ब्रह्मपुरीचे तुरूक

By Admin | Updated: June 6, 2014 08:52 IST2014-06-06T08:52:58+5:302014-06-06T08:52:58+5:30

महाराष्ट्रातील मुसलमान संतांनी चौदाव्या-पंधराव्या शतकापासून सर्वधर्मीयांमध्ये व पंथीयांमध्ये एकात्मता प्रस्थापित करण्याचा जो प्रयत्न केला, तो अत्यंत लक्षणीय आहे

The trunk of Brahmapuri | ब्रह्मपुरीचे तुरूक

ब्रह्मपुरीचे तुरूक


अध्यात्म
डॉ. यू. म. पठाण

आम्ही ब्रह्मपुरीचे तुरूक।
द्वैत मिळोनि जालो एक।।१।।
अहं-टोणगा भक्षिला।
निज प्रेमाचा प्यालों प्याला।।२।।
सांडवलों आचारविचारा।
कोणी ‘भले’ म्हणा ‘बुरा’।।३।।
कोणी आम्हांसी बाटले।
बाटुनि मूळ ठायां गेले।।४।।
शेख महंमदीं वाटले।
यातीवेगळें घातले।।५।।
महाराष्ट्रातील मुसलमान संतांनी चौदाव्या-पंधराव्या शतकापासून सर्वधर्मीयांमध्ये व पंथीयांमध्ये एकात्मता प्रस्थापित करण्याचा जो प्रयत्न केला, तो अत्यंत लक्षणीय आहे. अशा संतांपैकी शेख महंमद हे एक प्रमुख संत होत. त्यांनी इस्लाम व हिंदू धर्मांच्या तत्त्वज्ञानातील साम्यस्थळांवर प्रकाश टाकून दोन्ही धर्मीयांमध्ये ऐक्य प्रस्थापित केले. स्वत: शेख महंमद हे सुफींच्या काद्री शाखेचे संत असूनही वारकरी संप्रदायाशीही इतके एकरूप झाले, की पुढे वारकरी संत म्हणूनही ख्यातनाम झाले.
त्यांच्या या अभंगात त्यांनी स्वत:ला ‘ब्रह्मपुरीचे तुरूक’ म्हटले आहे. आम्ही हिंदू व इस्लाम धर्मीयांनी दोन्ही धर्मांतील वेगळेपण (‘द्वैत’) नाहीसे केले. एकमेकांनी अहंभावाचा त्याग करून परस्परांच्या धर्मांचा आदर केला व ‘प्रेमाचा प्याला
प्यालो’- म्हणजे स्नेहभावना वृद्धिंगत केली. एकमेकांच्या आचारविचारांचे आदानप्रदान
केले. त्यामुळे समाजातील काही सनातनी
प्रवृत्तींच्या लोकांनी आम्ही बाटलो, म्हणून
आमच्यावर टीका केली व आमच्याविषयी
अपप्रचार केला; पण आम्हाला त्याचे
काहीही सोयरसुतक वाटले नाही. कुणी
आम्हाला ‘भले’ म्हणो वा ‘बुरे’ म्हणो,
त्याची आम्हाला चिंता नाही, कारण आमचा
मार्ग हा खर्‍या धर्माचा, मानवतेचा नि बंधुभावाचा मार्ग होता. त्यावर आमची अढळ निष्ठा होती. त्यामुळे आम्ही परस्परांच्या कल्याणाची चिंता वाहिली व समाज दुभंगू दिला नाही. खरा धर्म कोणताही भेदभाव मानीत नाही.
D

Web Title: The trunk of Brahmapuri

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.