शहरं
Join us  
Trending Stories
1
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
2
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
3
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
4
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
5
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
6
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
7
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
8
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
9
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
10
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
11
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
12
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
13
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
14
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
15
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
16
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
17
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर
18
IND vs ENG : आता कसं वाटतंय...! डकेटचा वचपा काढल्यावर आकाशदीपनं त्याच्या खांद्यावर हात टाकला अन्... (VIDEO)
19
"घासीराम कोतवाल'च्या प्रयोगासाठी देशभर...", संजय मिश्रांचं ३० वर्षांनंतर रंगभूमीवर पुनरागमन
20
तिवारी, शुक्ला, थरुर..; मोदी सरकारविरोधात राहुल गांधींना स्वकीयांनीच दिला घरचा आहेर

कष्टावीण रेवडी ज्यांना मिळे! फुकट योजनांमधील खरा धोका सुप्रीम कोर्टानं देशासमोर ठेवला

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2025 07:50 IST

लोकप्रिय योजनांमुळे सरकारी तिजोरीत खडखडाट आहे. महाराष्ट्रातील कंत्राटदारांची जवळपास एक लाख कोटी रुपयांची बिले थकली आहेत.

सगळेच राजकीय पक्ष आणि बुद्धिवादी मंडळी ‘रेवडी संस्कृती’ म्हणून ज्यांना हिणवतात आणि तरीही आपल्या राजकीय पक्षांना त्यातून यश मिळत असेल तर ज्यांचा मोह सुटत नाही अशा फुकटाच्या याेजनांविषयी बुधवारी देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने केलेली टिप्पणी चिंताजनक आहे. दिल्लीतील बेघरांविषयीची एक याचिका न्या. भूषण गवई व न्या. ऑगस्टीन जाॅर्ज मसीह यांच्यापुढे सुनावणीसाठी आहे. सर्वोच्च न्यायालयाने दिल्लीसह सर्वच राज्यांकडून बेघरांची संख्या व त्यांना सुविधांची माहिती गेल्या डिसेंबरमध्ये मागवली होती. त्याविषयी सरकारे फारशी गंभीर नसल्याचे पाहून न्या. गवई यांनी मोफत योजनांवर गंभीर टिप्पणी केली. मतांसाठी फुकट खिरापत वाटण्याचे, महिला-युवक अशा समाजघटकांना दरमहा रोख रक्कम देण्याचे दोन ठळक दुष्परिणाम संभवतात. अशा योजनांचा सरकारच्या तिजोरीवर ताण पडतो आणि विकासकामांसाठी, कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी, कंत्राटदारांच्या बिलांसाठी पैसा उरत नाही, या पहिल्या दुष्परिणामाची अधूनमधून चर्चा तरी होते.

सर्वोच्च न्यायालयाने बोट ठेवलेला दुसरा दुष्परिणाम मात्र क्वचितच चर्चेत येतो. तिजोरीवरील ताण भलेही कर्ज काढून कमी करता येईल; परंतु, राजकारणासाठी रोख पैसा किंवा फुकट वस्तू वाटल्या तर लोकांना कष्ट करण्याची गरज उरत नाही. ते ऐतखाऊ बनतात, हा दुष्परिणाम अधिक गंभीर आहे. वरून अशा योजनांना गोरगरिबांच्या कल्याणाचा मुलामा दिला जातो. समाजातील वंचित घटकांबद्दल सहानुभूती बाळगली, त्यांच्या पायातील दारिद्र्याच्या बेड्या काढण्यासाठी प्रयत्न झाले, तर ते चांगलेच आहे. राज्यघटनेतील कल्याणकारी राज्याची संकल्पना तीच आहे; परंतु, अलीकडे ती शब्दश: घेतली जाते. प्रत्येकाच्या हाताला काम, पोटाला अन्न, अंगावर कपडा, डोक्यावर घराचे छत आणि सन्मानाचे जगणे यांसाठी अनुकूल परिस्थिती निर्माण व्हावी.

शिक्षण, आरोग्य, रोजगार, वीज-पाणी, रस्ते अशा सोयी-सुविधा निर्माण व्हायला हव्यात. धर्म, जात, लिंग यांच्या आधारे कोणी श्रेष्ठ, कोणी कनिष्ठ ठरणार नाही, अशी समताधिष्ठित व्यवस्था जोडीला असावी, हे सारे म्हणजे कल्याणकारी राज्य. तथापि, आपल्या राजकारणाने मतांसाठी सोयीचा अर्थ काढला आणि ‘रेवडी संस्कृती’ रुजविली. मतदारांना भुलविण्यासाठी निवडणुकीच्या तोंडावर योजना जाहीर करायच्या आणि एकप्रकारे मते विकत घ्यायची, ही ती नवी संस्कृती. पूर्वी तामिळनाडूसारख्या काही राज्यांमध्ये रोख पैसे किंवा वस्तूंचे वाटप व्हायचे. तेव्हा इतर राज्ये त्याची टिंगलटवाळी करायची. कोरोना महामारीच्या वेळेस कामधंदा ठप्प असल्यामुळे लोकांची उपासमार होऊ लागली म्हणून केंद्र सरकारने गोदामांमध्ये साठविलेले अन्नधान्य गरजूंना मोफत द्यायला सुरुवात केली. त्या योजनेला आकर्षक नावही दिले. त्यातून भरभरून मते मिळतात हे पाहून गेल्या लोकसभा निवडणुकीपूर्वी या योजनेला थेट पाच वर्षांची मुदतवाढ दिली गेली.

कर्नाटकमध्ये अशा योजनांमधून राजकीय यश मिळाल्याने प्रमुख विराेधी पक्ष काँग्रेसही या शर्यतीत उतरली. त्यानंतरच्या सगळ्याच निवडणुकांमध्ये या मोफत योजनांचीच चर्चा अधिक झाली. महाराष्ट्राची दोन उदाहरणे ताजी आहेत. लोकप्रिय योजनांमुळे सरकारी तिजोरीत खडखडाट आहे. महाराष्ट्रातील कंत्राटदारांची जवळपास एक लाख कोटी रुपयांची बिले थकली आहेत. मार्च एंडच्या तोंडावर कंत्राटदार आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत. ते कदाचित न्यायालयातही जातील. लाडक्या बहिणींच्या पात्रतेची छाननी सुरू असून जानेवारी महिन्यात लाभार्थी महिलांची संख्या पाच लाखांनी घटली. तरीदेखील चार-पाच महिन्यांत या अपात्र महिलांना दिलेले कोट्यवधी रूपये परत घेतले जाणार नाहीत. या पार्श्वभूमीवर, सर्वोच्च न्यायालयाने अशा फुकट योजनांमधील खरा धोका देशासमोर ठेवला आहे.

जगण्यासाठी जे जे हवे ते असे मोफत मिळाल्याने लोक आळशी बनत आहेत. कष्ट करण्याची गरज उरलेली नाही. कामाची सवय मोडली जात आहे. एकप्रकारे परजिवी वर्ग तयार होत आहे. हा धोका मोठा आहे. राजकीय पक्षांनी यातून बोध घ्यायला हवा खरे; पण ते तसा घेतील याची शाश्वती नाही. त्यांचा जीव मतदारांच्या मतांमध्ये गुंतला आहे. मतांच्या राजकारणापुढे असे सुविचार त्यांच्या किती पचनी पडतील, ही शंकाच आहे.

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयladki bahin yojanaलाडकी बहीण योजनेचा