हे तर कठीणच.

पहा :
कभी किसी को मुकम्मल जहाँ नही मिलता
कही जमी तो कही आसमां नही मिलना
जिसे भी देखिये वो अपने आपमें गम है
जुबाँ मिली है मगर हमजुबाँ नहीं मिलता
हे गाणं ‘अहिस्ता अहिस्ता’ चित्रपटातले, भूपेंद्रने ते म्हटले आहे. संगीतकार खय्याम, पण त्याचा गीताकर निदा फाजली आहे, हे माहीतच असेल असे नाही, पण मुळात निदा फाजलीची गजल जशीच्या तशी चित्रपटात घेतली गेली, हे माहिती असणे फार दूरची गोष्ट झाली.
मुकनिदा हसन निदा फाजली हे लांबलचक नाव गजल लिहिताना निदा फाजली असे सुटसुटीत झाले. ८ फेब्रुवारी २०१६ रोजी वयाच्या ७७ व्या वर्षी (जन्म १२ आॅक्टोबर १९३८) त्यांचे मुंबईत निधन झाले. त्या निमित्ताने त्यांच्या संबंधात जी काही माहिती आली आहे, ती पाहताना-वाचताना हा अनुभव आला. ‘तू इस तरह से मेरी जिंदगी में शामिल है’ हे ‘आप तो ऐसे न थे’ चित्रपटात गाणं (गायक - मनहर, हेमलता व महमंद रफी, संगीत - उषा खन्ना) निदा फाजलीचेच!
वेगळेपण : निदा फाजलीचे आई-वडील फाळणीनंतर पाकिस्तानात गेले, पण ते मात्र गेले नाहीत त्यामुळे असेल, देशाच्या, धर्माच्या नावाने भिंती उभारल्या गेल्यामुळे सर्वसामान्य माणसांची जी कुचंबणा झाली, ती घुसमट त्यांच्या लेखनात उमटलेली दिसेल. त्यांनी म्हटलेय-
हिंदू भी मजेमे है, मुसलमाँ भी मजे में
इन्सान परेशां यहाँ भी है वहा भी
त्यांच्या आत्मचरित्रात्मक, कादंबारीचं नाव आहे ‘दिवारों के बीच, दिवारों के बाहर'..,
कुठलाही ‘चष्मा' न लावता, निदा वस्तुनिष्ठ पद्धतीने पाहतात, त्यामुळेच त्यांनी लिहिलेय-
बदला न अपने आपको जो थे वही रहे
मिलते रहे सभी से मगर अजनबी रहे
गुजरो जो बागसे तो दुआ मांगते चलो
जिसमें खिले है फूल वो डाली हरी रहे।
त्यांची भाषाविषयक भूमिका अशीच स्वच्छ आणि सरळ आहे. त्यांनी म्हटलेय, ‘भारताच्या फाळणीपूर्वी कोणतीच भाषा कोणत्याही धर्मांशी जोडलेली नव्हती. हे पाप बॅरिस्टर जीना यांनी केले, अन्यथा पाकिस्तानच्या कोणत्या भागात उर्दू बोलले जात होते? कोणत्याही नाही. या उलट अमर शेख नावाचा मुस्लीम माणूस मराठीत लिहीत होता. काझी नजरूल इस्लाम बंगालीत, मरीज गुजरातीत आणि बशीर वायकर तामिळीमध्ये लिहीत होते. उर्दू मुस्लिमांची भाषा नव्हतीच. उर्दूच कशाला कोणतीच भाषा धर्माशी निगडित नव्हती. फाळणी झाली आणि बंगाली मुस्लीम पंजाबी मुस्लिमांपासून वेगळे झाले. लाहोरमध्ये पंजाबी पर्शियन लिपीमध्ये, तर अमृतसरमध्ये गुरुमुखी लिपीमध्ये लिहीत. उर्दूचे ‘आजोबा’ समजले जाणारे अमीर खुस्त्रो जेव्हा ‘गोरी सोयी सेजपर मुखपर डाले केस’ असे बोलले, ती कुठली भाषा होती? महात्मा गांधी तर उर्दूमिश्रित हिंदीला ‘हिंदुस्थानी भाषा’ संबोधून ती देवनागरी व उर्दू लिपीमध्ये लिहा म्हणत होते. उर्दू सर्वांची होती.
