पाकिस्तान... दुकाने बंद आणि बाजार सुने!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2022 07:49 AM2022-07-19T07:49:24+5:302022-07-19T07:50:07+5:30

मी एक सामान्य पाकिस्तानी नागरिक आहे. चहाऐवजी गरम पाणी प्यायला, मोटारीऐवजी पायी चालायला तयार आहे, फक्त माझी एक अट मान्य करा!

today situation in pakistan shops closed and the market closed too | पाकिस्तान... दुकाने बंद आणि बाजार सुने!

पाकिस्तान... दुकाने बंद आणि बाजार सुने!

Next

फकीर सय्यद एजाजउद्दीन, कला समीक्षक, ख्यातनाम लेखक, पाकिस्तान

मागच्या रविवारची लाहोरमधली सकाळ. बाजारात फेरफटका मारताना अचानकच माझ्या  लक्षात आले, की सुपर मार्केट, मिनी मार्केट,  बेकऱ्या अशी सगळी दुकाने बंद आहेत. कारण काय?- तर वीज वाचवण्यासाठी सरकारने तसा आदेश दिला होता. औषधांची दुकाने उघडी होती.  

- खरेदीसाठी गेलेला मी रिकाम्या हाताने  घरी परतलो आणि मला स्वतःलाच प्रश्न केला, देशाची ही अवस्था करून ठेवणारा कारभार गेल्या ७५ वर्षांत झाला... त्याला जबाबदार कोणीही असो, पण सामान्य जीवन जगण्यासाठी लागणारी प्रत्येक गोष्ट या देशात  का मिळत नाही? एखाद्या भिकाऱ्यासारखे आपण चीन आणि सौदी अरेबियाच्या दारात का उभे असतो? देशाबाहेर वास्तव्य करून असलेल्या पाकिस्तान्यांकडून येणारा पैसा आणि कर्जावर आपला देश जेमतेम तग धरून आहे हे वास्तव आपण कधी स्वीकारणार? 

आयुब खान यांच्या हरितक्रांतीचे परिणाम आम्ही उपभोगले. झुल्फिकार अली भुत्तो यांचा इस्लामिक समाजवाद  सहन केला. जिया उल हक यांचा इस्लामिक पुनर्जीवनवाद झेलला. लोकशाहीवाद्यांनी देशभक्तीच्या नावाखाली या देशाचा खजिना लुटला. लोकसेवेचा जप करत धनदांडगे फुगत गेले.  अण्वस्त्रक्षमतेचा दाखला आम्ही सुमारे २५ वर्षांपूर्वी दिला. आम्ही जगातली दहावी मोठी सैन्य शक्ती आहोत... तरी हे असे का?

जनरल जाहिद अली अकबर खान यांच्या “जर्नी इन्टू हिस्टरी २०-२१” या पुस्तकात मला उत्तर सापडले. साहेब जालंदरी पठाणांच्या गोतावळ्यातले, स्थलांतरित पाकिस्तानी. सैन्यात त्यांनी दीर्घकाळ सेवा केली. काराकोरम हमरस्त्याचे बांधकाम आणि देशाच्या अणुबॉम्बच्या निर्मितीत त्यांचा मोठा वाटा होता. सैनिकांसाठी घरे, मार्शल लॉ, सियाचीन संघर्ष, कलबाग धरण या संदर्भांतही जनरल साहेबांचे नाव घेतले जाते. देशाचा ऊर्जा प्रश्न सोडवण्याच्या कामातही वरिष्ठ स्तरावरून त्यांची मदत घेतली गेली. १९८७ मध्ये ते लष्कराचे उपप्रमुख झाले असते, परंतु जनरल असलम बेग यांनी मोडता घातला. पाकिस्तानच्या पाणी आणि ऊर्जा विकास प्राधिकरणात त्यांना हलवण्यात आले.  

आडमुठ्या संघटना आणि संस्थात्मक जडतेने प्राधिकरणाला घेरलेले होते. संस्था प्रोत्साहनांना सोकावली होती. या परिस्थितीत जनरल साहेबांनी कारभार हाती घेतला, आणि ऊर्जा वितरणातल्या गळतीचे प्रमाण ३० वरून १७ टक्क्यांवर आणून दाखवले. देयके थकवणाऱ्यांचे मन वळवून त्यांनी पैसे भरायला लावले. ज्यांनी भरले नाहीत त्यांची वीज तोडण्यात आली.

