शशी थरूर, ज्येष्ठ काँग्रेस नेते, खासदार -
जवळजवळ वर्षभराच्या खंडानंतर, दुबईच्या दोन फेऱ्या नुकत्याच झाल्या. त्या अनुभवाने मी अगदी भारावून गेलो आहे. ‘आकांक्षापुढती जिथे गगन ठेंगणे’ हाच या शहराचा मूलमंत्र आहे. एकेकाळी सर्वदूर वाळूच वाळू पसरलेल्या या प्रदेशाची नभोरेखा आता त्याच्या महत्त्वाकांक्षेनुसार घडत असते. केवळ मनोराज्यच मानले गेले असते असे नावीन्यपूर्ण स्वप्न पोलादी आणि बिलोरी रूप धारण करून, गगनचुंबी इमारतींच्या स्वरूपात या शहरात दिमाखाने साकार झाले आहे. दुबईच्या या कायापालटामागे केवळ महत्त्वाकांक्षा नसून ती प्रदीप्त राखणाऱ्या कार्यप्रणाली, पारदर्शक नियमावली, सुनिश्चित धोरणात्मक आराखडे, दूरदृष्टी ठेवून सुसंगतरीत्या चालणाऱ्या संस्था यांचा तिला भक्कम आधार आहे. धोरणे, व्यावसायिकता आणि सज्जता हातात हात घालून चालतात तेव्हा एखादे शहर केवळ वेगवान घडामोडींचे केंद्र राहत नाही. साऱ्या जगासाठी ते आत्मविश्वासाचा आदर्श ठरते. या शहराच्या प्रगतीतून हेच दिसून येते.
‘भारत-मध्यपूर्व-युरोप आर्थिक कॉरिडॉर’ यासारख्या महत्त्वाकांक्षी योजना मथळे सजवत असतात; परंतु त्याहूनही अधिक शक्तिशाली आणि गतिमान अशी एक संपर्कवाहिनी भारत आणि यूएई यांच्यादरम्यान यापूर्वीच धडधडू लागलेली आहे. व्यवसाय, माणसे आणि नवकल्पना यांच्या वाढत्या आदान-प्रदानातून एक गजबजलेला दिल्ली-दुबई मार्ग नैसर्गिकपणे तयार झाला आहे. आज दुबईत, जगातील उत्तमोत्तम रोमांचकारी भू-आर्थिक स्थळे, व्यापार, रणनीती आणि सांस्कृतिक देवाण-घेवाण यांची गुंफण झालेली दिसते. या साऱ्यांतून संधीची नवनवी दालने भारतासाठी उघडत आहेत.
भारत आणि यूएई यांच्यादरम्यानच्या द्विपक्षीय व्यापाराने २०२४-२५ या वर्षात १०० अब्ज डॉलर्सचा आकडा पार केला. २०२२ मध्ये केलेल्या व्यापक आर्थिक भागीदारी करारामुळे विविध क्षेत्रांतील आयात शुल्क रद्द होऊन व्यापार सुकर झाला. आता व्यापार क्षेत्रात यूएई हा आपला तिसरा सर्वांत मोठा भागीदार बनला आहे. दुसरीकडे भारत यूएईचा व्यापारातील दुसरा सर्वांत मोठा भागीदार बनला आहे. २०३० पर्यंत तेल आणि अ-मौल्यवान धातू यामधील व्यापार १०० अब्जांवर नेण्याचे पूर्वीचे महत्त्वाकांक्षी उद्दिष्ट आता आणखी अलीकडे म्हणजे २०२८ वर आणले गेले आहे.
भौगोलिकदृष्ट्या मध्यवर्ती असल्याने कापड आणि कृषी उत्पादनांपासून ते जडजवाहिर आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानापर्यंत सर्व प्रकारच्या भारतीय निर्यातीसाठी दुबई एक आदर्श केंद्र बनले आहे. या मोक्याच्या स्थानावरून, आंतरराष्ट्रीय पुरवठा साखळीशी स्वतःला सहज जोडून घेत, भारतीय उद्योग दुबईच्या वैश्विक व्यापारी प्रभावाचा फायदा उचलू शकतात. सर्व जगाशी दुबईचा थेट संपर्क आहे.
