मूल्यशिक्षण

By Admin | Updated: June 22, 2015 23:25 IST2015-06-22T23:25:23+5:302015-06-22T23:25:23+5:30

शिक्षणाच्या विविध व्याख्या होऊ शकतात. मनाची मशागत करणारी प्रक्रिया अशीही एक व्याख्या करता येऊ शकते. विनोबाजींनी जीवन आणि शिक्षण

Value Education | मूल्यशिक्षण

मूल्यशिक्षण

डॉ. दिलीप धोंडगे

शिक्षणाच्या विविध व्याख्या होऊ शकतात. मनाची मशागत करणारी प्रक्रिया अशीही एक व्याख्या करता येऊ शकते. विनोबाजींनी जीवन आणि शिक्षण यांच्या फारकतीबद्दल चिंता व्यक्त करताना शिक्षण देताना जीवनाचा संदर्भ वगळला जातो व जीवन जगताना शिक्षणाला काहीही स्थान उरत नाही असे चिंतन प्रस्तुत केले आहे.
स्पर्धेत यशस्वी होण्यासाठी अनेक घटकांची उपस्थिती आवश्यक असते. सगळ्यांच्याच वाट्याला सर्वच घटकांची अनुकूलता असते, असे नव्हे. ज्यांच्या वाट्याला अत्यल्प घटकांची उपस्थिती लाभते अशा व्यक्ती निराश होतात, विफल होतात व नको हे जगणे असा विचार करून आपल्या जगण्याला अनैसर्गिकपणे पूर्णविराम देतात. स्पर्धेचे आपण समजू शकतो. पण स्पर्धेला काही विकृत परिमाणे लाभतात, तेव्हा भयावह परिस्थिती निर्माण होते. या स्पर्धेला सामाजिक संदर्भात स्तरीय संदर्भ प्राप्त झाले की त्यांची विभागणी श्रेष्ठ-कनिष्ठ अशी होती. मानापमानाच्या कल्पनाही मग यावरच अवलंबून राहतात. मानाच्या प्रसंगांनी खूप संतुष्ट होणे व अपमानाच्या प्रसंगांनी अतोनात दु:खी-कष्टी होणे असे घडते. अनेक मानाचे प्रसंग अनुभवूनही अपमानाच्या प्रसंगाने एकदम खचून जाणे घडते. असे घडणे हे मनोकायिक स्वास्थ्याला बाधत ठरते. यासाठी सुकाणूरूप असलेल्या मनाची मशागत करावी लागते. ही मशागत होण्यासाठी जगण्यातल्या अनुभवांच्या आधारावरचा अभ्यासक्रम उपयुक्त ठरतो. अशा अभ्यासक्रमासाठी आपल्या श्रेष्ठ ग्रंथांमध्ये अनेक सूत्रे मिळतात. आपल्या या प्रस्तुत विवेचनाच्या संदर्भात श्रीमद्भगवद्गीतेच्या बाराव्या अध्यायातील १९व्या श्लोकाचा विचार करता येईल. श्लोक असा आहे :
तुल्यनिन्दास्तुतिर्मौनी संतुष्टो येनकेनचित् । अनिकेत: स्थिरमतिर्भक्तिमान् मे प्रियो नर: ।।
निंदा आणि स्तुती समान मानणे, मौनी (मौन बाळगणारा), जे काही मिळेल त्यामध्ये संतुष्ट राहणारा; याचा अर्थ आपली क्षमता जाणणारा व क्षमतेपेक्षा अधिक मिळावे अशी अपेक्षा न ठेवणारा, कोठेच आश्रय न धरणारा; याचा अर्थ आपल्या जगण्याची आपणच कुवत वाढवणारा स्वावलंबी असा, स्थिरबुद्धीचा असा मनुष्य, जो श्रेष्ठच गणला जातो व त्याच्या अंगभूत श्रेष्ठतेमुळे तो परमेश्वरालाही प्रिय असतो. स्थिरबुद्धी या घटकाचाही थोडा ऊहापोह करायला हवा. स्थिरबुद्धी ही निश्चयात्मक बुद्धी असते. निश्चयाचे बळ हेच स्वयमेव फळ असते असे तुकोबांनी सांगून ठेवलेले आहे. मनाच्या मशागतीसाठी जीवनसंबद्ध, अनुभवसंबद्ध घटकांचे शिक्षण द्यायला हवे. याला मूल्यशिक्षण म्हणता येईल.

Web Title: Value Education

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.