काँग्रेस पक्ष कोणत्या दिशेने?

By Admin | Updated: March 9, 2015 23:19 IST2015-03-09T23:19:35+5:302015-03-09T23:19:35+5:30

पोलादी ड्यूक अशी ओळख असलेले बिस्मार्क शतकापूर्वी म्हणाले होते की, ‘‘शक्यतेची कला म्हणजे राजकारण’’. अर्थात बिस्मार्क हे सदैव घोड्यावर बसलेले चित्रित केलेले

In which direction is the Congress party? | काँग्रेस पक्ष कोणत्या दिशेने?

काँग्रेस पक्ष कोणत्या दिशेने?

हरिष गुप्ता,
(‘लोकमत’ समूहाचे नॅशनल एडिटर)

पोलादी ड्यूक अशी ओळख असलेले बिस्मार्क शतकापूर्वी म्हणाले होते की, ‘‘शक्यतेची कला म्हणजे राजकारण’’. अर्थात बिस्मार्क हे सदैव घोड्यावर बसलेले चित्रित केलेले असल्याने हे वाक्य त्यांच्या तोंडी हास्यास्पदच ठरले होते. पण एका विशाल लोकशाहीचे प्रमुख असलेल्या व्यक्तीलासुद्धा लोकशाही ही शक्यतेच्या परिघात येईल असे वाटले होते. राजकारणात काय शक्य असू शकते वा नसू शकते याची यादी प्रत्येक युगात निराळी असते. अलीकडे नरेंद्र मोदींच्या उदयानंतर काँग्रेसच्या पुनरुज्जीवनाची शक्यता दुरावली होती. काँग्रेसचे ४४ वर्षे वयाचे उपाध्यक्ष काँग्रेसला देशाच्या राजकारणात मध्यवर्ती स्थान मिळवून देऊ शकतील याची आशा दुरावली होती. नेता म्हणून ते पक्षासाठी संकट ठरू शकतील असे काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांना वाटत होते. राजकारणात ११ वर्षे घालवूनही राहुल गांधी हे अबोलच राहिले होते. कारण राजकीय वादात सहभागी होणे हे त्यांच्या प्रवृत्तीत बसत नव्हते.
ते बोलत का नाहीत? महत्त्वाच्या क्षणी ते दिसेनासे का होतात? असे पक्षातील अनेकांना वाटत होते. गेल्या वर्षी पक्षाचे ४४ खासदार निवडून आले होते. ती संख्या २२ वर आणण्यासाठी राहुल गांधींकडे पक्षाची सूत्रे सोपवणे हा उत्तम मार्ग आहे, असे अनेकांना वाटत होते. पण पोलादी पुरुष आणि राहुल हे पुन्हा कृतिशील झाले आहेत. पुढील महिन्यात होणाऱ्या काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत राहुल हे पक्षाच्या अध्यक्षपदाची सूत्रे स्वत:कडे घेतील असे अनेकांना वाटते. त्यांची आई सोनिया गांधी या संसदीय पक्षाच्या चेअरपर्सन म्हणून पक्षाची सूत्रे पडद्यामागून हलवत राहतील. आता स्वत:ची माणसे निवडण्याची संधी राहुलना मिळणार असली तरी बरीच माणसे त्यांनी पक्षाचे उपाध्यक्ष या नात्याने निवडली होती. मे २०१४मध्ये पक्षाची धूळधाण झाल्यापासून आतापर्यंत पक्षश्रेष्ठींनी अनेक पर्याय निवडले होते पण घराणेशाहीला निरोप देण्याचा प्रश्नच उद्भवत नव्हता कारण पक्षनेत्यातील दुफळी विकोपाला गेली होती. त्यामुळे ते नेते पक्षाची सूत्रे सांभाळण्याबाबत सोनिया गांधींना गळ घालतील. पण तसे करून ते देशातील २० कोटी तरुण-तरुणींशी पक्षाचे संबंध प्रस्थापित करण्याची संधी गमावून बसतील.
राहुल गांधींच्या काही अडचणी आहेत. ते मितभाषी आहेत तसेच संथपणे विचार करणारे आहेत. पण ते हिंदी छान बोलतात. तसेच ते आधुनिक विचारसरणीचे आहेत. पक्षश्रेष्ठींकडे या गोष्टीचा अभाव आढळतो. पंतप्रधान नरेंद्र मोदीचे उदाहरण घेऊ. आपल्या आकर्षक पोशाखाने आणि तितक्याच आकर्षक विकासाच्या गोष्टींसह त्यांनी बीबीसीने तयार केलेल्या निर्भयाच्या लघुपटाच्या विरोधात मोहीम उभारली. पण ती अपयशी ठरल्यानंतर ते आता लोकांच्या इंटरनेटच्या अधिकारांवर नियंत्रण आणण्याचा विचार करीत आहेत. राहुल आणि त्यांची बहीण प्रियंका हे आपल्या तरुणपणातील भीषण अनुभव अजूनही विसरलेले नाहीत. त्यांच्या आजीवर बुलेटचा वर्षाव झालेला त्यांनी पाहिला तसेच त्यांच्या वडिलांच्या शरीराच्या मानवीबॉम्बने चिंधड्या उडाल्याचेही त्यांनी पाहिले. या दुर्घटना अद्यापही रहस्यात गुरफटल्या आहेत. पण या दोन दुर्घटनांचे गंभीर परिणाम त्या दोघांच्याही व्यक्तिमत्त्वावर झाले आहेत. पण विपश्यनेच्या आधारे दोघेही त्यातून बाहेर पडले आहेत.
