उद्धवराव पाटील : एका युगाचा नि:स्पृह नायक

By Admin | Updated: January 30, 2015 03:19 IST2015-01-30T03:19:09+5:302015-01-30T03:19:09+5:30

काँग्रेस अंतर्गत एक उपपक्ष म्हणून आळंदी येथील बैठकीत ३ आॅगस्ट १९४७ मध्ये शेतकरी कामगार पक्षाची स्थापना झाली. २६ एप्रिल १९४८ला हा पक्ष काँग्रेसपासून रीतसर वेगळा झाला.

Uddhavrao Patil: The Uncle's hero of an era | उद्धवराव पाटील : एका युगाचा नि:स्पृह नायक

उद्धवराव पाटील : एका युगाचा नि:स्पृह नायक

 प्रा. डॉ. भास्कर कापसे
(ज्ञानोपासक महाविद्यालय, जिंतूर, जि. परभणी.)

काँग्रेस अंतर्गत एक उपपक्ष म्हणून आळंदी येथील बैठकीत ३ आॅगस्ट १९४७ मध्ये शेतकरी कामगार पक्षाची स्थापना झाली. २६ एप्रिल १९४८ला हा पक्ष काँग्रेसपासून रीतसर वेगळा झाला. पक्ष म्हणवण्याइतपत यश १९५२च्या विधानसभा निवडणुकीत या पक्षाला मिळाले. पक्षाचे मुख्य प्रवर्तक शंकरराव मोरे, केशवराव जेधे, भाऊसाहेब राऊत, तुळशीदास जाधव या दिग्गज नेत्यांचा समावेश होता. १९५७च्या निवडणुकीत या पक्षाचे प्राबल्य कमी झाले तरी उत्तम वक्ते, अभ्यासू नेते, उत्तम संसदपटू या पक्षाला लाभले होते. अशाच मातब्बर नेत्यांपैकी एक महत्त्वाचा नेता म्हणजे भाई उद्धवरावजी पाटील हे होते, हे ऐतिहासिक सत्य आहे.
उद्धवरावांचा जन्म मराठवाड्यासारख्या मागासलेल्या परंडा परगण्यातील दुष्काळी इर्ले या गावी सामान्य शेतकरी कुटुंबात झाला. उद्धवराव शेतकरी कुटुंबात जन्मले, शेतकऱ्यांच्या दु:खासोबत वाढले, जगले आणि शेवटपर्यंत शेतकऱ्यांसाठी लढणारा झुंजार सेनानी ठरले. खरे तर महाराष्ट्रातील एका युगाचा हा नि:स्पृह नायक होता. उद्धवरावांचे प्राथमिक शिक्षण आपले मेव्हणे नरसिंगराव देशमुख काटीकर यांच्याकडे काटी या गावी झाले. तुळजापूरच्या हरिश्चंद्रराव भोसले गुरुजींच्या आग्रहाने त्यांचे शिक्षण सुरू झाले. तुळजापूरच्या भोसले कुुटुंबात महाराष्ट्रातील डाव्या चळवळीचा राबता होता. त्यांच्याच संस्कारात उद्धवरावांचे बालपण खुलले, वृद्धिंगत झाले. महाविद्यालयीन शिक्षणासाठी हैदराबादच्या उस्मानिया विद्यापीठात गणितासारखा विषय घेऊन हा तर्ककठोर तत्त्ववेत्ता घडल्याचे दिसून येते. उस्मानिया विद्यापीठाची एलएल.बी. पदवी धारण करून शेतकऱ्यांची वकिली त्यांनी सुरू केली.
यशवंतराव चव्हाणांसारखा धुरंधर, मुत्सद्दी, दूरदर्शी काँग्रेस नेतृत्वालाही आदर वाटावा, अशी सचोटी उद्धवरावांनी आयुष्यभर सांभाळली. एक समर्पित, निगर्वी, नि:स्पृह, परखड, तत्त्वचिंतक नेता म्हणून उद्धवराव महाराष्ट्राला परिचित आहेत. तत्त्वनिष्ठ राजकारणाला तिलांजली मिळालेल्या आजच्या काळात उद्धवरावांचे चरित्र निश्चितपणे दिशादर्शक वाटते.
