ठाणे खाडी रामसर स्थळ घोषित, आता पुढे काय?

By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2022 06:04 AM2022-08-16T06:04:44+5:302022-08-16T06:05:32+5:30

Thane Creek gets RAMSAR status : रामसर स्थळाच्या नऊपैकी सात निकषांची पूर्तता झाल्याने ठाणे खाडीला तो दर्जा मिळाला. प्रश्न आहे तिचे पर्यावरण जपण्याचा.

Thane Creek gets RAMSAR status, what next? | ठाणे खाडी रामसर स्थळ घोषित, आता पुढे काय?

ठाणे खाडी रामसर स्थळ घोषित, आता पुढे काय?

googlenewsNext

- योगेश बिडवई ( मुख्य उपसंपादक, लोकमत, मुंबई)

भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत असताना महाराष्ट्रातील जैवविविधतेने नटलेल्या ठाणे खाडीला रामसर स्थळाचा दर्जा प्राप्त झाल्याने मुंबई, ठाणे परिसरातील निसर्गप्रेमी नागरिकांना आनंद होणे साहजिक आहे. मुंबईच्या किनारपट्टीवरील आशिया खंडातील सर्वांत मोठ्या खाड्यांपैकी एक असलेल्या ठाणे खाडीची रामसर कन्व्हेन्शनकडून मुंबई महानगर प्रदेशातील पहिले आणि महाराष्ट्रातील तिसरे रामसर स्थळ म्हणून आंतरराष्ट्रीय महत्त्वाची पाणथळ जागा म्हणून घोषणा करण्यात आली आहे. रामसर स्थळ घोषित होण्यासाठी ९ निकषांपैकी ७ निकषांची पूर्तता ठाणे खाडीने केली आहे. 

मुंबई, ठाणे, रायगड, पालघरच्या किनारपट्टी भागातील खाडींचा परिसर अर्थात पाणथळ जागा जैवविविधतेने नटलेल्या आहेत. अनेक वनस्पती, प्राण्यांचा हा अधिवास आहे. ठाणे खाडी क्षेत्र तर समृद्ध जैवविविधतेचे क्षेत्र आहे. या भागात २० हजारांहून अधिक पाणपक्षी, दुर्मीळ आणि संकटग्रस्त पाणपक्ष्यांचा येथे रहिवास असतो. माशांसाठी अन्नाचा महत्त्वाचा स्रोत, अंडी घालण्यासाठी अधिवास तसेच ही खाडी मध्य आशियाई स्थलांतराचा मार्ग आहे. 

आदित्य ठाकरे पर्यावरणमंत्री असताना ठाणे खाडी रामसर क्षेत्र म्हणून जाहीर होण्यासाठी केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठविण्यासह इतर गोष्टींचा पाठपुरावा करण्यात आला. ठाणे खाडीचे सुमारे १६९० हेक्टर क्षेत्र हे फ्लेमिंगो अभयारण्य म्हणून घोषित झालेले आहे. त्याभोवतीचे ४ हजार ८३२ हेक्टर क्षेत्र पर्यावरणीयदृष्ट्या संवेदनशील भाग म्हणून अधिसूचित केलेले आहे. देशातील १५ पाणथळ जागांना नुकताच रामसर स्थळांचा दर्जा देण्यात आला आहे. महिनाभरातच आणखी ११ रामसर स्थळे घोषित झाली. जगातील एकूण रामसर स्थळांची संख्या आता २ हजार ४५३ झाली असून त्यात भारतातील ७५ तर, महाराष्ट्रातील तीन असतील. ठाणे खाडीला हा दर्जा प्राप्त झाल्याने या क्षेत्राचे रक्षण करण्यासह जैवविविधता टिकविण्यासाठी राष्ट्रीय यंत्रणांचीही मदत होणार आहे. तसेच मुंबई, ठाणे आणि नवी मुंबई पालिका प्रशासनासह मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाची जबाबदारी वाढली आहे.

ठाणे महापालिका क्षेत्रातील मुंब्रा-दिवा परिसराच्या शहरीकरणाचा वेग काही वर्षांत कमालीचा वाढला आहे. नव्या बांधकामांना परवानग्या दिल्या जात आहेत. मात्र यात नियोजनाचा अभाव दिसतो. नागरी वस्तीतील गटारे आणि मलवाहिन्यांतील दूषित सांडपाणी विनाप्रक्रिया खाडीत जाते. त्यातून जैवविविधतेला धोका पोहोचतो. मुंब्रा येथील सामाजिक कार्यकर्ते आरीफ इराकी यांनी याबाबत आवाज उठविला होता. हरित लवादाकडे तक्रारही दाखल केली. खाडीतील जैवविविधता जपण्यासाठी शासन स्तरावर कठोर उपाययोजनांची गरज तर आहेच त्याचबरोबर दक्ष नागरिकांच्या सामूहिक प्रयत्नांची गरज आहे. मुंबई, ठाणे, नवी मुंबई असो की कल्याण- डोंबिवली, उल्हासनगर. गेल्या काही वर्षांत बिल्डर आणि पालिकेतील अधिकारी यांची अभद्र युती तयार झाली आहे. कोणत्याही यंत्रणांना ते दाद देत नाहीत. पर्यावरण, जैवविविधता या बाबी त्यांच्या गावीही नसतात. पर्यावरणावर काम करणारे कार्यकर्ते म्हणजे त्यांच्यासाठी अडचण असते. ते विकासाचे मारेकरी असल्याची शासकीय स्तरावर भावना असते.  

खाडी किनाऱ्यांवर अनेक ठिकाणी रेती उत्खननाला बंदी आहे. त्यानंतरही बेसुमार रेती उपसा होतो. लोकलमधून जाताना सर्वसामान्यांनाही रेती उत्खनन सुरू असल्याचे दिसते. ते अधिकृत आहे की अनधिकृत हे समजण्यासही मार्ग नसतो. अधूनमधून त्याच्या बातम्या येतात, उत्खनन थांबते. पुन्हा रेती माफियांची मुजोरी सुरू राहते. सीआरझेड कायद्याचीही अनेकदा अंमलबजावणी होताना दिसत नाही. ठाणे खाडीला रामसर दर्जा मिळाल्यानंतर किमान त्याची प्रामाणिकपणे अंमलबजावणी होण्याची गरज आहे. पक्ष्यांच्या अधिवासामुळे तसेच हजारो किलोमीटरचा प्रवास करून येणाऱ्या फ्लेमिंगो पक्ष्यांना पाहण्यासाठी दरवर्षी पर्यटक गर्दी करतात.

मात्र येथे पर्यटनासाठी अधिक चांगले प्रयत्न करण्याची गरज आहे. तसेच पर्यटकांना सोयी-सुविधा पुरविण्याची गरज आहे. त्यासाठी राज्य सरकार आणि महापालिकांनी पुढाकार घ्यावा. तरच पर्यटनवाढीला चालना मिळेल. रामसर क्षेत्र घोषित झाले म्हणजे आता या भागातील जैवविविधता आपोआप जपली जाईल, या भ्रमात कोणी राहू नये. त्यासाठी शासन तसेच पर्यावरणावर काम करणाऱ्या विविध संस्थांनी हातात हात घालून काम करण्याची गरज आहे. खारफुटीवरील कांदळवने जपणे, मुंबई ठाण्याचे ऑक्सिजन असणाऱ्या वृक्षांचे संगोपन ही आपली सर्वांचीच जबाबदारी आहे. त्यातून आपले जगणेही सुकर होण्यास मदत होईल.

Web Title: Thane Creek gets RAMSAR status, what next?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :thaneठाणे