प्रियंकाने बौद्ध वाङ्मयाचा अभ्यास करून विपश्यना शिकून घेतली आहे. तिच्या भावानेही तिचे अनुकरण केले आहे. त्या दोघांवरही दु:खाची छाया पडलेली आहे. राहुलने जर पक्षाची सूत्रे सांभाळायचे ठरविले तर प्रियंका नक्की त्याची साथ करील. काँग्रेसला नवीन रूप देण्यासाठी राहुल काय करणार आहे हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. पण तरीही काँग्रेस ही पक्षाला प्राधान्य देणारी असावी, नेत्याला प्राधान्य देणारी नसावी असे त्यांना वाटते. एकूणच ‘ब्रॅण्ड’ म्हणून काँग्रेसची ओळख निर्माण करावी असे त्यांना वाटते, अशा तऱ्हेचा अहवाल माजी बँकर अलंकार सवाई यांना देण्यात आला आहे. राहुल यांनीदेखील पक्षाची यंत्रणा बूथ पातळीपर्यंत नेण्याचे ठरविले आहे. या यंत्रणेचा हेतू केवळ मते मिळविणे असा नसून तळागाळातील लोकांच्या भावना जाणून घेऊन पक्षाचे धोरण निश्चित करणे असा आहे. माजी आयएएस अधिकारी कोप्पल राजू यांच्याकडे बूथ पातळीपर्यंत पक्षाला नेण्याचे काम सोपविण्यात आले आहे. राहुल यांनी ही कल्पना आपचे अरविंद केजरीवाल यांच्याकडून उसनी घेतली असू शकते पण त्यात तथ्य निश्चित आहे.
आपमधून काही नेते बाहेर पडले असले तरी मोहल्ला मिटिंगचे तंत्र पक्षाने कायम ठेवले तर हा पक्ष अजूनही तग धरू शकतो. या उलट मोदी आणि भाजपा हे आपली चमक गमावून बसले आहेत. कारण निवडणुकीपूर्वी मोदी हे केवळ भाषणबाजीच करीत होते. अजिबात कुणाचे ऐकत नव्हते. त्यांनी लोकांचे ऐकले असते तर प्रत्येक भारतीय हा आधी हिंदू आहे, अशा तऱ्हेचे वक्तव्य त्यांनी मान्य केले नसते. तसेच घरवापसीचे समर्थनही केले नसते. त्यांनी त्या संकल्पनांपासून स्वत:ला दूर ठेवण्याचा नंतर प्रयत्न केला पण व्हायचे ते नुकसान होऊन गेले होते.
मोदीचे सरकार डळमळू लागले आहे. भाजपाचे २८२ सदस्य असले तरी त्यापैकी अनेकांवर संघाचा प्रभाव आहे. तसेच मोदी आणि संघ यांच्यात अनेक चुका घडल्या आहेत. पीडीपीशी जम्मू-काश्मिरात युती करणे ही त्यापैकी एक आहे. ही युती फारकाळ टिकणार नाही. अनेकांचे म्हणणे होते की अत्यंत महत्त्वाच्या प्रसंगात राहुलने हिमालयात जाणे पसंत केले होते पण आता त्यांना अशा प्रसंगाला तोंड द्यावे लागणारच आहे. संपुआ सरकारच्या भूसंपादन विधेयकात मोदी सरकारने जे बदल केले आहेत त्यांच्या विरोधात यूथ काँग्रेस १६ मार्चला संसदेस घेराव करणार आहे. पण सत्तेत जाण्याचा तो मार्ग नव्हे. राहुल हे लोकात मिसळणे सुरू करतील तेव्हाच लोकांच्या अडचणी त्यांना समजतील. तसे न केल्यास ते दुर्दैव ठरेल. देशाला समजून न घेता जर मोदी राज्य करीत असतील तर ते सोन्यासारखी संधी गमावून बसतील, पण आपल्या मनाची दारे बंद केल्याने राहुल गांधींनाही तशी संधी मिळणार नाही!

 

Web Title: In which direction is the Congress party?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.