शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
2
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
3
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
4
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
5
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
6
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
7
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
8
Duleep Trophy Final : रजतसह यशनं साधला सेंच्युरीचा डाव! फायनलमध्ये 'सुवर्ण'च्या दिशेनं वाटचाल
9
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
10
Travel : दुबई फिरायला जाताय? चुकूनही करू नका 'या' गोष्टी; खावी लागले तुरुंगाची हवा!
11
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
12
गर्भवती होताच कोरियन सरकारने दिला भरभरून पैसा; मूळ भारतीय महिलेने हिशोबच सांगितला
13
मुंबई, पुणेच नाही...! छोट्या शहरांतही विवाहबाह्य संबंध वाढू लागले, ही पाच कारणे हादरवून टाकतील...
14
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
15
BEL-बजाज फायनान्ससह 'या' शेअर्समध्ये तेजी! पण, टाटांच्या कंपनीचा स्टॉक आपटला, कुठे किती वाढ?
16
Pitru Paksha 2025: घरात पितरांचे फोटो आहेत, पण दिशा चुकीची असेल तर कसा जाईल वास्तुदोष?
17
मोठी बातमी! 'ती' खुर्ची कुणासाठी राखीव? राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या...
18
सिंह दरबार जाळून टाकला, आता कुठे बसणार नेपाळच्या नव्या पंतप्रधान? Gen-Z शोधताहेत नवी जागा!
19
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
20
२४-२२ कॅरेट सोडा, १८ कॅरेट सोन्याला सर्वाधिक मागणी! दागिन्यांसाठी सर्वोत्तम का मानले जाते?

आजचा अग्रलेख: कोट्यवधी रुपयांच्या शिष्यवृत्ती घोटाळ्याची व्यापकता

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2023 10:46 IST

scholarship scam: दहा वर्षांपूर्वी घडलेल्या कोट्यवधी रुपयांच्या शिष्यवृत्ती घोटाळ्याची आठवण एका नवीन घटनाक्रमाने आली आहे. सामाजिक न्याय विभागाच्या दोन-चार नव्हे तर अडीचशे अधिकाऱ्यांना या प्रकरणात समाज कल्याण आयुक्तांनी कारणे दाखवा नोटिसा बजावल्या आहेत.

दहा वर्षांपूर्वी घडलेल्या कोट्यवधी रुपयांच्या शिष्यवृत्ती घोटाळ्याची आठवण एका नवीन घटनाक्रमाने आली आहे. सामाजिक न्याय विभागाच्या दोन-चार नव्हे तर अडीचशे अधिकाऱ्यांना या प्रकरणात समाज कल्याण आयुक्तांनी कारणे दाखवा नोटिसा बजावल्या आहेत. डॉ. के. वेंकटेशम या वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्याच्या अध्यक्षतेखालील आणि दोन आयएएस अधिकारी सदस्य असलेल्या विशेष चौकशी पथकाने (एसआयटी) ५६३ पानांचा अहवाल देऊन या घोटाळ्यावर लख्ख प्रकाश टाकला होता आणि मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती वाटपाची काळी बाजू समोर आणली होती. ओबीसी, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि व्हीजेएनटी या मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीचे हे प्रकरण होते. शिष्यवृत्तीची रक्कम त्यावेळी थेट शिक्षण संस्थांच्या बँक खात्यात जमा व्हायची. त्याचा फायदा घेत अनेक संस्थांनी बोगस विद्यार्थी दाखवून मोठमोठ्या रकमा गिळंकृत केल्या. वर्षानुवर्षे हे गैरव्यवहार सुरू राहिले. अनेक शिक्षणसम्राट हे वेगवेगळ्या राजकीय पक्षांचे पुढारी, लोकप्रतिनिधी आहेत. राजकारणाशी संबंधित असलेल्या आणि नसलेल्या संस्था, आदिवासी विकास खाते, सामाजिक न्याय खात्यातील अधिकारी यांच्या ‘अर्थपूर्ण’ संबंधांचे अनौरस अपत्य म्हणजे असे घोटाळे. २००९-१० ते २०१५-१६ या कालावधीतील या लुटीचे धागेदोरे मंत्रालयापर्यंत होते.

