‘सांगा धनाचा साठा, आमचा वाटा कुठं हाय हो?’

By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2021 05:31 AM2021-08-14T05:31:06+5:302021-08-14T05:31:52+5:30

आंबेडकरी विचारांची कास धरून उधाणल्या वादळवाऱ्यासारखं जगलेले कवी, शाहीर वामनदादा कर्डक यांची जन्मशताब्दी १५ ऑगस्टपासून सुरू होते आहे, त्यानिमित्ताने !

‘Tell me, where is our share of wealth?’ | ‘सांगा धनाचा साठा, आमचा वाटा कुठं हाय हो?’

‘सांगा धनाचा साठा, आमचा वाटा कुठं हाय हो?’

googlenewsNext

जखडबंद पायातील साखळदंड
तटातट तुटले तू ठोकताच दंड..l
झाले गुलाम मोकळे.. 
भीमा तुझ्या जन्मामुळे...
हे अल्पाक्षरी काव्यगान आहे महाकवी वामनदादा कर्डक यांचं.‍ अतिशय अल्पाक्षरात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचं अमोघ कर्तृत्व त्यांनी या  शब्दावळीत थाटलेलं आहे. ‘दादा’ या आदरार्थी उपाधीने ते सर्वदूर मशहूर आहेत.

दादांचा जीवनकाळ १९२२ ते २००४ असा ८२ वर्षांचा. नाशिक जिह्यातील देशवंडी हे त्यांचं गाव. तबाजी कर्डक हे त्यांचे वडील व आई सईबाई. दादा तीन वर्षांचे असतानाच १९२६ साली त्यांच्या वडिलांचं निधन झालं. अक्षर गिरविण्याच्या वयातच त्यांना गुरंढोरं  चारावी लागली. दादांचा मोठा भाऊ सदाशिव हा मुंबईतील कापड गिरणीत मजूर होता. १९४० च्या दरम्यान त्यांने उमेदीतील वामन, बहीण सावित्री व आईला मुंबईत आणलं. पोटापाण्यासाठी वामनदादांना सायन येथील कोळशाच्या वखारीत काम करावं लागलं. हा काळ होता दुसऱ्या महायुद्धाचा. बॉम्ब पडण्याच्या भीतीने लोक जीव वाचविण्यासाठी घरात,‍ परिसरात चर खोदत. ते खड्डे खोदण्याचं  कामही दादांनी केलं. पुढे मिळेल तिथे मोलमजुरी करून त्यांनी कुटुंबाच्या चरितार्थासाठी हातभार लावला. समकाळात ते आंबेडकरी चळवळीच्या ‘समता सैनिक दला’च्या लेजीम व लाठीकाठी पथकात  वस्ताद म्हणून नावारूपास आले. आंबेडकरी चळवळीच्या ऊर्जाशील माहोलमुळे ते आंबेडकरी चळवळीशी समरस झाले. पुढे त्यांनी गरजेतून कापड गिरणीसह विविध कारखान्यांमध्ये चाकरी केली; परंतु आंबेडकरमय झालेले वामनदादा नोकरीत फारसे रमले नाहीत.

आपण निरक्षर आहोत याची सल वामनदादांना सतत बोचत असे. म्हणून त्यांनी स्वयंप्रेरणेने मूळाक्षरे तोंडपाठ करीत लिहिण्याचा सराव केला.  काही दिवसांतच ते जिद्दीने साक्षर झाले. कार्यकर्तेपण, चिंतनशील स्वभाव आणि कलासक्त वृत्तीमुळे वाचन, गीतलेखन, चित्रपट, नाटकं, आंबेडकरी जलसे पाहणं हे त्यांचे छंद मुंबापुरीत अधिक वाढीस लागले. त्यांनी काही नाटकं, चित्रपटकथा व मराठी सिनेमांसाठी गीतं लिहिली. चित्रपट निर्माते दत्ता माने यांच्या ‘सांगते ऐका’ या मराठी चित्रपटासाठी दादांनी ‘सांगा या वेडीला.. माझ्या गुलछडीला...हिच्यासाठी आलो मी सासूरवाडीला’ आणि ‘पंचाआरती’ चित्रपटासाठी, ‘चल गं हरणे तुरू तुरू... चिमण्या उडती भुरू भुरू..’ ही गीतं लिहिली. ‘यो यो यो पाव्हणं..सखूचं मेव्हणं..’ अशी इष्कबाजीची नजाकत असलेली गीतंही त्यांनी लिहिली.  परंतु प्रबोधनकारी गीतकार व शाहीर म्हणूनच दादा समष्टीत नावारूपाला आले.

माणसा इथे मी, तुझे गीत गावे
असे गीत गावे, तुझे हित व्हावे..‍
अशा  साध्या, सुलभ रचनांमुळे दादांची  गाणी लोकगीतं झाली.  बाबासाहेबांचं तत्त्वज्ञान दादांच्या हाच गीतांमधील मुख्य आशय असल्याचं दिसतं. बाबासाहेबांचा अर्थशास्त्रीय दृष्टिकोन दादांनी अतिशय सोप्या शब्दांमध्ये व्यक्त केलेला आहे. त्यांची ही प्रसिध्द रचनाच पाहा :
सांगा आम्हाला बिर्ला बाटा,  टाटा कुठाय हो..
सांगा धनाचा साठा,  आमचा वाटा कुठाय हो..? 

पूर्वापार स्थापित असलेली आर्थिक विषमता, भांडवलशाहीतून सामान्यांचं होणारं आर्थिक शोषण दादांनी सहजतेनं, परंतु थेटपणे वरील रचनेत मांडलं आहे.  बुद्धाचं अहिंसक विचारदर्शन, छ. शिवराय व शाहूंचं सामाजिक न्यायतत्त्व, म. फुले यांचं सनातन्यांविरुद्धचं सूक्ष्म सत्यशोधन आणि बाबासाहेबांचं समतामुलक तत्त्वज्ञान दादांनी परिश्रमपूर्वक आत्मसात केलेलं होतं. सहज-सुलभ गावरान भाषा, लोककथेतील पारंपरिक संगीत, आत्मभान जागृत करणाऱ्या शब्दकळा आणि दादांची खड्या, परंतु मधुर आवाजातील गायकी; यामुळे त्यांचं गाणं लोकांच्या ओठांवर आपसूकच आलं आणि परिवर्तनाच्या चळवळीचं ऊर्जाबळ ठरलं.

जवळपास साठ वर्षे दादांच्या प्रतिभाशाली कवित्वाचा आणि गायकीचा झंझावात महाराष्ट्रात वेगवान राहिला.  निखळ मनुष्यतेचा उद्घोष करणाऱ्या क्रांतिकारी गीतांचा दुर्लभ आविष्कार असलेल्या दादांचं वादळवाऱ्यासारखं व्यक्तित्त्व म्हणूनच अजरामर राहिलेलं आहे.
प्रा. गंगाधर आहिरे, नाशिक

Web Title: ‘Tell me, where is our share of wealth?’

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.