कुठे चाललीत बौद्ध समाजातील लग्ने?
By Admin | Updated: June 4, 2015 23:12 IST2015-06-04T23:12:35+5:302015-06-04T23:12:35+5:30
आंबेडकरी चळवळीचा परिणाम म्हणून शहरातील बौद्ध समूह आज बंगल्यात राहायला गेला. बौद्ध कुटुंबात जिथे उच्चशिक्षित अभावाने दिसत होते तिथे बौद्ध कुटुंबात दोन-चार सदस्य उच्चशिक्षित दिसू लागले.

कुठे चाललीत बौद्ध समाजातील लग्ने?
आंबेडकरी चळवळीचा परिणाम म्हणून शहरातील बौद्ध समूह आज बंगल्यात राहायला गेला. बौद्ध कुटुंबात जिथे उच्चशिक्षित अभावाने दिसत होते तिथे बौद्ध कुटुंबात दोन-चार सदस्य उच्चशिक्षित दिसू लागले. आंबेडकरी चळवळीचे ध्येय दलित समाजाचा आर्थिक विकास करणे हेच आहे. तेव्हा शहरी बौद्ध समाजाची आर्थिक उन्नती झाली असेल तर ही बाब निश्चितच स्वागतार्ह आहे याविषयी दुमत नको. पण कालचा श्रमजीवी बौद्ध समाज आजचा मध्यमवर्गीय झाल्यामुळे मध्यमवर्गाचे सर्व गुणधर्म त्याच्यात आले. आता हा वर्ग तोंडाने आंबेडकरवाद जरी सांगत असला, तरी आंबेडकरी विचारांशी त्याची नाळ केव्हाचीच तुटली आहे. आत्मकेंद्रित झालेल्या बौद्ध मध्यमवर्गीयांची ‘बहुजन हिताय - बहुजन सुखाय’ या ऐवजी ‘स्वहिताय - स्वसुखाय’ अशी स्वार्थप्रेरित अप्पलपोटी घोषणा झाली आहे. राखीव जागेमुळे प्रस्थापित व्यवस्थेत त्याने आपले एक स्थान निर्माण केले आहे. त्यामुळे दीन-दुबळ्या दलित समाजावर अन्याय करणाऱ्या व्यवस्थेशी त्याचे आता कुठलेच भांडण राहिलेले नाही. सबब मध्यमवर्गीय खोटी प्रतिष्ठा जपण्यासाठी तो आता चुकीच्या प्रथा-परंपरा रूढ करीत आहे ही बाब चिंताजनकच म्हटली पाहिजे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी एक नवा समतावादी आदर्श समाज निर्माण करण्यासाठी बौद्ध धम्माचा स्वीकार केला. धम्म स्वीकारल्यानंतर बौद्ध समाजाने जीर्ण व समाजघातकी परंपरांना नाकारणारी एक आदर्श अशी बौद्ध सांस्कृतिक जीवनपद्धती निर्माण करणे अपेक्षित होते; पण असे झाले नाही. बौद्ध म्हणविणाऱ्यांचे एकूण वर्तन काही अपवाद वगळता हिंदू रूढी-परंपरांना अनुसरूनच होत आहे, याचे एक ज्वलंत उदाहरण म्हणजे बौद्ध समाजातील लग्नविधींचे होय. हिंदू समाजातील हुंडा प्रथेमुळे कितीतरी तरुणींना हुंडाबंदीचा कायदा असतानाही सासरच्या मंडळीकडून शारीरिक - मानसिक छळ सोसावा लागतो, प्रसंगी जीव गमवावा लागतो अशा स्वरूपाच्या बातम्या - घटना नित्यही ऐकण्या-वाचण्या- पाहण्यात येत असतात. हिंदू समाजातील हीच जीवघेणी हुंड्याची चाल आता बौद्ध समाजातही आली आहे. इकडेही आता हुंड्याचे भाव ठरू लागले आहेत. लाखोंनी हुंडा दिला-घेतला जात आहे. प्रश्न असा की, बौद्ध समाजातही जी हुंडा प्रथा मूळ धरीत आहे ती कोणत्या फुले-आंबेडकरवादात बसते आणि कोणती