शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
3
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
4
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
5
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
6
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
7
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
8
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
9
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
10
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
11
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
12
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
13
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
14
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
15
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
16
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
17
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
18
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
19
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
20
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई

नववर्षाच्या संकल्पाचे झाले काय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2021 13:23 IST

- मिलिंद कुलकर्णी वर्ष मावळत असताना नवीन वर्षाचे वेध लागतात. हे वेध लागत असताना मावळत्या वर्षातील घडामोडींचा मागोवा घेतला ...

- मिलिंद कुलकर्णी

वर्ष मावळत असताना नवीन वर्षाचे वेध लागतात. हे वेध लागत असताना मावळत्या वर्षातील घडामोडींचा मागोवा घेतला जातो. काय झाले आणि काय राहून गेले, याचा आढावा घेतला जातो. काही ठरवूनदेखील शक्य झाले नसेल, ते नव्या वर्षात पहिल्या दिवसापासून करायचे असे मनोमन ठरविले जाते. हे ठरवले जाते, यालाच संकल्प म्हटले जाते. नव्या वर्षाचा असा संकल्प प्रत्येक जण करीत असतो, पण ‘नव्याचे नऊ दिवस’ या नियमानुसार आठवडाभरात नव्या वर्षाचा संकल्प मागे पडतो, विसरला जातो आणि ‘ये रे माझ्या मागल्या’ प्रमाणे गेल्या वर्षीसारखे आपण बेबंदपणे जगू लागतो. आपल्यासारख्या सर्वसामान्य माणसाची ही कथा आणि व्यथा आहे.

इंग्लंडमध्ये कोरोनाचे नवे रुप आढळून आल्यानंतर राज्य शासनाने संपूर्ण राज्यात रात्रीची संचारबंदी जाहीर केली. रात्री ११ वाजेपासून सकाळी ६ वाजेपर्यंत या संचारबंदीचा अंमल राहणार आहे. हा निर्णय तर नवा संकल्प केलेल्या नागरिकांच्या पथ्यावर पडला. समाज माध्यमावर एक मार्मिक संदेश या मंडळींकडून फिरवला गेला. तो असा होता, उद्यापासून चांगलं ठरवलं होतं पहाटे ४ वाजता चालायला जायचे...आणि नेमकी रात्रीची संचारबंदी लागू झाली...आता पाच जानेवारीपर्यंत वाट पहावी लागणार...१ जानेवारी म्हणजे नवीन वर्षाचा उपक्रम गेला, म्हणजे एकंदर २०२१ पण व्यायाम केल्याशिवाय जाणार बहुतेक...अवघड आहे...नकटीच्या लग्नाला सतराशे विघ्न असे म्हणतात, तसे आरंभशूर मंडळींचे होत असते. काही तरी बहाणा करुन संकल्प पुढे ढकलायचा प्रयत्न केला जातो, त्याचे हे मासलेवाईक उदाहरण आहे.

कोरोनाच्या जागतिक महासाथीमुळे आपल्याला आरोग्याचे महत्त्व कळले. प्रतिकारशक्ती मजबूत असणे किती आवश्यक आहे, हे ध्यानात आले. असे असताना दैनंदिन व्यायामाचा संकल्प सगळ्यांनी करणे आवश्यक होते, पण दुर्देवाने तसे होताना दिसत नाही. दूरचित्रवाणी, समाजमाध्यमे यामुळे रात्री उशिरापर्यंत जागरण केले जाते, आणि स्वाभाविकपणे सकाळी लवकर उठण्याचा कंटाळा केला जातो. ‘लवकर निजे, लवकर उठे’ ही शिकवण आपल्याला कालबाह्य, जुनाट वाटते. पण त्याचे महत्त्व अबाधित आहे, हे विसरुन चालणार नाही.संकल्प करुन ते सिध्दीस नेणारेदेखील अनेक जण आहे. भले, त्यांचे प्रमाण कमी असेल. पण त्यांची चिकाटी, सातत्य वाखाणण्याजोगे आहे. रनर्स ग्रुप, सायकलिस्ट ग्रुप, योग वर्ग, बॅडमिंटन, जीम या वेगवेगळ्या माध्यमातून नियमितपणे व्यायाम करणाऱ्या धडपड्या लोकांचे कौतुक करायला हवे. कोणताही ऋतू असला तरी त्यांच्या दैनंदिनीत खंड पडत नाही. आळसाला ते अजिबात जवळ फिरकू देत नाही. त्यांच्या या निश्चयामुळे केवळ आरोग्यासाठी लाभ होतो, असे नाही, त्यांच्या व्यक्तिमत्वाला एक शिस्त लागते. घरी, कार्यालय वा व्यवसायातदेखील ते त्याच निश्चयाने, दृढतेने काम करताना दिसतात.त्याचा परिणाम व्यवसायवृध्दीत होते.

काहींना दैनंदिनी लिहायची सवय असते. त्यामाध्यमातून आपले रोजचे जगणे ते शब्दबध्द करतात. स्वत:च्या वागण्याचे, स्वभावाचे रोज आत्मपरीक्षण, विश्लेषण करतात. अकारण वाद, चुका, संताप टाळण्यासाठी प्रयत्नपूर्वक पावले उचलतात. स्वनियंत्रणासाठी प्रयत्नरत राहतात. भवतालाकडे त्रयस्थपणे पाहतात. घटना, व्यक्ती व प्रसंगाविषयी तारतम्य भावाने विचार करु लागतात. हेदेखील व्यक्तिमत्व विकासाच्यादृष्टीने चांगले पाऊल आहे. काही जण रोज किमान एक पान वाचल्याशिवाय झोपायचे नाही, असा निश्चय करतात. तो बराचसा यशस्वी करतात. समाजमाध्यमांवरील वाचन वाढले तरी पुस्तके, मासिके, वर्तमानपत्र वाचनाचा अवधी कमी होत चालला आहे. समाजमाध्यमांवरील मजकुराच्या विश्वासार्हतेविषयी संशयाचे वातावरण असताना सिध्द झालेली पुस्तके न वाचले ही आत्मवंचना ठरणार आहे. ज्ञान, माहिती या बाबत आपण परिपूर्ण नसू तर स्वत:ची मते बनविण्याविषयी आपण साशंक राहतो. झुंडीतील एक घटक बनून होकाराला हो देण्यात धन्यता मानतो. विवेकाने प्रत्येक गोष्टीकडे बघणे, चिकित्सा करणे, प्रश्न विचारणे हा प्रत्येक नागरिकाचा स्थायीभाव आहे. त्याचा विसर पडता कामा नये. म्हणून नवीन वर्षासाठी संकल्प ठरविणे, त्याचे पालन करणे आणि संकल्पातून सिध्दी मिळविण्याचा आनंद घेणे हा वेगळाच अनुभव आहे. 

टॅग्स :New Yearनववर्षJalgaonजळगाव