२०२४ च्या पहिल्या तिमाहीत, भारत हाच दुबईत येणाऱ्या थेट परकीय गुंतवणुकीचा अग्रणी स्त्रोत ठरला आहे. ३.०५ अब्ज डॉलर्स इतकी प्रचंड रक्कम भारताने तेथे गुंतवली असून एमिरेट्मध्ये येणाऱ्या एकंदर गुंतवणुकीत २१.५% वाटा एकट्या भारताचा आहे. केवळ वर्षभरात झालेल्या या वाढीमुळे, भारताने याबाबत पाचव्या क्रमांकावरून थेट पहिल्या क्रमांकावर झेप घेतली आहे. जागतिक होऊ पाहणाऱ्या भारतीय नवउद्योजकांसाठी दुबई ही उड्डाणभूमी ठरत आहे.
दुबईचे महत्त्व इथेच संपत नाही. कळीच्या मुद्द्यांवर भारत आणि यूएई अधिकाधिक मिळतीजुळती भूमिका घेत आहेत. महत्त्वाच्या सागरी मार्गांची सुरक्षितता, दहशतवादविरोधी कृती आणि भारत, इस्राईल, यूएई आणि यूएस यांना एकत्र आणणाऱ्या I2U2 सारख्या प्रादेशिक चौकटीची घडण यावर आपली दोन्ही राष्ट्रे सहकार्य करत आहेत. ऊर्जा आणि अन्नसुरक्षेपासून वित्तीय तंत्रज्ञान, मालवाहतूक व्यवस्थापन आणि डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधांपर्यंत भारताचे दुबईबरोबरचे नाते विस्तारले आहे. अस्थिरतेत टिकून राहण्याची लवचिकता हे या भागीदारीचे सामर्थ्य. यूएईमध्ये ३५ लाखांहून अधिक भारतीय राहत असल्याने हे नाते व्यक्तिगत जिव्हाळ्याचे आणि कौटुंबिक बनले आहे. वर्षाला जवळपास सव्वाकोटी प्रवासी ये-जा करणाऱ्या जगातील सर्वांत गजबजलेल्या दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर सर्वाधिक प्रवासी भारतातूनच येतात.
उभय देशांच्या दृष्टीने भावी सहकार्याच्या अमर्याद शक्यता दिसतात. हरितऊर्जा, अवकाश संशोधन, आणि डिजिटल नवोपक्रम या क्षेत्रांत सहनिर्मिती करत भारत आणि यूएई जागतिक समस्यांच्या निराकरणासाठी उपाययोजना करू शकतील. भारताचे महत्त्वाकांक्षी ऊर्जा-संक्रमण उद्दिष्ट लक्षात घेता, या दोन्ही देशांना परस्पर सहकार्याने जागतिक ऊर्जा बदलाचा आधारस्तंभ ठरण्याची अजोड संधी आहे.
भविष्य काय असू शकेल, असले पाहिजे; हे अनुभवायचे आहे?- दुबईचे तिकीट खरेदी करणेच त्यासाठी पुरेसे आहे!
Web Summary : Dubai's transformation, fueled by ambition and strategic policies, makes it a global hub. Enhanced India-UAE ties boost trade, investment, and collaboration across sectors, offering India unprecedented opportunities. It's a future-forward partnership.
Web Summary : दुबई का परिवर्तन, महत्वाकांक्षा और रणनीतिक नीतियों से प्रेरित, इसे एक वैश्विक केंद्र बनाता है। भारत-यूएई संबंधों में वृद्धि से व्यापार, निवेश और सहयोग को बढ़ावा मिलता है, जिससे भारत को अभूतपूर्व अवसर मिलते हैं। यह भविष्य की ओर एक साझेदारी है।