सक्त वसुली संचालनालयाने (ईडी) या घोटाळ्यात उडी घेत राज्यातील जवळपास साडेतीन हजार शैक्षणिक संस्थांकडे शिष्यवृत्तीची बँक खाती आणि लाभार्थी विद्यार्थ्यांबाबतचा तपशील नोटिसीद्वारे मागितला होता. यातील निम्म्याहून अधिक संस्थांनी ईडीला कोणतीही माहिती पुरवली नाही. मात्र कोणत्याही शैक्षणिक संस्थेवर कारवाई केली गेली नाही. ज्यांनी तपशील दिला तो सत्य होता की असत्य, याचीदेखील शहानिशा झाली नाही. फक्त नोटीस बजावण्यापुरती ईडीची भूमिका मर्यादित का राहिली, हा प्रश्नच आहे. त्या-त्या वेळी सत्तापक्षात असलेल्या वा सत्तापक्षाशी संबंधित शिक्षणसम्राटांनी चौकशी आणि कारवाईत अनेकदा अनेक प्रकारे अडथळे आणण्याचा प्रयत्न केला. बरेच शिक्षणसम्राट त्यावेळी फारच हवालदिल झाले होते आणि ‘आपण कसे निष्कलंक आहोत’ हे सांगण्याची धडपड करत होते. मात्र एसआयटी चौकशीने त्यांचा बुरखा टराटरा फाडला. ‘शिक्षण संस्थांना शिष्यवृत्तीची १८८२ कोटी रुपयांची जादाची रक्कम अदा केली गेली; ती वसूल करावी’, अशी स्पष्ट शिफारस एसआयटीने केली. मात्र, आतापर्यंत त्यातील ११७ कोटी ८५ लाख रुपयेच विविध शिक्षण संस्थांकडून वसूल करण्यात आले आहेत. सामाजिक न्याय विभागाने मात्र, एसआयटीने शिष्यवृत्तीबाबत केंद्र व राज्य सरकारचे वेळोवेळचे निर्णय आणि निकष यांची गल्लत केली, असा तर्क देत वसुलीयोग्य रक्कम १८८२ कोटी रुपये नव्हे, तर १७८ कोटी रुपयेच असल्याची भूमिका घेतली आणि आता उर्वरित ६० कोटींच्या वसुलीसाठी कार्यवाही सुरू केली आहे.

एकदा एसआयटीने अहवाल दिल्यानंतर त्या आधारे कारवाई करण्याऐवजी त्याला फाटे फोडण्याचे काम झारीतील शुक्राचार्यांनी केले.  घोटाळे झालेच नाहीत, असे सरकारला वाटले असते तर कारवाईऐवजी सरकार स्वत:च न्यायालयात गेले असते, पण सरकारने वसुली करत घोटाळ्याची एकप्रकारे पुष्टीच केली. अनुसूचित जातींच्या मुलांना शिष्यवृत्ती दिलेल्या शिक्षण संस्थांपैकी केवळ १३ टक्के आणि अनुसूचित जमातींच्या मुलांना शिष्यवृत्ती दिलेल्या केवळ १५ टक्के शिक्षण संस्थांची कागदपत्रे तपासून एसआयटीने १८८२ कोटी रुपयांच्या वसुलीची शिफारस केलेली होती. १०० टक्के संस्थांची तपासणी केली असती तर राज्याला हादरवून टाकणारा घोटाळा समोर आला असता; पण तिथेही शिक्षणसम्राटांचा बचाव काही दृष्य-अदृष्य शक्तींनी केला. रकमेच्या वसुलीसोबतच शिष्यवृत्ती वाटपातील सर्व शिक्षणसंस्थांचे लेखापरीक्षण करा, लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत आणि सीआयडीमार्फत या घोटाळ्याची चौकशी करा, केवळ कागदोपत्री असलेल्या शिक्षण संस्थांवर गुन्हे दाखल करा, अशा शिफारशी एसआयटीने केलेल्या होत्या; पण त्यावर आजपर्यंत अंमल झाला नाही. ना कोणाला अटक झाली, ना कोणावर गुन्हा दाखल झाला. स्टुडंट्स हेल्पिंग हँड या एनजीओने शेवटी गेल्यावर्षी उच्च न्यायालयात धाव घेत या शिफारशींची काटेकोर अंमलबजावणी करावी, अशी याचिका दाखल केली आहे. राजकारणी, अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने झालेल्या या घोटाळ्यात व्यापक कारवाईचे सरकारी दरवाजे जवळपास बंद झाले असताना, आता न्यायालयाचा दरवाजा तेवढा शिल्लक आहे.

टॅग्स :Scholarshipशिष्यवृत्तीMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारMantralayaमंत्रालय