कसले अधिकारी?
By Admin | Updated: August 8, 2016 04:05 IST2016-08-08T04:05:46+5:302016-08-08T04:05:46+5:30
हिजबुल मुजाहिदीन या अतिरेकी संघटनेचा कमांडर म्हणून ओळखला जाणारा बुऱ्हान वानी नावाचा अत्यंत तरुण अतिरेकी सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत ठार झाल्यापासून धगधगणारे काश्मीर

कसले अधिकारी?
हिजबुल मुजाहिदीन या अतिरेकी संघटनेचा कमांडर म्हणून ओळखला जाणारा बुऱ्हान वानी नावाचा अत्यंत तरुण अतिरेकी सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत ठार झाल्यापासून धगधगणारे काश्मीर खोरे अजूनही पूर्ण शांत झालेले नसतानाच तेथील सरकारी प्रशासन सांभाळणाऱ्या दोन उच्चपदस्थ अधिकाऱ्यांमधील हमरीतुमरी उघड झाल्याने त्या राज्यातील सरकार, प्रशासन आणि उच्च अधिकारी यांच्यातील तथाकथित समन्वयाचे पितळ उघडे पडले आहे. जम्मू-काश्मीरमधील पीडीपी-भाजपा सरकारवर आणि ते सरकार त्या राज्यातील अशांत स्थिती हाताळण्यात अकार्यक्षम ठरल्याबद्दल एरवीही टीका होतेच आहे. त्यातच हा नवा प्रकार. दोनच दिवसांपूर्वी रियाझ अहमद शहा नावाच्या एका एटीएम रक्षक युवकाची संशयास्पद स्थितीत हत्त्या करण्यात आली. त्याच्या हत्त्येस जबाबदार म्हणून पोलिसांनी अज्ञात सुरक्षा सैनिकांच्या विरोधात गुन्ह्याची नोंददेखील केली. रियाझच्या अशा संशयास्पद मृत्यूमुळे राज्य सरकारच्या अर्थ विभागात काम करणाऱ्या रुवेदा सालेम नावाच्या एका महिला आयएएस अधिकाऱ्याने संतप्त होऊन फेसबुकवर मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांचे सरकार ढोंगी म्हटले. रुवेदा मूळच्या काश्मीर खोऱ्यातल्याच रहिवासी असून आधी त्या आयपीएसमध्ये होत्या आणि नंतर आयएएसमध्ये गेल्या. त्यांचा शेरा खरे तर त्या ज्या सरकारच्या सेवेत आहेत, त्या सरकारच्या विरोधातील थेट शेरा होता. सरकारी नोकरांसाठी आचारसंहितेचे जे कडक नियम आहेत, ते लक्षात घेता त्या कारवाईला पात्रदेखील ठरतात. पण त्यांच्या या शेऱ्याची दखल राज्य सरकारने घेण्याऐवजी सोपोर येथील पोलीस अधीक्षक हरमितसिंग मेहता या आयपीएस अधिकाऱ्याने घेतली. त्यांनी रुवेदा सालेम यांना ‘अजाण महिला’ असे तर म्हटलेच शिवाय त्यांनी सरळ नोकरीचा राजीनामा द्यावा आणि फुटीरांच्या संघटनेत प्रवेश करावा, असा अनाहूत सल्लादेखील दिला. तो सल्ला झुगारुन देत मग रुवेदा यांनी मेहता हे स्त्रीद्वेष्टे आहेत आणि सारे काश्मिरी अतिरेकी असल्याच्या सर्वदूर पसरलेल्या चुकीच्या प्रचाराचा बळी आहेत, असे प्रत्युत्तर दिले. मेहता पुन्हा गप्प बसले नाहीत. त्यांनी काश्मीरची तुलना थेट अफगाणिस्तानशी करून टाकली. पण हे सारे येथेच थांबले नाही. त्यांच्यातील हा विसंवाद पुढेही सुरूच राहिला. विशेष म्हणजे दोहोंनी आपण आपल्या भूमिकांवर ठाम असल्याचे माध्यमांना निक्षून सांगितले. फरक इतकाच की मेहतांच्या मते ते सरकारच्या वतीने मतप्रदर्शन करीत होते तर रुवेदा त्यांच्या मनातील भावना बोलून दाखवित होत्या. पण आश्चर्य म्हणजे समाजमाध्यमांमधून या दोन्ही उच्च अधिकाऱ्यांमध्ये अशी हमरीतुमरी होत असताना त्याची दखल घ्यावी आणि त्यांना त्यांच्या पदांची व जबाबदाऱ्यांची आठवण करून द्यावी, असे त्यांच्यापैकी कोणाच्याही वरिष्ठाला वाटले नाही. आयएएसच्या परीक्षेत पहिला आलेल्या शाह फैझलने काश्मीरातील दु:स्थितीविषयी ज्या भावना व्यक्त केल्या होत्या, त्या सार्थच होत्या म्हणायचे