कृतघ्न कोण?

By Admin | Updated: June 8, 2015 00:01 IST2015-06-08T00:01:20+5:302015-06-08T00:01:20+5:30

भारताचे भाग्यविधाते व देशाचे पहिले पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू यांची १२५ वी जयंती १४ नोव्हेंबरला आणि ५० वी पुण्यतिथी २७ मेला आली.

Who is ungrateful? | कृतघ्न कोण?

कृतघ्न कोण?

भारताचे भाग्यविधाते व देशाचे पहिले पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू यांची १२५ वी जयंती १४ नोव्हेंबरला आणि ५० वी पुण्यतिथी २७ मेला आली. जयंतीचा शतकोत्तर रौप्यमहोत्सव आणि पुण्यस्मरणाची सुवर्णतिथी या दोन्ही मोठ्या व स्मरणदायी घटना एकाच वेळी आल्या. या देशाच्या नव्या सरकारने मात्र त्यांची घ्यावी तशी दखल घेतली नाही. कुठे समारंभ नाही, काही सोहळा नाही की त्या पुण्यपुरुषाची आम्हाला आठवण आहे याची पुसटशी जाणीवही नाही. जर्मनीचे चॅन्सेलर विली ब्रँड एकदा म्हणाले, माणसांसारखेच समाजही कृतघ्न होतात. आपला देश नेहरूंबाबत तसा झाला आहे काय? या मुहूर्तावर काही मान्यवरांनी त्यांच्यावर अभ्यासपूर्ण ग्रंथ लिहिले. अनेक भाषांमधून त्यांच्या कर्तृत्वाची गाथा सांगणारी पुस्तके प्रकाशित झाली. परंतु सरकार व प्रशासन यांच्या पातळीवर एवढ्या मोठ्या घटनेची घ्यावी तशी दखल घेतली गेल्याचे दिसले नाही. लहानसहान पुढाऱ्यांच्या छब्या अशा प्रसंगी पहिल्या पानावर प्रकाशित करणारी आणि त्यांच्यावर रकानेच्या रकाने भरणारी वृत्तपत्रेही त्याबाबत हातचे राखूनच राहिली. स्वातंत्र्यलढ्याचे सर्वाधिक लोकप्रिय व तरुण नेते, समाजवादाचे पहिले राष्ट्रीय प्रवक्ते, ऐन तारुण्याची नऊ वर्षे देशासाठी तुरुंगात राहिलेले सत्याग्रही, स्वातंत्र्याच्या लढ्यात आपले सर्वस्व दान करणारे कार्यकर्ते, गांधीजींचे राजकीय वारसदार, देशात लोकशाही राज्यघटना रुजविणारे लोकशाही व समाजवादाचे प्रशासक आणि प्रतिनिधी, नव्या पिढ्यांचे आवडते ‘चाचा’, जगातील दीडशेवर तटस्थ राष्ट्रांना एकत्र आणणाऱ्या ‘नाम’ या चळवळीचे संस्थापक, ख्रुश्चेव्हपासून केनेडींपर्यंत आणि सरोजिनींपासून मेरिलीन मन्रोपर्यंतच्या संवेदनशील कलावंतांच्या गळ्यातले ताईत, देशातील दुष्काळांची समाप्ती करणारे नियोजक, भाक्रा-नान्गल आणि हिराकुंडसारख्या मोठ्या धरणांपासून भाभा अणुशक्ती केंद्रापर्यंतच्या सगळ्या विकास योजनांना चालना देणारे द्रष्टे, अशा अनेक विशेषणांनी ज्यांना देशानेच नव्हे तर विदेशांनी गौरविले त्यांचे शासकीय स्तरावर साधे स्मरण करावे असे या देशाच्या आताच्या सरकारला वाटू नये काय? नेहरूंच्या विचारसरणीहून वेगळी विचारधारा असणाऱ्यांचे सरकार आज सत्तेवर आहे आणि या सरकारच्या नेत्याने त्याच्या आरंभीच्या भाषणात देशाच्या पूर्वसुरींनी व जुन्या नेत्यांनी केलेल्या देशसेवेचा गौरवही केला आहे. मात्र तो सारा देखावाच असावा काय? नेहरूंची परंपरा