- अर्थातच जनरल साहेबांच्या या धडाकेबाज कामाच्या शैलीमुळे त्यांना शत्रूच जास्त निर्माण झाले. त्यात किमान दोन पंतप्रधान असे होते, की ज्यांनी त्यांना मुदतीपूर्वी काढून टाकण्याचा प्रयत्न केला. प्राधिकरणाच्या नियमानुसार मात्र जनरल साहेबांना संरक्षण होते. जगभरातले कंत्राटदार, पुरवठादार यांनी त्यांना वेळोवेळी कशी लाच देऊ केली याची अनेक उदाहरणे जनरल साहेबांनी आपल्या पुस्तकात लिहिली आहेत. संतमहात्म्यांप्रमाणे आपलाही तपोभंग करण्याचा प्रयत्न झाला, पण आपण त्यांना थोपवले, असा दावा ते करतात.

नंतर मात्र जनरल साहेबांच्या  चेहेऱ्यावरचा हा नि:स्पृहतेचा बुरखा उतरवला गेला. कारण? - भ्रष्ट व्यवहारांचे आरोप! घोषित उत्पन्नापेक्षा त्यांच्याकडे जास्त संपत्ती आहे, असा आरोप एनएबीने केला. पर्ल कॉन्टिनेण्टलच्या शेजारी असलेले १७१, सरवर रोड हे रावळपिंडीचे निवासस्थान जनरल साहेबांनी गैरमार्गाने मिळवले, ही माहिती त्या आरोपामागे असावी.  पूर्वी केव्हातरी आयुब खान यांच्या मंत्रिमंडळात झुल्फिकार अली भुत्तो वाणिज्यमंत्री असताना बॉयलर चिकनची दोन औद्योगिक युनिट्स आणि स्वयंचलित भट्टी यासाठी त्यांनी ४० लाखांचे कर्ज घेतले होते. या कथानकाचा अखेरचा भाग मोठा खास आहे. खानसाहेबांना २०१६ मध्ये पाकिस्तानात परतणे भाग पाडण्यात आले. देशात परतल्यावर  एनएबीशी समझोता करून त्यांनी तब्बल १९.९ कोटींची लाच देऊन प्रकरणावर पडदा पाडून घेतला.

जनरल अकबर यांचे पुस्तक वाचल्यानंतर माझ्या मनात आले, या एकूण पार्श्वभूमीवर माझ्यासारख्या एका स्वाभिमानी, सामान्य नागरिकाला अजूनही निकृष्ट दर्जाचा पाकिस्तानी म्हणून का राहावे लागते? माझ्या खांद्यावर लष्करी गणवेशाची पट्टी नाही म्हणून? जनरल साहेब आणि त्यांच्यासारख्या इतरांना निवृत्तिवेतन मिळावे म्हणून मी भरलेल्या कराचे पैसे सरकार वापरते, पण मी देशासाठी केलेल्या इतक्या वर्षांच्या सेवेच्या बदल्यात मला मात्र सरकारकडून काहीच मिळत नाही, हे कसे? बाकी तर सोडाच, उद्या मी मेल्यावर माझ्या दफनासाठी जागा तरी मिळेल का, याचीही शाश्वती नाही. चहाच्याऐवजी गरम पाणी प्यायला मी तयार आहे. मोटारीऐवजी पायी जावे लागले तरीही चालायची माझी तयारी आहे.. पण मग प्रत्येक सरकारी, प्रत्येक लष्करी अधिकाऱ्यानेही तेच केले पाहिजे. या सगळ्यांना वेगळा न्याय आणि मला वेगळा; असे का? त्यांना भलेभक्कम सशस्त्र सुरक्षा कवच आणि सामान्य नागरिकांना रस्त्यावर फेकलेले, असे का? आमच्यासारख्या सामान्य नागरिकांकडून त्यांच्या जीवाला कसला धोका आलाय?- त्यांचा उद्धट अहंकार हाच तर त्यांचा खरा शत्रू आहे.

Web Title: today situation in pakistan shops closed and the market closed too

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.