विधानसभेच्या कामाला लागा

By Admin | Updated: May 22, 2014 08:31 IST2014-05-22T08:31:36+5:302014-05-22T08:31:36+5:30

येत्या काही महिन्यांत महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. लोकसभा निवडणुकीतील विजयी आणि पराभूत वीर आपापले झेंडे आणि जखमा घेऊन पुन्हा एकवार त्यात उतरणार आहेत.

Take up the assembly work | विधानसभेच्या कामाला लागा

विधानसभेच्या कामाला लागा

येत्या काही महिन्यांत महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. लोकसभा निवडणुकीतील विजयी आणि पराभूत वीर आपापले झेंडे आणि जखमा घेऊन पुन्हा एकवार त्यात उतरणार आहेत. काँग्रेस आणि राष्ट्रवादी या दोन पक्षांनी त्यासाठी तयारी सुरू केली आहे. संभाव्य लढवय्यांना त्यांच्या नेत्यांनी मार्गदर्शनाचे डोस पाजायलाही सुरुवात केली आहे. आम्ही का व कसे पडलो, हे सांगण्याऐवजी तुम्ही कसे पडू नये, हे सांगण्यावर त्यांचा भर अर्थातच अधिक आहे आणि तो सहानुभूतीने समजून घ्यावा असा आहे. भाजपाला चिंता नाही. त्यांच्या आघाडीला विधानसभेच्या २८८ पैकी २४० जागी बहुमत मिळाले आहे. त्यांच्या समोरची भीती एकच. शिवसेना जास्त जागा मागणार. मग तिचे जास्तीचे आमदार निवडून येणार आणि तसे झाले तर आपल्या गोपीनाथ मुंडे यांचे किंवा एकनाथ खडसे यांचे कसे होणार? मुंडे मुख्यमंत्रिपदाच्या खाली यायला तयार नाहीत आणि ठाकरे त्या पदावर सेनेखेरीज दुसर्‍या कोणाला बसू द्यायला राजी नाहीत... सारांश, युतीची चिंता पदाची तर आघाडीला पडलेले भय जागांचे आहे. लोकसभेच्या निवडणुकीने काही चमत्कार घडविले आहेत. रिपब्लिकन नावाचा पक्ष बेपत्ता झाला आहे. बसपाचा थांगपत्ता नाही, शेकापसारखे प्राचीन पक्ष शोधावे लागावे असे आहेत. तर आपसारख्यांना जमीनही सापडली नाही, अशी त्यांची स्थिती आहे. काँग्रेस व राष्ट्रवादी या पक्षांच्या सत्तेवर राहिलेल्या आघाडीची अवस्था पाहता तेथे त्या बिचार्‍यांचे असे होणे स्वाभाविकही होते, तरीही एका गोष्टीला मात्र दाद दिली पाहिजे. पडले, तुटले आणि कसेबसे उरले तरी त्यातल्या प्रत्येकाचा अहंकार अजून सह्याद्रीएवढा राहिला आहे. ‘पडलो ते तुमच्यामुळे, आमच्यामुळे नाही’ असे बोल एकमेकांना लावीत ते तो सुखावूनही घेत आहेत. लोकसभेच्या निवडणुकीत काँग्रेसच्या आघाडीचे उमेदवार होते, पक्ष नव्हता, त्याचे पुढारी नव्हते, त्याची माध्यमे नव्हती, त्याच्याजवळ अर्थबळ नव्हते आणि ते नव्हते म्हणून कार्यकर्त्यांचे मोहोळही नव्हते, परिणामी काँग्रेसला आपले वातावरण कुठे उभेच करता आले नाही. बारामतीपासून गोंदियापर्यंत आणि मुंबईपासून गडचिरोलीपर्यंत त्या आघाडीच्या वाट्याला जे भुईसपाटपण आले ते यामुळेच. ते अभूतपूर्व व ऐतिहासिक म्हणावे असे होते व आहे. नापासपण मान्य करूनच या पक्षांना नव्या अभ्यासाला व दंडबैठकांना आता सुरूवात करायची आहे. तुटलेली माणसे जोडायची आहेत, दूर गेलेले आणि घालविलेले वर्ग जमा करायचे आहेत. समाजात धर्मनिरपेक्ष निष्ठा असणार्‍यांचा एक मोठा वर्ग आहे व तो पक्षाच्या दावणीबाहेर आहे. त्या वर्गाला आपलेसे करून घ्यावे लागणार आहे. मात्र, त्यासाठी या पक्षांना व त्यांच्या पुढार्‍यांना त्यागाची तयारी ठेवावी लागणार आहे. दुर्दैव हे, की आताची काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसही त्यागाची परंपरा विसरली आहे. बाबा-काका-मामा-पोरी-पोरे-पुतणे-भाचे-साडू आणि त्यातले कोणीच मिळाले नाही तर पी.ए. किंवा आपल्या अंगणात खालच्या मानेने वावरणारी माणसे... स्वतंत्र वृत्तीची, वेगळा विचार करू शकणारी आणि आपल्याहून पुढे पाहणारी माणसे व तरुणाई न चालणे हे या पक्षांच्या व त्यांच्या तथाकथित अनुभवी व वजनदार पुढार्‍यांचे उणेपण आहे. सव्वाशे वर्षांची उज्ज्वल परंपरा असलेल्या सामर्थ्यशाली पक्षाच्या पराभवाचे शल्य कुणात दिसत नाही. आलो ते दिल्लीवाल्यांमुळे आणि गेलो तेही त्यांच्याचमुळे. आम्ही काय, बसविले तर बसणार आणि उठविले तर उठणार. सारी जबाबदारी त्या दिल्लीवाल्यांची... आमच्या मात्र खासगी व खूपदा क्षुद्र म्हणाव्या अशा महत्त्वाकांक्षाच, त्यासाठी भांडणे, हाणामार्‍या आणि एकमेकांचे पाय ओढण्याची तयारी. आताच्या दारुण पराभवाने यातून वर उठणे आणि एकमेकांना सोबत घेऊन समाजाला आपल्याजवळ आणणे एवढे जरी येत्या चार महिन्यांत ही नापास माणसे शिकू शकली तरी त्यांनी न गमावलेले व त्यांच्या नावे शिलकी असलेले बरेच काही आहे, हे त्यांनीही लक्षात घ्यावे असे आहे. दिल्ली सरकारात मोदींना मिळालेल्या बहुमताने धास्तावलेला एक मोठा वर्ग देशात आणि महाराष्ट्रात आहे. सरकारच्या अमर्यादपणाला आवर घालावा आणि त्यासाठी राज्यांत विरोधी पक्षांची सरकारे आणावी, अशी मानसिकता असलेला हा वर्ग आहे. १९६७ व ८० या वर्षी झालेल्या विधान मंडळांच्या निवडणुकात ही मानसिकता सक्रिय झालेली देशाने पाहिलीही आहे. ती संघटित करणे हे महाराष्ट्रातल्या आताच्या पराभूतांचे काम आहे, त्यासाठी त्यांनी स्वत: प्रथम संघटित होणे व जमेल तेवढ्या चांगल्या कामांना लागणे आवश्यक आहे.

Web Title: Take up the assembly work

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.