आदर्श बौद्ध संस्कृती निर्माण करते हा विचार करण्यासारखाच प्रश्न नाही काय? हिंदू समाजातील हुंडा प्रथेमागे एक फसवे का असेना; पण लबाड तर्कशास्त्र तरी आहे, ते असे की, आमच्या मुलाला शिक्षणासाठी अमुक इतका खर्च आला आहे तेव्हा तुमची मुलगी सुखात राहावयाची असेल तर तुम्ही अमुक इतका हुंडा दिला पाहिजे किंवा नोकरी लावण्यासाठी तमुक इतके पैसे दिले पाहिजेत. अथवा एखादा फ्लॅट घेऊन दिला पाहिजे वा सोने-नाणे घातले पाहिजे. जणू मुली या हवा-पाण्यावरच वाढलेल्या असतात वा मुलींना वाढविण्यासाठी, त्यांच्या शिक्षणासाठी वधूपित्याला काही खर्चच आलेला नसतो; पण प्रश्न असा की, बौद्ध तरुण जेव्हा हुंड्याची अपेक्षा ठेवतात वा हुंडा घेतात तेव्हा त्यांनी त्यांच्या शिक्षणासाठी कोणता वैयक्तिक खर्च केलेला असतो? सबब हुंड्याची प्रथा ज्या गतीने रुजत आहे ती पाहता भविष्यात बौद्ध समाजातही हुंडाबळी पडू शकतात. हा सामाजिक धोका समाजातील शहाण्या-सुरत्यांच्या लक्षात का येऊ नये?
बौद्ध समाजासाठी कुठलीही आदर्श लग्न नियमावली नसल्यामुळे लग्नपत्रिकांवर विशेष पाहुणे म्हणून काही तथाकथित बड्यांची नावे टाकण्यात येतात. लग्नाची वेळ टळली तरी उपस्थितांना ताटकळत ठेवून तथाकथित प्रतिष्ठितांचे सत्कार सोहळे करण्यातच दोन-तीन तास घालवितात. मंत्री-आमदार-खासदार असेल तर ते येईपर्यंत लग्न लावण्यात येत नाही. मग किती का वेळ लागेना. पण असे वागताना चार-दोन तथाकथित प्रतिष्ठितांसाठी बहुसंख्य उपस्थितांना दुय्यम-तिय्यम ठरवून त्यांचा कळत-नकळत आपण अपमानच करीत असतो याचे भान संबंधिताना राहत नाही. लग्नात श्रीमंतीचे उर्मट प्रदर्शन करणे, बँडबाजाच्या तालावर चार घोट घेऊन नाचत-डुलत येण्यामुळे लग्न वेळेवर न लागणे, लग्नात अन्न-पाण्याची नासाडी होणे हे सारे प्रकार घडत असतात; पण गंभीर बाब अशी की, जातिव्यवस्थेला स्थान नसणारा बौद्ध धम्म स्वीकारणारे बौद्धानुयायी पूर्वाश्रमीच्या पोटजाती पाळून पोटजातीतच लग्ने करतात (काही अपवाद) यास काय म्हणावे?
मध्यमवर्गीय बौद्धांकडे चार पैसे असल्यामुळे स्वत:च्या बडेजावाचे प्रदर्शन करण्याकडे जर त्यांचा कल असेल तर ते मानवी स्वभावासच धरून आहे; पण प्रश्न असा की, हिंदू समाजातील हुंडा प्रथा स्वीकारणे, पोटजाती पाळणे, कर्मकांडे करणे या परंपरा जर आपण पाळत असू तर मग हिंदू जीवन पद्धतीत व बौद्ध जीवन पद्धतीत फरक तो काय राहिला? शिवाय बौद्ध भिक्खूसंघ, धम्मपरिषदा आयोजित करणारे महाउपासक बौद्धांसाठी आदर्श अशी विवाह आचारसंहिता का तयार करू शकत नाहीत? किमान हुंडा फेम लग्नास भिक्षू संघ वा धम्म प्रचाराचे कार्य करणारे महाउपासक हजर राहणार नाहीत, अशी भूमिका तरी संबंधितांनी का घेऊ नये?
- बी. व्ही. जोंधळे