पुढे शास्त्रीजी व इंदिरा गांधींच्या दुर्गावतारापर्यंत, राजीव गांधींच्या आयटी क्रांतीपासून नरसिंहराव-मनमोहन सिंग यांच्या जास्तीच्या मुक्त अर्थव्यवस्थेपर्यंत चालून देशाला विकासाच्या पातळीवर नेणारी ठरली. ही परंपरा नसती तर आताच्या सरकारला त्याच्या बाता फक्त हवेतच मारता आल्या असत्या. समाजाने व देशाने त्याच्या इतिहासाविषयी नेहमी कृतज्ञ असले पाहिजे. मात्र हा इतिहास नुसता पौराणिक वा मध्ययुगीन असून चालत नाही, तो नजीकचाही असावा लागतो. की, नव्या राजवटीला काही माणसे विस्मरणातच टाकायची आहेत? स्वातंत्र्याच्या लढ्याचे तेजस्वी पर्व त्याला इतिहासातून वजाच करायचे आहे? नेहरूंनी या देशाला धर्मनिरपेक्ष बनविण्याचा ध्यास घेतला. त्या मूल्याविषयीची त्यांची निष्ठा केवळ तात्त्विक नव्हती. ती देशाची राजकीय गरजही होती. काश्मीर, पंजाब, द्रविडनाडू, हैदराबाद आणि भोपाळसाठीच ती महत्त्वाची नव्हती; केरळ, नागालँड, मणिपूर, मिझोरम यांच्या ऐक्यासाठीही ती गरजेची होती. आताचे सरकार व त्याचा पक्ष यांची या मूल्याविषयीची निष्ठाच संशयास्पद आहे. या संदर्भात नेहरूंएवढा सर्वसमावेशक दृष्टीचा व मूल्याविषयीच्या असीम निष्ठेचा नेता विस्मरणात गेला की त्याच्या स्मरणाची देशाच्या राज्यकर्त्यांनी जाणीवपूर्वक उपेक्षा केली? या राज्यकर्त्यांना वा त्यांच्या पाठीराख्या संस्थांना धर्मनिरपेक्षतेचे मूल्यच नकोसे आहे. ते सातत्याने हिंदुत्वाची म्हणजे एकधर्मी राष्ट्रीयत्वाची भाषा बोलतात. त्यांना धर्मनिरपेक्षता सोडा, सर्वधर्मसमभावही फारसा मान्य नाही. देशातील जनतेची ‘रामजादे आणि हरामजादे’ अशी फाळणी करण्याची त्यांची तयारी आहे. मोदींना (म्हणजे आमच्या विचाराला) मत न देणाऱ्यांनी पाकिस्तानात चालते व्हावे असे म्हणण्यापर्यंत त्यांची मजल गेली आहे. खुद्द नरेंद्र मोदी हे आपल्या भाषणात ‘मी सत्तेवर येण्याआधी या देशातील लोकांना भारतीय म्हणवून घेण्याची लाज वाटत होती’ असे विदेशात परवा म्हणाले. नेहरू, शास्त्री, इंदिरा गांधी, मोरारजी, राजीव गांधी, नरसिंहराव, वाजपेयी आणि मनमोहनसिंग यांचा काळ देशाला आपली लाज वाटायला लावणारा होता असे मोदी म्हणत असतील तर त्यांच्या अचाटपणाचे कौतुकच केले पाहिजे. त्यांच्या अगोदरच्या ६० वर्षांत देशात काही घडलेच नाही असेही मग म्हटले पाहिजे. मात्र ते स्वत: ज्या पायावर आज उभे आहेत तो कोणी घडविला याचे उत्तर या स्थितीत मग त्यांना द्यावे लागणे भाग आहे. हे उत्तर त्यांच्याजवळ नाही हे त्यांनाही सांगावे लागेल. एक गोष्ट आणखीही, नेहरू व गांधी यांचा देशाला विसर पाडण्याचा केवढाही प्रयत्न कोणत्याही शक्तीने केला तरी तो यशस्वी व्हायचा नाही. कारण या विभूती येथील लोकमानसाने कधीच्याच श्रद्धापूर्वक आपल्या मानल्या आहेत.

Web Title: Who is ungrateful?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.