शेतमालाला उत्पादन खर्चावर आधारित भाव मिळायचा असेल तर घाऊक बाजारपेठेचे राष्ट्रीयीकरण झाले पाहिजे. आंतरराष्ट्रीय व्यापारात शेती व्यवस्थेचे संरक्षण केले पाहिजे. असा विचार उद्धवरावांनी मांडला. सहकारी चळवळीतील अपप्रवृत्तींची त्यांना जाणीव होती. म्हणूनच सहकारी चळवळीपासून अलिप्त राहण्याचे धोरण त्यांनी जाणीवपूर्वक स्वीकारले होते. त्यांनी आमदार, खासदार म्हणून जी कामगिरी बजावली त्यात मुख्य हेतू शेतकरी हाच होता.
व्यवस्था परिवर्तनाशिवाय शेतकऱ्यांना आपण न्याय देऊ शकत नाही, अशी त्यांची धारणा होती. म्हणून शरद जोशींच्या शेतकरी संघटनेचे त्यांना कौतुक होते; पण विश्वास नव्हता. विधानसभा, लोकसभा, पंचायत राज संस्था ही आयुधे म्हणून वापरली जावीत. परंतु अंतिमत: लोकशाही समाजवादी समाजरचनाच शोषितांच्या हिताची असणार अशी ठाम मांडणी शेवटपर्यंत उद्धवराव पाटील करत राहिले. महाराष्ट्राच्या राजकारणात साधी राहणी आणि उच्च विचारसरणी ही भूमिका उद्धवरावांनी तथाकथित गांधीवाद्यांपेक्षाही अधिक सरसपणे अंगीकारली होती. खासदार असताना त्यांचा साधेपणा एका पिढीने अनुभवला आहे. महाराष्ट्रभर उद्धवराव एस.टी.ने प्रवास करायचे. आपल्या मतदारसंघाच्या संपर्कासाठी एस.टी., बैलगाडी यांचा वापर सर्रास ते करत असत. कार्यकर्त्यांना रात्री-अपरात्रीसुद्धा भेटणे हा उद्धवरावांचा नित्याचा भाग होता. स्वत:च्या प्रकृतीची चिंता त्यांनी वाहिली नाही. राजकारणातील साधेपणाची, प्रामाणिकतेची, नि:स्पृहतेची एक मूल्यव्यवस्था निर्माण करण्याचे कार्य उद्धवरावांनी केले. विधानसभेत उद्धवरावांचा सक्रिय सहभाग अवघ्या महाराष्ट्राने अनुभवला आहे. विधानसभेत ते बोलायला उभे राहिले तर बाहेर निघालेले मुख्यमंत्री आपल्या जागेवर बसत आणि अत्यंत नम्रपणे त्यांचे मुद्देसूद भाषण ऐकत असत. आणीबाणी आणि दुष्काळ या दोन प्रसंगांत त्यांच्या नेतृत्वाचा झंझावात आपण अनुभवला आहे. शरद पवारांच्या भाषेत सांगायचे तर एखाद्या माणसाला बोराटीच्या फांदीने झोडपल्यावर जशा वेदना होतात तशा वेदना उद्धवरावांच्या भाषणाने सरकारी पक्षाला व्हायच्या. साधेपणामुळे स्वार्थ, सत्ता, पैसा यांचा मोह त्यांना आयुष्यभर शिवला नाही हे त्यांचे वेगळेपण पक्ष म्हणून शेतकरी कामगार पक्षाला पुढे टिकवता आले नाही. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणाची आज शोकांतिका पहावी लागत आहे. अस्मितांचे, सांप्रदायिकतेचे, जातीयवादाचे राजकारण नंतरच्या काळात वाढले. त्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे उद्धवरावांसारख्या राजकारण्यांचा विचार, आचार महाराष्ट्राला पचवता आला नाही. म्हणूनच उद्धवरावांच्या कार्यकर्तृत्वाची आज प्रकर्षाने आठवण होते.

Web Title: Uddhavrao Patil: The Uncle's hero of an era

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.