भाषा म्हणजे लिपी नसते. युरोपात विभिन्न भाषा रोमन लिपित लिहितात, म्हणून त्या रोमन मानायच्या का? आता मी हे सारे बोलतो, याचा अर्थ उर्दू संपवा, असा नाही. उर्दू नावाचे झाड तुमच्या अंगणात आहे आणि प्रत्येक फुलाला फुलायचा अधिकार असल्याने फुलवा ते झाड तोडू नका.’ या दृष्टिकोनामुळेच उर्दू देवनागरीत लिहिल्याने ती अधिकाधिक लोकांपर्यंत जाईल, असा त्यांचा आग्रह होता. अर्थात, त्यामुळे निदा यांनी अनेकांची नाराजी ओढावून घेतली. मात्र, या टिकेचा त्यांच्यावर अजिबात परिणाम न होता, ते आपल्या मताशी ठाम राहिले. या चिंतनातूनच त्यांनी मग लिहिलेय-
मुंह की बात सुने हर कोई, मनकी पीर को जाने कौन?
आवाजों के बाजारों में, स्वामीजी पहचाने कौन?
कई बार देखना... शायर निदा फाजलीमध्ये एक
पत्रकार सदैव जागा असे. त्यामुळेच त्यांनी म्हटले आहे-
हर आदमी में होते हे । दस-बीस आदमी।।
जिसको भी देखना हो । कई बार देखना।।
त्यामुळेच त्यांनी साहीर लुधियानवयी, जांनिसार अख्तर, मजरूह सुलतानपुरी, मेहंदी हसन अशांसारख्यांच्या संदर्भात नको इतक्या स्पष्टपणे लिहिल्याने ते वादग्रस्त ठरले. त्यांच्यावर बहिष्कार टाकला गेला, पण निदा या सगळ्यांना पुरून उरले. निदा फाजलींनी एके ठिकाणी म्हटले आहे.
कुछ दूर चल के रास्ते सब एक से लगे,
मिलने गये किसी से, मिल आए किसी से।
साहिर आणि जांनिसार अख्तर संबंधात निदान जे लिहीत आहे, ते पहा- ‘मुंबई में माल वही दुकान बिकता है। उन्होंने अपनी दुकानपर दुसरे के नामका बोर्ड लगाने की भूल की थी। बोर्ड बदल तो निजारनी उसूल के अनुसार दुकान भी बोर्डवाले की हो गयी। साहिर का नाम उन दिनो फिल्मों की सफलता की जमानत समझा जाता था। दुसरों की मदत करना उनके लिए मुश्कील न था। जांनिसार अख्तर उनके दोस्त ही नही जरूरत से ज्यादा जल्द शेर लिखनेवाले शायर भी थे। साहिर की एक पंक्ती सोचने में जितना समय लगता था, जांनिसार उतने समय में पच्चीस पंक्तियो जोड लेते थे। एक तरफ जरूरत थी, दुसरी और दौलत। जांनिसार ने शायद अपनी एक गजल में इस ओर इशारा किया है-
शायरी तुझको गंवाया है बहुत दिन हमने।
गद्य आणि पद्य दोन्ही क्षेत्रांत शब्दांवर जबरदस्त हकुमत असलेला हा कलावंत. भले तो आता गेला असेल, पण त्यांच्या साहित्यसंपदेत ती दिसणार आहे आणि तेव्हा त्यांच्याच शब्दांत सांगायचं तर...
सवाल ही हयात है । सवाल ही कायनात है
सवाल ही जवाब है । सवाल इन्कलाब है
कोई जबाब दे न दे । सवाल पूछते रहो।

Web Title: Whose to see, many times to see!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.