या प्रवृत्ती कोण रोखणार ?
By Admin | Updated: September 28, 2015 22:01 IST2015-09-28T22:01:51+5:302015-09-28T22:01:51+5:30
नरेंद्र दाभोलकर आणि गोविंदराव पानसरे यांच्या खुनानंतरचा क्रमांक कर्नाटकातल्या कलबुर्गींचा लागला. त्यानंतर के.एस. भगवान मारले जायचे होते

या प्रवृत्ती कोण रोखणार ?
नरेंद्र दाभोलकर आणि गोविंदराव पानसरे यांच्या खुनानंतरचा क्रमांक कर्नाटकातल्या कलबुर्गींचा लागला. त्यानंतर के.एस. भगवान मारले जायचे होते आणि आता आणखीही काही नावे ‘मारले जाणाऱ्यांच्या यादीत’ आली आहेत. पानसरे यांच्यावर गोळ््या झाडणारा जो आरोपी पोलिसांनी सध्या ताब्यात घेतला आहे तो समीर गायकवाड स्वत:च आपल्या मित्राशी (की मैत्रिणीशी) मोबाईलवर बोलताना म्हणाला ‘पानसरेंचा निकाल लागला आहे’. समीर गायकवाड हा कर्नाटकातील संकेश्वरचा राहणारा असून तो सनातन संस्थेचा कायम सभासद (त्यांच्या भाषेत साधक) आहे. पानसरे यांच्या खुनाचे धागेदोरे कलबुर्गींच्या खुनाशी जुळतात काय याचा तपास पोलीस घेत असून ते तसे जुळल्यास हा गायकवाड त्या दोन्ही खुनांशी संबंधित असल्याचे स्पष्ट होईल. पानसरे, कलबुर्गी आणि दाभोलकर या तिघांच्याही खुनाची आखणी व अंमलबजावणी सारखीच असल्यामुळे त्याच्यावर दाभोलकरांच्या हत्त्येचा आरोप येण्याची शक्यताही नाकारता येत नाही. सनातन संस्थेचे जे अतिरेकी आणि खुनशी तत्त्वज्ञान अलीकडे उजेडात येऊ लागले आहे, ते याचीच साक्ष देणारे आहे. दाभोलकर, पानसरे, कलबुर्गी (ते वाचलेले भगवान) यांच्यावर झालेले वा यापुढे होऊ शकणारे हल्ले चोरी, दरोडेखोरी वा लूटमार यासारख्या अपराधांखातर झाले वा होणार नाहीत. त्या साऱ्यांची विचारांची पद्धत पुरोगामी, विवेकवादी, आधुनिक आणि समाजहितैषी आहे. त्यांच्या विचारपद्धतीला विरोध करणारी एक सनातन मनोवृत्तीही महाराष्ट्रात, कर्नाटकात आणि गोव्यासह देशाच्या इतर भागातही आहे. ती आजची नाही. तिचा इतिहास थेट गोडशापर्यंत व त्याच्याही मागे नेता येणारा आहे. दुर्दैव हे की तेव्हापासूनच अशा खुनांचे गोडवे गाणारी आणि त्यातल्या मारेकऱ्यांवर स्तुतीसुमने उधळणारी वृत्तीही कायम राहिली आहे. ती विचारविरोधी हिंसाचाराला उत्तेजन देणारी आणि समाजाला मध्ययुगीन मानसिकतेशी बांधून ठेवणारी आहे. तिचा प्रचार व प्रसार आताच्या सोशल मीडियावरूनही जोरात होतो आणि तो करण्यात सनातनी प्रवृत्तींनी ग्रासलेल्या मुलांएवढाच मुलींचाही वर्ग मोठा आहे. अशा एका वाहिनीने प्रचारात आणलेली एक गोष्ट येथे नमूद करण्यासारखी आहे. ७० हजार रुपये वेतन असलेली एक नववधू आपल्या लग्नाची बोलणी सुरू असताना म्हणते, ‘ मी लग्नानंतर नोकरी सोडेन आणि नवरा, मुले आणि घरातील वडिलधाऱ्यांची सेवा करीन.’ तिच्या या पोपटपंचीनंतर आलेल्या प्रतिक्रिया ‘ हीच खरी भारतीय संस्कृती आहे’ अशा ठरलेल्या छापाच्या राहिल्या आहेत. दाभोलकर, पानसरे किंवा कलबुर्गी या केवळ व्यक्ती नसून ती विचारांची माध्यमे आहेत. त्याच प्रमाणे त्यांना मारायला निघालेली सनातनी माणसेही व्यक्ती नसून एक प्रवृत्ती आहे. माणसांचा बंदोबस्त करता येतो. पोलीस, न्यायालये आणि तुरुंग त्याचसाठी असतात. परंतु प्रवृत्तींचा बंदोबस्त कसा करायचा? त्या साथीच्या रोगासारख्या लागट असतात. एकाच्या संस्काराने दुसऱ्याला आणि दुसऱ्याच्या संपर्काने तिसऱ्याला त्या ग्रासत असतात. त्यांची वाहक बनलेली माणसे पकडली गेली तरी त्या तशाच कायम राहतात आणि आपल्या समाजात त्यांना अनुयायीही मिळतात. त्यांचे समर्थन करायला राजकीय पक्ष पुढे येतात आणि त्यांची स्वत:ची प्रचारपत्रेही त्यांचे ढोल वाजवीत असतात. तसे प्रत्यक्ष न करणाऱ्यांचा पण मनातून त्यांना पाठिंबा देणाऱ्यांचाही वर्ग मोठा असतो. या वर्गाची या साऱ्या हिंसाचाराबाबतची प्रतिक्रिया ‘हे असे चालणारच’ किंवा ‘मरणाऱ्यांनीच हे ओढवून घेतले आहे’ अशी असते. आमचे परंपरागत व बंदिस्त जीवन आम्हाला सुखकारक आहे, त्यात तुम्ही लुडबूड करणारे कोण अशीच या वर्गाची मानसिकता असते. प्रत्यक्ष हिंसाचार करणारे जेवढे अपराधी असतात तेवढाच अपराध त्यांना असा प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष पाठिंबा देणाऱ्यांचाही असतो. त्यातून या प्रवृत्तींच्या हातून बळी गेलेल्यांच्या मृत्यूचे तपास वर्षानुवर्षे लांबत गेले की तपास करणाऱ्या यंत्रणा आणि त्यांच्यामागे असणाऱ्या सरकारसारख्या राजकीय व्यवस्थांविषयीचाही संशय सामान्य माणसांच्या मनात दाटू लागतो. देशातील सध्याची राजकीय परिस्थितीही अशा संशयांना बळकटी देणारीच आहे. इंदिरा गांधींचा खून करणाऱ्या गुन्हेगारांना सुवर्ण मंदिरात श्रद्धांजली वाहिली जाते. त्याच आरोपात अडकलेल्या इतरांना सन्मानाचे सरोपे दिले जातात आणि ते देणाऱ्या संघटनांशी व पक्षांशी देशाचे राष्ट्रीय म्हणविणारे पक्ष निवडणुकीत युती करतात. तात्पर्य, पोलीस आणा नाहीतर सीबीआय, एनआयए आणा नाहीतर गुप्तचर यंत्रणा, त्यांच्याकडून होणारे काम वरवर दिसणारी हिंसाचाराची टोकदार पाने खुडण्यापर्यंतच मर्यादित राहणार आहे. या प्रवृत्तींच्या मुळापर्यंत जायचे तर त्यांची मानसिक घडणच बदलावी लागते. ते पोलिसांचे काम नाही. समाजाच्या शिक्षकांचे, नेत्यांचे, संस्कारकर्त्यांचे, शिक्षितांचे, आधुनिक मनोवृत्ती बाळगणाऱ्यांचे आणि शिक्षित माताभगिनींचे ते काम आहे. राजकारणालाही अहिंसेचा संस्कार घडविता येतो व तो या देशाने अनुभवलाही आहे. मात्र तसे न करता केवळ पोलिसांवर अवलंबून राहणे हे आपली फसवणूक करून घेण्यासारखे आहे. एका सार्वत्रिक व सर्वस्पर्शी सावधानतेची त्यासाठी आवश्यकता आहे.